जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा प्रतिनिधी म्हणून, मी माझ्यासोबत 1.4 अब्ज भारतीयांची सदिच्छा आणि शुभेच्छा घेऊन आलो आहे : पंतप्रधान
खरी लोकशाही चर्चा आणि वादविवादाला प्रोत्साहन देते; ती लोकांना एकत्र आणते; ती सन्मानाचा आदार करते, आणि मानवी हक्कांना प्रोत्साहन देते : पंतप्रधान
आमच्यासाठी, लोकशाही ही केवळ एक व्यवस्था नाही, तर ती आमच्या मूलभूत मूल्यांचा एक भाग आहे : पंतप्रधान
भारत आणि घानाच्या इतिहासावर वसाहतवादी राजवटीच्या खुणा आहेत; परंतु आपली आत्मभावना ही कायमच स्वतंत्र आणि निर्भय राहिली आहे : पंतप्रधान
दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेली जागतिक व्यवस्था वेगाने बदलत आहे; तंत्रज्ञानातील क्रांती, ग्लोबल साउथचा उदय आणि बदलती लोकसंख्यात्मक परिस्थिती हे घटक या बदलांच्या गती आणि व्याप्तीचे कारक घटक ठरत आहेत : पंतप्रधान
बदलत्या परिस्थितीमुळे जागतिक प्रशासनात विश्वासार्ह आणि प्रभावी सुधारणांची गरज आहे : पंतप्रधान
ग्लोबल साउथला प्रतिनिधीत्व दिल्याशिवाय प्रगती साध्य करता येऊ शकत नाही : पंतप्रधान
आज, भारत ही सर्वात वेगाने वाढणारी उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे : पंतप्रधान
भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचे केंद्र आहे, जिथे जागतिक कंपन्या येऊ पाहत आहेत : पंतप्रधान
एक मजबूत भारत अधिक स्थिर आणि समृद्ध जगाच्या निर्मितीत योगदान देईल : पंतप्रधान

माननीय अध्यक्ष महोदय,

सभागृहाचे नेते,

संसदेचे माननीय सदस्य,

कौन्सिल ऑफ स्टेटचे सदस्य,

डिप्लोमॅटिक कोरचे सदस्य,

राजकीय पक्षांचे प्रतिनिधी

गा मान तासे

घटनात्मक संस्था,

नागरी संस्था,

घाना मधील भारतीय समुदाय,

माछे!

शुभ प्रभात!

या प्रतिष्ठेच्या सभागृहाला संबोधित करणे हा माझा मोठा सन्मान आहे.

लोकशाही, प्रतिष्ठा आणि संयम  यांच्या भूमीने तळपत्या या  घानाच्या

भूमीवर येणे ही माझ्यासाठी भाग्याची  गोष्ट आहे. जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचा प्रतिनिधी म्हणून मी माझ्या समवेत 140 कोटी भारतीयांच्या सद्भावना आणि शुभेच्छा घेऊन आलो आहे.

घाना हा सुवर्ण भूमी म्हणून ओळखला जातो ते केवळ या भूमीत सोने सापडते म्हणून नव्हे तर तुमच्या हृदयात असलेला स्नेह आणि सामर्थ्य यामुळेही ही ओळख आहे.आम्ही जेव्हा घानाकडे पाहतो तेव्हा इतिहासा पलीकडे जात धैर्याने तळपणारा देश म्हणून, प्रत्येक आव्हानाला अतिशय धीरोदात्तपणे  आणि नम्रतेने सामोरे जाणारा देश म्हणून आम्ही पाहतो. लोकशाही मूल्ये आणि सर्वसमावेशक प्रगती यांच्याप्रती आपली कटिबद्धता यामुळे घाना हा संपूर्ण आफ्रिका खंडासाठी खऱ्या अर्थाने  प्रेरणेचा दीपस्तंभ ठरला आहे.

मित्रहो,

काल संध्याकाळचा अनुभव खरोखरच अभूतपूर्व होता.माझे प्रिय मित्र, राष्ट्राध्यक्ष महामा यांच्याकडून  राष्ट्रीय पुरस्कार  स्वीकारणे हा सन्मान होता. मी तो  नेहमीच हृदयात जपून ठेवेन.

या सन्मानासाठी 140 कोटी भारतीयांच्या वतीनं मी घानाच्या

लोकांचे आभार मानतो.

या सन्मानासाठी, भारताच्या 140 कोटी लोकांच्या वतीने मी घानाच्या जनतेचे आभार मानतो.भारत आणि घाना यांना जोडणाऱ्या स्थायी मैत्री आणि सामायिक मूल्यांना हा सन्मान  मी समर्पित करतो. 

सन्माननीय सदस्यगण,

याआधी घानाचे लाडके सुपुत्र आणि द्रष्टे नेते डॉ क्वामे एन्क्रूमाह यांना मी आदरांजली  वाहिली.

त्यांनी म्हटले होते,

‘आपल्याला एकत्र आणणाऱ्या शक्ती  अंतर्निहित आहेत आणि आपल्याला विलग करणाऱ्या लादलेल्या प्रभावापेक्षा त्या मोठ्या आहेत’. 

त्यांचे हे शब्द आपल्या सामयिक  प्रवासाला मार्गदर्शन करत राहिले आहेत.भक्कम संस्थांवर उभारलेले लोकशाही प्रजासत्ताक हे त्यांचे स्वप्न होते. खरी लोकशाही ही चर्चा आणि वाद-संवादाला प्रोत्साहन देते. ती लोकांना एकत्र आणते.प्रतिष्ठेचा आदर करते आणि मानवी हक्कांचा पुरस्कार करते.लोकशाही मुल्ये वृद्धिंगत होण्यासाठी कदाचित वेळ लागू शकतो मात्र त्यांचे जतन आणि जोपासना करणे हे आपले दायित्व आहे.

मित्रहो,

भारत ही लोकशाहीची जननी आहे.

आमच्यासाठी लोकशाही ही एक व्यवस्था नव्हे तर संस्कार आहे.हजारो वर्षांपासून लोकशाहीने भारतीय समाजाला सातत्याने गती दिली आहे.हजारो वर्षांपासून आमच्याकडे वैशालीसारख्या केंद्रांची उदाहरणे आहेत.जगातल्या सर्वात जुन्या धर्मग्रंथांपैकी एक असलेल्या ऋग्वेदात म्हटले आहे :

आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः

म्हणजे दशदिशांनी आमच्याकडे सदविचार येवोत.

विचारातला हा खुलेपणा हा आमच्या लोकशाहीचा आत्मा आहे. भारतात अडीच हजारपेक्षा जास्त राजकीय पक्ष आहेत.मी पुन्हा एकदा सांगतो, अडीच हजार राजकीय पक्ष.वीस वेगवेगळे पक्ष विविध राज्यांमध्ये सत्तेवर आहेत,22 अधिकृत भाषा आणि हजारो बोली भाषा आहेत.

म्हणूनच भारतात येणाऱ्यांचे नेहमीच दिलदारपणे स्वागत केले जाते. हीच भावना जेव्हा भारतीय परदेशात जातात तेव्हा त्यांना तिथे एकरूप होण्यासाठी मदत करते.चहामध्ये साखर जशी विरघळते त्याप्रमाणे घानामधल्या समाजातही भारतीय एकरूप झाले आहेत.

सन्माननीय सदस्यगण,

भारत आणि घाना यांच्या इतिहासावर वसाहतवादी राजवटीचे ओरखडे  आहेत.मात्र आपली आत्मभावना नेहमीच खुली आणि भयमुक्त राहिली  आहे. आपल्या समृद्ध संस्कृती मधून आम्ही सामर्थ्य आणि प्रेरणा घेतो.आपल्या सामाजिक,सांस्कृतिक आणि भाषिक वैविध्याचा आम्हाला  अभिमान आहे. 

स्वातंत्र्य,एकता आणि प्रतिष्ठा यावर आधारित राष्ट्राची उभारणी आपण केली आहे आणि आपल्या परवानगीने मी म्हणू इच्छितो की आपल्या प्रसिद्ध अशा शुगरलोफ अननसापेक्षाही आपल्यातली मैत्री मधुर  आहे.राष्ट्राध्यक्ष महामा यांच्यासह आम्ही आपल्यातले बंध समावेशक भागीदारीमध्ये रुपांतरीत करण्याचा  निर्णय घेतला आहे.

मित्रहो,

दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक व्यवस्था झपाट्याने बदलत आहे. या व्यवस्थेची व्यापकता आणि गती  यामध्ये तंत्रज्ञानातली क्रांती,ग्लोबल साउथचा उदय आणि बदलती लोकसंख्यात्मक परिस्थिती या घटकांचे योगदान राहिले आहे.आधीच्या शतकांमध्ये वसाहतवादी राजवटीत मानवतेने झेललेली आव्हाने आजही वेगवेगळ्या रुपात कायम आहेत.

हवामान बदल,महामारी,दहशतवाद आणि सायबर सुरक्षा यासारख्या नव्या आणि गुंतागुंतीच्या आव्हानांनाही जग तोंड देत आहे. त्याला प्रतिसाद देण्यासाठी मागील शतकात उभारलेल्या संस्थाना संघर्ष करावा लागत आहे.  जागतिक प्रशासनात विश्वासार्ह आणि प्रभावी बदल ही बदलत्या परिस्थितीची मागणी आहे.

गोबल साउथकडे लक्ष पुरविल्याखेरीज प्रगती शक्य नाही.निव्वळ  घोषणांच्या पलीकडे जात आपल्याला  कृती करावी लागेल.म्हणूनच  जी-20 च्या भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात ‘एक वसुंधरा,एक कुटुंब,एक भविष्य’ हा दृष्टीकोन घेऊन आम्ही कार्य केले.

जागतिक परीदृश्यात आफ्रिकेच्या योग्य  स्थानावर आम्ही भर दिला. आमच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आफ्रिकन महासंघ जी-20 चा स्थायी सदस्य झाला याचा मला आम्हाला अभिमान आहे.

 

मित्रहो, 

भारतासाठी -मानवता सर्वप्रथम हे आमचे तत्व आहे.

सर्वे भवन्तु सुखिनः ,

सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु ,

मा किश्चत दुःखभाग्भवेत्॥

यावर आमचा विश्वास आहे.

याचा अर्थ असा आहे-

‘सर्वजण सुखी राहावेत,

 

सर्वजण निरोगी राहावेत,

सर्वांनी मंगल पाहावे,

कोणाच्याही वाट्याला कोणतेही दुःख येऊ नये’.

हेच तत्वज्ञान बाळगत भारत जगाकडे पाहतो.कोविड महामारीच्या काळात याच तत्वज्ञानाने आमची कृती प्रेरित होती.आमचे मित्रराष्ट्र घाना सह 150 पेक्षा जास्त देशांना आम्ही लस आणि औषधे पुरवली.

हवामान बदलाला तोंड देण्यासाठी आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही LiFE   हे पर्यावरणाला अनुकूल जीवनशैली अंगीकारणारे अभियान सुरु केले आहे.

एक जग,एक सूर्य, एक ग्रीड;

निरामय ग्रहासाठी  एक जग,एक आरोग्य,

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी :सौर उर्जा आणि शाश्वतता यांना प्रोत्साहन देण्यासाठी

 

मार्जार कुळातील वन्य प्राण्यांसाठी आंतरराष्ट्रीय आघाडी : वन्यजीव संरक्षणासाठी

आणि जागतिक जैव इंधन आघाडी : स्वच्छ जैव इंधन आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा पुरस्कार करण्यासाठी.

संस्थापक सदस्य या नात्याने घाना या सप्टेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची आफ्रिकन प्रादेशिक बैठक आयोजित करणार आहे याचा मला आनंद आहे. अवघे जग हे एक कुटुंब आहे या आमच्या सामायिक  विश्वासाचे यातून दर्शन घडते. 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
E-Samudra: India’s digital push to reshape maritime governance

Media Coverage

E-Samudra: India’s digital push to reshape maritime governance
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 ऑगस्ट 2026
August 11, 2026

Champions on the Podium, Capital Unlocked, Digital Seas Opened: New India’s Winning Streak Under PM Modi