अल्पावधीत 1.25 कोटींपेक्षा जास्त लोक ‘मोदी की गारंटी’ वाहनाशी जोडले गेले”
“विकसित भारत संकल्प यात्रेचा भर सरकारी लाभ जास्तीत जास्त पोहोचवण्यावर असून ते देशभरातील नागरिकांपर्यंत पोहोचतील याची काळजी घेते”
‘मोदी की गारंटी’ म्हणजे पूर्ततेची हमी असा लोकांचा विश्वास आहे
"विकसित भारत संकल्प यात्रा हे आतापर्यंत सरकारी योजनांशी जोडले जाऊ न शकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक उत्तम माध्यम बनले आहे"
"आमचे सरकार माय-बाप सरकार नाही, तर माता-पित्यांची सेवा करणारे सरकार आहे"
“प्रत्येक गरीब, महिला, युवक आणि शेतकरी माझ्यासाठी अतिशय महत्वाची व्यक्ती आहे”
“नारी शक्ती असो, युवा शक्ती असो, शेतकरी असो वा गरीब असो, विकसित भारत संकल्प यात्रेला त्यांचा पाठिंबा उल्लेखनीय आहे”.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.  या योजनांचा लाभ सर्व लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत कालबद्ध रीतीने पोहचेल हे सुनिश्चित करून सरकारच्या प्रमुख योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात सुरु करण्यात आली आहे.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी प्रत्येक गावात ‘मोदी की गारंटी’ वाहनाबाबत लोकांमध्ये दिसून आलेल्या लक्षणीय उत्साहाचा उल्लेख केला.  काही वेळापूर्वी लाभार्थींबरोबर साधलेल्या संवादाचे स्मरण करून देताना पंतप्रधानांनी सांगितले की या प्रवासादरम्यान 1.5 लाखापेक्षा जास्त लाभार्थींनी आपले अनुभव कथन केले आहेत. पक्के घर, नळाच्या पाण्याची जोडणी, शौचालय, मोफत उपचार, मोफत अन्नधान्य, गॅस जोडणी, वीज जोडणी,  बँक खाते उघडणे, पीएम किसान सन्मान निधी, पीएम फसल विमा योजना, पीएम स्वनिधी योजना, आणि पीएम स्वामित्व मालमत्ता कार्ड यासह विविध योजनांचे फायदे त्यांनी नमूद केले.

 

देशभरातील गावांमधील कोट्यवधी कुटुंबांना कुठल्याही शासकीय कार्यालयात वारंवार हेलपाटे न मारता सरकारी योजनेचा लाभ  मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने लाभार्थी निवडले आणि नंतर त्यांच्यापर्यंत लाभ पोहचवण्यासाठी पावले उचलली“ असे त्यांनी अधोरेखित केले. "म्हणूनच लोक म्हणतात, मोदी की गारंटी म्हणजे पूर्ततेची हमी” असे ते म्हणाले.

“आतापर्यंत सरकारी योजनांशी जोडले जाऊ न शकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा हे एक उत्तम माध्यम बनले आहे” असे पंतप्रधानांनी नमूद केले. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रवास 40 हजारापेक्षा जास्त ग्रामपंचायती आणि अनेक शहरांमध्ये पोहोचला असून 1.25 कोटींपेक्षा जास्त लोक ‘मोदी की गारंटी’ वाहनाशी जोडले गेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. ‘मोदी की गारंटी’ गाडीचे स्वागत केल्याबद्दल त्यांनी लोकांचे आभार मानले.

ओदिशा येथे विविध ठिकाणी पारंपरिक आदिवासी नृत्य करून या यात्रेचे स्वागत करण्यात आले, याची दखल पंतप्रधानांनी घेतली आणि पश्चिम खासी टेकड्यांवरील रामब्राई येथे स्थानिक जनतेने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा तसेच नृत्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. अंदमान निकोबार तसेच लक्षद्वीप येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांची नोंद घेत व्हीबीएसवाय’चे स्वागत करण्यासाठी कारगिल येथे 4,000 पेक्षा जास्त लोक जमले होते याचा उल्लेख त्यांनी केला. विहित कामांची सूची आणि व्हीबीएसवायच्या आगमनापूर्वी तसेच आगमनानंतर या कामांमध्ये झालेल्या प्रगतीची नोंद ठेवणारी पुस्तिका तयार करण्याची सूचना पंतप्रधानांनी केली. “यामुळे जेथे अजूनही ही गारंटीवाली गाडी पोहोचली नाही त्या भागातील लोकांना देखील या पुस्तिकेची मदत होईल,” पंतप्रधान पुढे म्हणाले.

 

सरकारी योजनांची माहिती हरेक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा निर्धार पूर्ण करण्याच्या दृष्टीने, व्हीबीएसवाय एखाद्या गावात पोहोचल्यानंतर गावातील प्रत्येक व्यक्ती ‘मोदी की गारंटी’ वाल्या गाडीपर्यंत पोहोचेल, याची खातरजमा करून घेण्याचे सरकार करत असलेले प्रयत्न पंतप्रधानांनी अधोरेखित केले. सरकारच्या प्रयत्नांचा परिणाम प्रत्येक गावात दिसून येतो आहे असे निरीक्षण नोंदवत, पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की सुमारे एक लाख नव्या लाभार्थींनी मोफत गॅस जोडणीसाठी अर्ज केला आहे. प्रत्यक्ष यात्रेच्या जागी 35 लाखांपेक्षा जास्त आयुष्मान भारत कार्डे देखील जारी करण्यात आली आहेत, लाखो लोकांची आरोग्य तपासणी होत आहे आणि मोठ्या संख्येने नागरिक विविध तपासण्या करून घेण्यासाठी आता आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये जात आहेत.

“आम्ही केंद्र सरकार आणि देशवासीय यांच्यात थेट नाते आणि भावनिक बंध निर्माण केला आहे,” असे मोदी म्हणाले. “आमचे सरकार हे माय-बाप सरकार नसून, ते मायबापांची सेवा करणारे सरकार आहे,” त्यांनी सांगितले, “मोदींसाठी गरीब, वंचित आणि ज्यांच्यासाठी सरकारी कार्यालयांचे दरवाजे बंद होते असे लोक, याच खऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आहेत.” देशातील प्रत्येक गरीब माणूस त्यांच्यासाठी अतिमहत्त्वाची व्यक्ती आहे यावर त्यांनी भर दिला. “या देशातील प्रत्येक माता, भगिनी आणि कन्या माझ्यासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आहेत,”, असे पंतप्रधान म्हणाले.

नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणुकांबाबत पंतप्रधान म्हणाले की या निवडणुकांच्या निकालाने मोदींच्या गारंटीच्या वैधतेबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. मोदींच्या हमीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व मतदारांप्रती त्यांनी कृतज्ञता देखील व्यक्त केली.

सरकारच्या विरोधात उभ्या असलेल्यांच्या बाबतीत नागरिकांच्या अविश्वासाच्या कारणांचा मागोवा घेताना पंतप्रधानांनी, अशा लोकांच्या चुकीचे दावे करण्याच्या प्रवृत्तीला अधोरेखित केले. ते म्हणाले की समाज माध्यमांच्या मदतीने निवडणुका जिंकता येत नाहीत तर लोकांपर्यंत पोहोचून हा विजय मिळतो. “निवडणुकीत जिंकण्यापूर्वी, लोकांची मने जिंकणे आवश्यक असते,”, असे, विरोधात उभे असलेल्यांच्या, जनतेच्या विवेकबुद्धीला कमी लेखण्याच्या पद्धतीला अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले. विरोधी पक्षांनी राजकीय हिताऐवजी सेवाभावाला अधिक महत्त्व दिले असते तर देशाच्या लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत राहिला नसता असे मत नोंदवत पंतप्रधान म्हणाले की असे झाले असते तर मोदींच्या हमीची पूर्तता 50 वर्षांपूर्वीच झाली असती. 

 

महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर लक्ष केंद्रित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की विकसित भारताच्या संकल्प यात्रेत मोठ्या संख्येने नारीशक्ती सहभागी होत आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बनवलेल्या 4 कोटी घरांपैकी 70 टक्के महिला लाभार्थी असल्याचे त्यांनी नमूद केले. 10 पैकी 7 मुद्रा लाभार्थी महिला आहेत आणि सुमारे 10 कोटी महिला, बचत गटांचा भाग आहेत, असे त्यांनी सांगितले. कौशल्य विकासाच्या माध्यमातून 2 कोटी महिलांना लखपती दीदी बनवले जात आहे आणि नमो ड्रोन दीदी अभियानांतर्गत 15 हजार बचत गटांना ड्रोन मिळत आहेत, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी विकसित भारत संकल्प यात्रेला मिळत असलेल्या महिला शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरिबांच्या पाठिंब्याचे कौतुक केले. या विकास यात्रेच्या प्रवासात एक लाखापेक्षा जास्त खेळाडूंना बक्षीस मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि यामुळे इतर युवा खेळाडूंना आणखी प्रोत्साहन मिळेल, असे सांगितले. पंतप्रधानांनी ‘माझा भारत स्वयंसेवक’ म्हणून स्वत:ची नोंदणी करण्याच्या युवकांच्या प्रचंड उत्साहाची दखल घेतली, आणि हे युवक विकसित भारताच्या संकल्पाला बळकटी देत असल्याचे सांगितले. “हे सर्व स्वयंसेवक आता फिट इंडियाचा मंत्र घेऊन पुढे जातील”, असे पंतप्रधान म्हणाले. युवकांनी पाणी, पोषण, व्यायाम किंवा फिटनेस आणि महत्वाचे म्हणजे पुरेशी झोप या चार गोष्टींना प्राधान्य देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. “या चारही बाबी निरोगी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. जर आपण या चार गोष्टींकडे लक्ष दिले तर आपले तरुण निरोगी राहतील आणि जेव्हा आपले तरुण निरोगी असतील तेव्हा देश निरोगी असेल”, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले.

 

या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान घेतलेल्या शपथा जीवन मंत्र बनल्या पाहिजेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. “सरकारी कर्मचारी असोत, लोकप्रतिनिधी असोत किंवा नागरिक असोत, प्रत्येकाने पूर्ण निष्ठेने संघटित व्हावे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनीच भारताचा विकास होईल”, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाचा समारोप केला.

 

पार्श्वभूमी

देशभरातील विकसित भारत संकल्प यात्रेच्या हजारो लाभार्थींनी या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीमार्फत सहभाग नोंदवला. कार्यक्रमादरम्यान देशभरातील 2,000 पेक्षा जास्त विकसित भारत संकल्प यात्रा व्हॅन, हजारो कृषी विज्ञान केंद्रे (KVKs) आणि सामान्य सेवा केंद्र (CSCs) देखील सहभागी झाली. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Defence exports skyrocket to record Rs 38,424cr in 2025-26, 62.7 per cent rise over previous fiscal

Media Coverage

Defence exports skyrocket to record Rs 38,424cr in 2025-26, 62.7 per cent rise over previous fiscal
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister highlights values of harmony and compassion on Good Friday
April 03, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, said that Good Friday reminds us of the sacrifice of Jesus Christ.

Shri Modi expressed hope that the day deepens the values of harmony, compassion and forgiveness.

He said that brotherhood and hope should guide everyone.

In a X post, Shri Modi said;

“Good Friday reminds us of Jesus Christ’s sacrifice. May this day further deepen the values of harmony, compassion and forgiveness. May brotherhood and hope guide us all.”