"काशीचा कायापालट करण्यासाठी सरकार, समाज आणि संत समाज सर्वजण एकत्रितपणे काम करत आहेत"
“स्वर्वेद महामंदिर हे भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे आधुनिक प्रतीक आहे”
"भारताची वास्तुकला, विज्ञान, योग अध्यात्मिक संरचनांमधूनच अकल्पनीय उंचीवर पोहोचली आहे "
"आज काळाची चक्रे पुन्हा फिरली आहेत आणि भारत आपल्या वारशाचा अभिमान बाळगत आहे आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्तीची घोषणा करत आहे"
"आता बनारस म्हणजे - विकास, आधुनिक सुविधा याबरोबरच विश्वास आणि स्वच्छता आणि परिवर्तन"
नऊ संकल्प मांडले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी मधील उमराहा येथे स्वर्वेद महामंदिराचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी महर्षी सदाफल देवजी महाराज यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली आणि मंदिर परिसराला फेरफटका देखील मारला.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की आज त्यांच्या काशी भेटीचा दुसरा दिवस आहे आणि काशीमध्ये घालवलेला प्रत्येक क्षण अभूतपूर्व अनुभवांनी भरलेला आहे. दोन वर्षांपूर्वी अखिल भारतीय विहंगम योग संस्थेच्या वार्षिक सोहळ्याची आठवण सांगून, यावर्षीच्या शताब्दी सोहळ्याचा भाग बनण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले  की, विहंगम योग साधनेने शंभर वर्षांचा अविस्मरणीय प्रवास पूर्ण केला आहे.

त्यांनी महर्षी सदाफल देव जी यांचे मागील शतकात ज्ञान आणि योगासाठी दिलेले योगदान अधोरेखित केले आणि सांगितले की त्यांच्या दिव्य प्रकाशाने जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनात परिवर्तन घडून आले आहे. या शुभ प्रसंगी पंतप्रधानांनी 25,000 कुंडिया स्वर्वेद ज्ञान महायज्ञाच्या आयोजनाचा उल्लेख केला. महायज्ञातील प्रत्येक आहुती विकसित भारताचा संकल्प अधिक दृढ करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी महर्षी सदाफल देवजींसमोर मस्तक टेकवले आणि त्यांचे विचार पुढे नेणार्‍या सर्व संतांना अभिवादन केले.

 

काशीचा कायापालट करण्यात सरकार, समाज आणि संत समाज यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. पंतप्रधानांनी स्वर्वेद महामंदिर हे या सामूहिक भावनेचे प्रतीक असल्याचे नमूद केले. हे मंदिर दिव्यतेचे तसेच भव्यतेचे मनमोहक उदाहरण आहे असे पंतप्रधान म्हणाले. “स्वर्वेद महामंदिर हे भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे आधुनिक प्रतीक आहे” असे ते म्हणाले. मंदिराच्या सौंदर्याचे आणि आध्यात्मिक वैभवाचे वर्णन करताना पंतप्रधानांनी हे ‘योग आणि ज्ञान तीर्थ’ असल्याचे सांगितले.

भारताच्या आर्थिक समृद्धी आणि भौतिक विकासाचे स्मरण करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने कधीही भौतिक प्रगतीला भौगोलिक विस्तार किंवा शोषणाचे माध्यम बनू दिले नाही. "आम्ही आध्यात्मिक आणि मानवी प्रतीकांद्वारे भौतिक प्रगतीचा पाठपुरावा केला" असे ते म्हणाले. त्यांनी काशी, कोणार्क मंदिर, सारनाथ, गया स्तूप आणि नालंदा आणि तक्षशिलासारख्या विद्यापीठांची उदाहरणे दिली. "या अध्यात्मिक संरचनांमधूनच भारताची वास्तुकला अकल्पनीय उंचीवर पोहोचली आहे" याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले.

 

हे भारताच्या विश्वासाचे प्रतीक होते ज्याला परकीय आक्रमणकर्त्यांनी लक्ष्य केले होते हे अधोरेखित करत स्वातंत्र्यानंतर त्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या गरजेचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. एखाद्या वारशाचा अभिमान न बाळगण्यामागील विचार प्रक्रियेबद्दल दुःख व्यक्त करत, स्वातंत्र्यानंतर अनेक दशके दुर्लक्षित राहिलेल्या सोमनाथ मंदिराचे उदाहरण देताना अशा प्रतीकांचे पुनरुज्जीवन केल्याने देशाची एकात्मता अधिक दृढ  झाली असती, असे पंतप्रधान म्हणाले. याने देशाला न्यूनगंडाच्या भावनेत नेले, असे मोदी म्हणाले. “आता कालचक्र पुन्हा फिरली आहेत आणि भारत आपल्या वारशाचा अभिमान बाळगत आहे आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा करत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. सोमनाथमध्ये सुरू झालेल्या कामाचे आता संपूर्ण मोहिमेत रूपांतर झाल्याचे सांगून त्यांनी काशी विश्वनाथ मंदिर, महाकाल महालोक, केदारनाथ धाम आणि बुद्ध सर्किटचे उदाहरण दिले. पंतप्रधान मोदी यांनी राम सर्किटवर सुरू असलेल्या कामाचा आणि लवकरच अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाचाही उल्लेख केला.

 

जेव्हा एखादं राष्ट्र सामाजिक वास्तव आणि सांस्कृतिक ओळख समाविष्ट करते तेव्हाच सर्वांगीण विकास शक्य होतो यावर पंतप्रधानांनी भर दिला. “म्हणूनच, आज आपल्या ‘तीर्थां' ना नवसंजीवनी मिळत आहे आणि भारत आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीचे नवे विक्रम रचत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. काशीचे उदाहरण देत त्यांनी हा मुद्दा स्पष्ट केला. गेल्या आठवड्यात दोन वर्षे पूर्ण झालेल्या नवीन काशी विश्वनाथ धाम परिसराने शहरातील अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला नवी गती दिली आहे.", असे त्यांनी सांगितले. "आता बनारसचा अर्थ आहे - विकास, आधुनिक सुविधांसह विश्वास आणि स्वच्छता आणि परिवर्तन", असे पंतप्रधानांनी सुधारित संपर्क सुविधांची माहिती देताना सांगितले. रस्त्यांचे चौपदरीकरण - सहापदरीकरण, रिंग रोड, रेल्वे स्थानकाचे अपग्रेडेशन, नवीन गाड्या, समर्पित मालवाहतूक मार्गिका, गंगा घाटांचे नूतनीकरण, गंगा क्रूझ, आधुनिक रुग्णालये, नवीन आणि आधुनिक दुग्धव्यवसाय, गंगा नदीकाठी नैसर्गिक शेती, तरुणांसाठी प्रशिक्षण संस्था आणि सांसद रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार या गोष्टी त्यांनी नमूद केल्या.

 

अध्यात्मिक प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी आधुनिक विकासाची भूमिका अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी वाराणसी शहराबाहेर असलेल्या स्वर्वेद मंदिराशी असलेल्या उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीचा उल्लेख केला. बनारसला येणाऱ्या भाविकांसाठी ते एक प्रमुख केंद्र म्हणून उदयाला येईल, ज्यामुळे आसपासच्या गावांमध्ये व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

“विहंगम योग संस्थान समाजाच्या सेवेइतकेच आध्यात्मिक कल्याणासाठीही समर्पित आहे”, महर्षी सदाफल देवजी हे योगनिष्ठ संत तसेच स्वातंत्र्यासाठी लढलेले स्वातंत्र्य सैनिक होते, असे पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये त्यांचे संकल्प पुढे नेण्याच्या गरजेवर भर देत पंतप्रधानांनी 9 संकल्प मांडले आणि त्यांची पूर्तता करण्याचे आवाहन केले. प्रथम, पंतप्रधानांनी पाण्याची बचत आणि जलसंधारणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या संकल्पाचा उल्लेख केला, दुसरा संकल्प  - डिजिटल व्यवहारांबद्दल जागरूकता निर्माण करणे, तिसरा संकल्प - गावे, परिसर आणि शहरांमध्ये स्वच्छतेचे प्रयत्न वाढवणे, चौथा संकल्प - स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांचा प्रचार करणे आणि वापर करणे, पाचवा - भारतातील प्रवास आणि शोध, सहावा- शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीबद्दल जागरुकता वाढवणे,  सातवा संकल्प – तुमच्या दैनंदिन जीवनात भरडधान्य किंवा श्रीअन्न  यांचा समावेश, आठवा – खेळ, तंदुरुस्ती किंवा योग हा जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे आणि शेवचा संकल्प - भारतातील गरिबी हटवण्यासाठी किमान एका गरीब कुटुंबाला आधार देणे. हे संकल्प पंतप्रधानांनी यावेळी मांडले.

 

विकसित भारत संकल्प यात्रेवर प्रकाश टाकताना, काल संध्याकाळी आणि आजही पंतप्रधानांचा सहभाग असलेल्या या यात्रेविषयी प्रत्येक धर्मगुरूंनी जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी  केले. “हा आपला वैयक्तिक संकल्प झाला पाहिजे”, असे पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना सांगितले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नरेंद्रनाथ पांडे, सद्गुरु आचार्य श्री स्वतंत्रदेव जी महाराज आणि संत प्रवर श्री विज्ञानदेव जी महाराज उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Khichdi To Moringa Paratha: 7 Traditional Foods PM Modi Loves

Media Coverage

Khichdi To Moringa Paratha: 7 Traditional Foods PM Modi Loves
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित
August 26, 2026
'खेलो इंडिया संवाद' क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी,स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणणार
'खेलो इंडिया संवाद' अंतर्गत होणारा 'युवा संवाद' क्रीडा, ऑलिम्पिक आकांक्षा, युवा नेतृत्व, विकसित भारत आणि नशामुक्त युवा या पाच प्रमुख विषयांवर केंद्रित असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया संवाद'ला संबोधित करतील. भारताच्या क्रीडा प्रवासात तरुणांना सहभागी करून घेणे, त्यांच्या आकांक्षा जाणून घेणे आणि समृद्ध युवा-नेतृत्वाखालील विकसित भारतासाठी त्यांच्या विचारांचे योगदान मिळवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

'मेरा युवा भारत' (MY Bharat) द्वारे राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांमधील तरुणांच्या सहभागासह देशभरात आयोजित केला जाईल. तरुणांच्या आकांक्षांना राष्ट्रीय विकासाच्या विषयपत्रिकेच्या केंद्रस्थानी ठेवून एक तंदुरुस्त, शिस्तबद्ध आणि क्रीडाप्रेमी राष्ट्र घडवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

देशव्यापी 'खेलो इंडिया संवाद' हा क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी, स्वयंसेवा, तंदुरुस्ती आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणेल. हा उपक्रम तरुणांना देशाच्या क्रीडा आकांक्षांशी थेट जोडण्याचे माध्यम ठरेल, तसेच त्यांच्या कल्पना आणि दृष्टिकोन हे भारतातील युवा व क्रीडा परिसंस्थेमधील सतत सुरू असलेल्या संवादाचा भाग बनतील याची निश्चिती करेल.

या राष्ट्रीय कार्यक्रमानंतर तरुण सहभागी, 'माय भारत' स्वयंसेवक, स्थानिक खेळाडू आणि लोकप्रतिनिधींचा समावेश असलेले स्थानिक संवाद आयोजित केले जातील. खेळांमध्ये रस असलेले तरुण आणि भारतातील प्रमुख खेळाडू व पदकविजेते यांच्यातील थेट संवाद हे या उपक्रमाचे एक मुख्य वैशिष्ट्य असेल.

'युवा संवाद' हे या कार्यक्रमाचे एक मध्यवर्ती वैशिष्ट्य असून यामध्ये तरुण सहभागींना त्यांच्या स्वतःच्या संकल्पना, दृष्टिकोन आणि आकांक्षा व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले जाईल. हा संवाद खालील पाच विषयांवर आधारित असेल:

  • अधिक चांगल्या सुविधा, प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान आणि सर्वसमावेशक सहभागाद्वारे भारताच्या क्रीडा परिसंस्थेत सुधारणा करणे
  • वैज्ञानिक प्रतिभा शोध, पारदर्शक निवड आणि दीर्घकालीन खेळाडू विकासाद्वारे 2036 ऑलिम्पिकसाठी कलागुणांची जोपासना करणे.
  • शासन व्यवस्था मंच आणि 'माय भारत' संचालित स्वयंसेवेच्या माध्यमातून युवा नेते तयार करणे.
  • नागरी कर्तव्यभावना, भविष्याभिमुख कौशल्ये आणि संरचित स्वयंसेवेची निर्मिती करून विकसित भारतासाठी तरुणांचे सक्षमीकरण करणे;
  • अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात लढा देण्यासाठी 2 ऑगस्ट 2026 रोजी सुरु झालेल्या पंतप्रधानांच्या 100 आठवड्यांच्या देशव्यापी अभियानाअंतर्गत साप्ताहिक जनभागीदारी उपक्रमांद्वारे बळकट केलेल्या, क्रीडा आणि समवयस्क नेटवर्कचा वापर करून 'नशामुक्त युवा' चळवळीला प्रोत्साहन देणे.