PM Modi inaugurates the Amma Two Wheeler Scheme in Chennai, pays tribute to Jayalalithaa ji
When we empower women in a family, we empower the entire house-hold: PM Modi
When we help with a woman's education, we ensure that the family is educated: PM
When we secure her future, we secure future of the entire home: PM Narendra Modi

सभ्य स्त्री पुरूषहो,

सेल्वी जयललीताजी यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्या जिथे असतील, तिथे त्या फार आनंदात असतील अशी खात्री मला वाटते.

त्यांचे स्वप्न असणाऱ्या या ‘अम्मा दुचाकी योजनेचा’ शुभारंभ करताना मला अतिशय आनंद होतो आहे. अम्मांच्या 70 व्या वाढदिवशी संपूर्ण तामिळनाडूमध्ये 70 लाख रोपे लावण्यात आली होती, असे मला सांगण्यात आले. महिलांचे सक्षमीकरण आणि निसर्गाचे रक्षण करण्याच्या कामी हे दोन्ही उपक्रम दीर्घकाळ लाभदायक ठरणारे आहेत.

मित्रहो,

जेव्हा आपण एका कुटुंबातील महिलेचे सक्षमीकरण करतो तेव्हा आपण संपूर्ण घराला सक्षम करतो. जेव्हा आपण एखाद्या महिलेला शिक्षणासाठी मदत करतो तेव्हा संपूर्ण कुटुंब साक्षर होईल, अशी खात्री आपल्याला वाटते. जेव्हा आपण तिच्या चांगल्या आरोग्यासाठी काळजी घेतो तेव्हा आपण त्यां संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतो. जेव्हा आपण तिचे भवितव्य सुरक्षित करतो तेव्हा आपण संपूर्ण घराचे भवितव्य सुरक्षित करतो. आम्ही याच दिशेने काम करीत आहोत.

मित्रहो,

सर्वसामान्य नागरिकांची जगण्यातील सुलभता वाढविण्याकडे केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आमच्या सर्व योजना आणि कार्यक्रम प्रयत्नशील आहेत. वित्तीय समावेशन असो, शेतकरी आणि लघु उद्योजकांना सुलभ पत पुरवठा असो, आरोग्यसेवा असो किंवा स्वच्छता असो, या मूलभूत मंत्राच्या आधारेच केंद्रातील रालोआ सरकारचे काम सुरू आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत, 11 कोटी पेक्षा जास्त कर्जे मंजूर करण्यात आली आहेत. कोणत्याही बँक हमीशिवाय लोकांना 4 लाख 60 हजार कोटी रूपये प्रदान करण्यात आले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे यात 70 टक्के लाभार्थी या महिला आहेत.

भारतातील महिला आता पुरातन रूढींची चौकट मोडून स्वयंरोजगाराकडे वळत आहेत, हे या योजनेच्या यशातून स्पष्ट होते आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही आणखीही पावले उचलली आहेत. नव्या महिला कर्मचाऱ्यांचे EPF योगदान तीन वर्षांसाठी 12 टक्क्यांऐवजी 8 टक्के करण्याची घोषणा आम्ही नुकतीच अर्थसंकल्पात केली. नियोक्त्यांचे योगदान मात्र 12 टक्केच कायम राहिल.

स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना 10 लाख ते 1 कोटी रूपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. कारखाना अधिनियमातही आम्ही बदल केला असून त्यानुसार महिलांनाही रात्र पाळी करू देण्याची सूचना राज्य सरकारांना केली आहे. प्रसूती रजेचा अवधीही 12 आठवड्यांवरून 26 आठवड्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरांची नोंदणी महिलांच्या नावे केली जाते.

जन धन योजनेमुळेही महिलांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळाला आहे. जन धनच्या एकूण 31 कोटी खात्यांपैकी 16 कोटी खाती महिलांची आहेत.

महिलांच्या एकूण बँक खात्यांचे प्रमाण 2014 साली 28 टक्के होते, हे प्रमाण आता 40 टक्क्यांवर पोहोचले आहे. स्वच्छ भारत अभियानाने महिलांना आदर आणि बहुमान मिळवून दिला आहे, जो त्यांचा अधिकारही आहे. देशाच्या ग्रामीण भागातील स्वच्छतेची व्याप्ती 40 टक्क्यांवरून 78 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. सर्व सरकारी शाळांमध्ये विद्यार्थीनींना प्रसाधनगृहे पुरविण्यासाठी आम्ही मोहिम स्तरावर काम केले आहे.

मित्रहो,

नागरिकांचे सक्षमीकरण करतानाच केंद्र सरकारच्या योजना निसर्गाचेही संरक्षण करीत आहेत. उजाला योजनेंतर्गत, आतापर्यंत 29 कोटी एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे वीज बिलात 15 हजार कोटी रूपयांची बचत झाली आहे. यामुळे कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणातही लक्षणीय घट झाली आहे.

उज्वला योजनेंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत 3.4 कोटी मोफत गॅस जोडण्या दिल्या आहेत. यामुळे महिलांना धूरमुक्त वातावरणात काम करता येते, त्याचबरोबर केरोसिनचा वापर कमी झाल्यामुळे त्याचाही पर्यावरणाला लाभ होतो आहे. तामिळनाडूमधील साडे नऊ लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

ग्रामीण भागात गॅसपुरवठा आणि स्वच्छतेचा मुद्दा लक्षात घेत केंद्र सरकारने गोबर धन योजना आणली आहे. प्राण्यांचे मलमूत्र आणि शेतीतून निघणारा कचरा वापरून कंपोस्ट, बायो गॅस आणि बायो सीएनजी तयार करता येईल. त्यामुळे उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच गॅसवरील खर्चातही बचत होईल.

मित्रहो,

तामिळनाडूमध्ये केंद्र सरकारतर्फे सध्या 24 हजार कोटी रूपये मूल्यापेक्षा जास्त मूल्याचे प्रकल्प राबवले जात आहेत. रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर हे सर्व प्रकल्प सुरू झाले आहेत. त्यात सौर उर्जा प्रकल्प, कच्च्या तेलाच्या वाहिन्या, राष्ट्रीय महामार्ग आणि बंदरांसंबंधी कामांचा समावेश आहे. चेन्नई मेट्रो रेल्वेसाठी 3700 कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

केंद्रात जेव्हा काँग्रेसप्रणीत सरकार होते तेव्हा 13 व्या वित्त आयोगांतर्गत तामिळनाडूला 81 हजार कोटी रूपये प्राप्त झाले होते. रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर 14 व्या वित्त आयोगांतर्गत, तामिळनाडूला एक लाख 80 हजार कोटी रूपये प्राप्त झाले. ही सुमारे 120 टक्के वाढ आहे.

प्रत्येक गरीबाला 2022 सालापर्यंत घर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये एक कोटी घरे बांधून झाली आहेत.

तामिळनाडूमध्ये ग्रामीण भागात गृहनिर्माणासाठी 2016-17 साली सुमारे 700 कोटी रूपये आणि 2017-18 साली सुमारे 200 कोटी रूपये देण्यात आले. शहरी भागात याच कामासाठी राज्याला 6000 कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली.

मित्रहो,

तामिळनाडूमधील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचाही चांगला लाभ झाला आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत तामिळनाडूमधील शेतकऱ्यांना वीमा दाव्यापोटी 2600 कोटी रूपयांची रक्कम वितरित केल्याचे मला सांगण्यात आले.

तामिळनाडूमध्ये मत्स्योद्योगाचे आधुनिकीकरण करण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे. नील क्रांती योजनेंतर्गत, लॉंग लायनर ट्रॉलर्स घेण्यासाठी आम्ही मच्छीमारांना सहाय्य करत आहोत. राज्यातील सातशे पन्नास बोटी लॉंग लायनर ट्रॉलर्समध्ये परिवर्तीत करण्यासाठी आम्ही राज्य शासनाला गेल्या वर्षी 100 कोटी रूपये दिले. मच्छिमारांचे आयुष्य सोपे करण्याबरोबरच या ट्रॉलर्समुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.

भारताला लाभलेले विशाल समुद्र आणि प्रदीर्घ किनारपट्टीमुळे अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. मालवाहतूक क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकार सागरमाला प्रकल्पावर काम करत आहे.यामुळे देशांतर्गत तसेच परदेशी मालवाहतुकीचा खर्चही कमी होईल. तसेच किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांनाही त्याचा लाभ मिळेल.

केंद्रीय अर्थसंकल्पात आम्ही नुकतीच आयुष्मान भारत योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत विशिष्ट रूग्णालयांमध्ये प्रत्येक गरीब कुटुंबाला 5 लाख रूपये मूल्यापर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार दिले जातील. देशातील 45 ते 50 कोटी नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना आणि जीवन ज्योती योजनेंतर्गत 18 कोटी पेक्षा जास्त नागरिकांना विमा कवच देण्यात आले आहे. जन औषधी केंद्रांच्या माध्यमातून परवडण्याजोग्या दरात औषधे उपलब्ध करून देण्यासारख्या योजनाही आम्ही हाती घेतल्या आहेत.

नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्याच्या कामी आम्ही कायम वचनबद्ध राहू.

मी पुन्हा एकदा सेल्वी जयललीताजी यांच्याप्रती आदराची भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देतो.

धन्यवाद.

मनापासून धन्यवाद.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Modi era: From the resolve of a developed India to the renaissance of Devbhoomi

Media Coverage

Modi era: From the resolve of a developed India to the renaissance of Devbhoomi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारताचे सर्वात जास्त काळ पदभार सांभाळणारे निर्वाचित पंतप्रधान बनल्याबद्दल जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले
June 09, 2026

भारताच्या पंतप्रधानपदी निवडून येऊन सर्वाधिक काळ पदभार सांभाळत असण्याच्या पूर्वसंध्येला जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.संपूर्ण जगभरातील प्रमुख नेत्यांनी पंतप्रधानांच्या परिवर्तनकारी प्रशासनाला, ग्लोबल साउथ देशांचा पुरस्कार करण्याला आणि समावेशक तसेच आर्थिकदृष्ट्या चैतन्यमय भारताच्या उभारणीच्या संकल्पनेची प्रशंसा केली आहे.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके  यांनी 08 जून 2026 रोजी पंतप्रधानांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांचे सरकार तसेच श्रीलंकेच्या जनतेकडून मोदी यांचे सस्नेह अभिनंदन केले आहे. त्या पत्रात म्हटले आहे: “हा महत्त्वाचा टप्पा म्हणजे केवळ  तुमच्या कार्यकाळाचा अवधी नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमधील जनतेने पुनःपुन्हा तुमच्यावर दाखवलेला विश्वास आणि भरवसा याचे देखील द्योतक आहे.” भारतात घडलेले उल्लेखनीय आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन देखील राष्ट्राध्यक्षांनी अधोरेखित केले तसेच पंतप्रधान मोदी यांच्या विचारांनी श्रीलंकेसह भारताच्या सीमेवरील अनेक देशांना प्रेरणा दिली आहे असे देखील नमूद केले. पंतप्रधान मोदी यांनी 4 ते 6 एप्रिल 2025 या कालावधीत श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यांची ही चौथी श्रीलंका भेट होती आणि या भेटीदरम्यान मोदी यांना परदेशी मान्यवरांना दिला जाणारा ‘मित्र विभूषण’ हा श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या या भेटीमुळे भारताच्या ‘शेजारी राष्ट्र सर्वप्रथम’ धोरणाची पुष्टी झाली आणि वर्ष 2022 मध्ये श्रीलंका आर्थिक अडचणीत असताना भारताने दिलेल्या महत्त्वपूर्ण सहयोगासह भारताच्या भक्कम भागीदारीच्या सर्वात जवळच्या लाभार्थ्यांपैकी श्रीलंका हा एक देश आहे याची देखील ग्वाही मिळाली.

पापुआ न्यू गिनीचे राष्ट्राध्यक्ष जेम्स मारापे यांनी एका वैयक्तिक व्हिडिओ संदेशात पंतप्रधान मोदींचे वर्णन "एक आदर्श नेतृत्वाचे उत्तम उदाहरण" असे केले. "20 कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढून त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देणे ही अद्भुत कामगिरी आहे." त्यांनी असेही नमूद केले. मारापे यांनी पापुआ न्यू गिनीची भारताशी असलेली स्नेहपूर्ण मैत्री आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली. भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेसाठी मे 2023 मध्ये पंतप्रधान मोदींनी पापुआ न्यू गिनीला दिलेली भेट ऐतिहासिक होती. भारतीय पंतप्रधानांनी प्रथमच त्या देशाला भेट होती आणि पॅसिफिक द्वीपसमूह राष्ट्रांशी भारताच्या संबंधांमधील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला, हे त्यांनी अधोरेखित केले. या भेटीमुळे ग्लोबल साउथ देशांच्या  समूहाचा कटिबद्ध भागीदार म्हणून भारताची भूमिका सुस्पष्ट झाली.

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान  कमला प्रसाद-बिसेसर यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, की "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक मुद्द्यांवर बुलंद आवाज म्हणून उदयास आला आहे." अत्यंत सामान्य पार्श्वभूमीपासून ते 1.4 अब्ज लोकसंख्या असलेल्या राष्ट्राचे सलग तीन कार्यकाळांसाठी नेतृत्व करण्यापर्यंतच्या पंतप्रधान मोदी यांच्या प्रवासावर त्यांनी प्रकाश टाकला; तसेच परराष्ट्र धोरण, आर्थिक विकास, पायाभूत सुविधा आणि सामाजिक-आर्थिक विकास या क्षेत्रांमधील भारताच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी 3-4 जुलै 2025 रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगोला भेट दिली. ही तब्बल 26 वर्षांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांनी दिलेली द्विपक्षीय भेट होती. ती त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये भारतीय स्थलांतरित लोकांच्या आगमनाचा 180 वा वर्धापन दिन साजरा होत असताना झाली हे त्यांनी आवर्जून नमूद केले.