Our government is working tirelessly to ensure no family remains without a LPG connection: PM Modi
The growing number of women entrepreneurs is a blessing for our society: PM Modi in Aurangabad
Our government is committed to further encourage more women to become entrepreneurs and provide them all the support they need: PM Modi

भारत माता की- जय

भारत माता की – जय

मंचावर उपस्थित मान्यवर आणि दूर-दूरवरून मोठ्या संख्येने आलेल्या माता-भगिनी आणि मित्रहो,मी पाहतोय की अगदी लांबवर भगिनी उभ्या आहेत,इतक्या दूरवरून  कदाचित त्यांना मंच स्पष्ट दिसतही नसेल.तरीही इतक्या मोठ्या संख्येने आपण आलात,आम्हा सर्वाना आशीर्वाद दिलात, मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे.

आपण सर्व,देशाच्या विकासात,आपल्या गावाला,खेड्याला,आपल्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सबल करण्यासाठी मोठी भूमिका निभावत आहात.स्वयं सहाय्यता गटांच्या माध्यमातून,देशाला सशक्त करणाऱ्या,नवा भारत घडवण्यासाठी कार्य करणाऱ्या आपणा सर्व माता-भगिनींना मी प्रणाम करतो.भगिनी पंकजा यांचे मी विशेष अभिनंदन करतो.

मित्रहो, औरंगाबादच्या विकासाशी संबंधित एका महत्वाच्या इमारतीचं थोड्या वेळापूर्वीच आज उद्‌घाटन झाले. औरंगाबाद औद्योगिक शहराची इमारत आता तयार आहे.नव्या औरंगाबादची ही महत्वाची इमारत असेल.या इमारतीतून संपूर्ण औद्योगिक शहराच्या अनेक व्यवस्थांचे नियंत्रण होईल.

मित्रहो, औरंगाबाद, नवी स्मार्ट सिटी तर होत आहेच त्याचबरोबर देशाच्या औद्योगिक घडामोडींचे मोठे केंद्रही ठरणार आहे.दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरीडॉरचाही हा एक महत्वाचा भाग आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी इथे काम सुरु केले आहे.येत्या काळात आणखी कंपन्या इथे  येतील. या कंपन्या इथल्या लाखो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी प्रदान करतील.

मित्रहो, औरंगाबाद आज एका महत्वाच्या संकल्प पूर्तीचा साक्षीदार ठरत आहे. हे यश,देशाच्या कोट्यावधी भगिनींचे  आहे. 

उज्वला योजने अंतर्गत 8 कोटी मोफत गॅस कनेक्शन देण्याचा आम्ही जो संकल्प केला होता,त्याची आज या मंचावर,लाखो भगिनींच्या उपस्थितीत पूर्तता  झाली आहे.संकल्प  केवळ पूर्ण झाला इतकेच नव्हे तर नियोजित वेळेआधी 7 महिने हे उद्दिष्ट आम्ही साध्य केले आहे.

या 8 कोटी कनेक्शन पैकी 44 लाख, महाराष्ट्रात देण्यात आली आहेत.या यशासाठी मी आपणा सर्वांचे, देशाच्या प्रत्येक भगिनीचे, ज्यांना, चुलीच्या धुरापासून मुक्तता मिळाली आहे, या सर्वांचे मी अभिनंदन करतो. ही योजना यशस्वी होण्यासाठी ज्यांनी कठोर परिश्रम घेतले त्या सर्वांना नमन.

मित्रहो,चुलीच्या धुरात जीव  घुसमटणाऱ्या आपल्या भगिनींसाठी पाच कोटी  मोफत गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट आधी ठेवण्यात आले होते,गेल्या मार्चमध्ये यात  वाढ करून हे उद्दिष्ट 8 कोटी करण्यात आले.निवडणुकीच्या दरम्यान मी इथे आलो होतो तेव्हा हे उद्दिष्ट साध्य करण्याबाबत बोललो होतो. मला आनंद आहे की पुन्हा सरकार सत्तेवर आल्यानंतर 100 दिवसात  हे काम पूर्ण झाले.

मित्रहो, केवळ गॅस कनेक्शन देण्यापुरतेच हे काम मर्यादित नव्हते. यासाठी आणखी व्यापक व्यवस्था करण्यात आली. समग्र पद्धतीने काम करण्यात आले. फार मोठ्या  पायाभूत बाबी  यासाठी आवश्यक होत्या आणि अतिशय कमी वेळात त्या उभारण्यात आल्या. यासाठी 10,000 नवे एलपीजी वितरक तयार केले गेले, त्यांना जास्तीत जास्त संख्येने गावात नियुक्त करण्यात आले. गॅस सिलेंडरचा तुटवडा भासू नये यासाठी, देशभरात एलपीजी बॉटलिंगचे नवे कारखाने उभारण्यात आले. बंदरांच्या जवळच्या भागात, टर्मिनल क्षमता  वाढवण्याबरोबरच, सरकारने, गॅस वाहिन्यांच्या जाळ्याचा विस्तारही केला.

मित्रहो, देशात एकही कुटुंब एलपीजी कनेक्शनविना राहू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ही योजना आणखी सुलभ करण्यासाठी 5 किलोचे सिलेंडरही आणण्यात आले आहेत.देशाच्या अनेक भागात पाईप गॅस  पोहोचवण्याचे कामही वेगाने सुरु आहे.

बंधू-भगिनीनो, आणखी एक महत्वाचे अभियानआम्ही घेतले आहे, ज्याचा आपल्याशी थेट संबंध आहे, देशाच्या कोट्यावधी भगिनींशी आहे.आपणा सर्व भगिनींना पाण्यासाठी किती कष्ट उपसावे लागतात याची मला जाणीव आहे. देशातल्या भगिनींना या त्रासापासून वाचवण्यासाठी जल जीवन अभियान सुरु करण्यात आले आहे. या अंतर्गत, पाण्याची बचत करण्यासाठी, घरा-घरात पाणी पोहोचवण्यासाठी संपूर्ण देशाने संकल्प केला आहे. येत्या पाच वर्षात सुमारे साडेतीन लाख कोटी रुपये या अभियानावर खर्च केले जातील.

आपण कदाचित ऐकले असेल, राम मनोहर लोहिया यांनी 60-70 च्या दशकात संसदेत भाषण केले होते. हिंदुस्तानच्या महिलांचे दोन मुख्य प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण सोडवले पाहिजेत असे त्यांनी सांगितले होते. 60-70 च्या दशकात लोहिया यांनी हे सांगितले होते. कोणत्या दोन समस्या सांगितल्या, त्यांनी सांगितले की हिंदुस्तानच्या महिलांच्या दोन समस्या आहेत, एक म्हणजे स्वच्छतागृह आणि दुसरी पाणी. महिलांना स्वच्छता गृह उपलब्ध नाही आणि महिलांना घरासाठी पाणी नाही.या दोन समस्या सोडवल्या तर या देशाच्या महिला, देशाच्या समस्या सोडवण्याची ताकत बनतील.लोहियाजी आता आपल्यात नाहीत, सरकारे आली आणि गेली, नेते आले आणि गेले, मात्र आम्ही निश्चय केला आहे की प्रत्येक घरात स्वच्छतागृहही  असेल आणि प्रत्येक घरात पाणी सुद्धा असेल.

मराठवाड्याचे हे क्षेत्र याचे लाभार्थी असेल आणि आपण सर्व जण देवेंद्रजी यांच्या सरकारच्या समवेत प्रशंसनीय प्रयत्नही करत आहात. या भागात पाणी आणण्यासाठी त्यांच्या काय योजना आहेत हे त्यांनी आता सविस्तर सांगितले आहेच. मराठवाड्यात जे पहिले पाणी ग्रीड होत आहे तो प्रशंसनीय प्रयत्न आहे. हे ग्रीड झाल्यानंतर या भागात जास्त पाणी मिळू लागेल.  प्रत्येक गावापर्यंत पाणी आणि प्रत्येक शेतापर्यंत सिंचनासाठी पाणी  पोहोचवण्याला यामुळे मदत होणार आहे.

मित्रहो, शेतकऱ्याला सिंचनाच्या सुविधा देण्यापासून ते इतर अनेक बाबतीत केंद्र आणि राज्य सरकार पावले उचलत आहेत.प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात मदतीची रक्कम थेट जमा, 60 वर्षानंतर शेतकऱ्याला पेन्शनची सुविधा, पशुधनाच्या आरोग्यासाठी लसीकरण अभियान, यासारखी अनेक पाऊले उचलण्यात येत आहेत.

बंधू-भगिनीनो, गावांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपणा सर्वांची महत्वाची भूमिका आहे. स्वयं सहाय्यता गट, बचत गटाच्या माध्यमातून आपण जे काम करत आहात त्यातून आपले आपल्या कुटुंबाचे आर्थिक सबलीकरण होत आहे. जेव्हा कुटुंब आर्थिक दृष्ट्या सशक्त  होते तेव्हा देशाची ताकत आपोआप वाढते.

मित्रहो, देशाच्या विकासात आपली ही भूमिका पाहूनच गेल्या पाच वर्षात,बचत गटांचा आणखी विस्तार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या माध्यमातून, महिलांकरिता उद्योजकतेसाठी नव्या संधी निर्माण केल्या जात आहेत. नव भारतात,महिला कल्याणाच्या पुढे जाऊन,महिलांच्या नेतृत्वाखाली राष्ट्राचा विकास हा विचार घेऊन आपण पुढे जात आहोत.

याचसाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पात,स्वयं सहाययत गटांसाठी महत्वाची घोषणा करण्यात आली. महिला स्वयं सहाययता गटांसाठी,व्याजावर जे अनुदान मिळत होते ते आता संपूर्ण देशात लागू करण्यात येत आहे.त्याचप्रमाणे या बचत गटातल्या ज्या सदस्यांकडे, जन धन बँक खाते आहे त्याना 5 हजार रुपयांपर्यंत ओव्हर ड्रॉफ्टची अतिरिक्त सुविधा मिळणार आहे. सावकाराकडून जास्त व्याजाने पैसे घेण्याची गरज आता पडणार नाही. याचा अर्थ असा आहे की आपल्या खात्यात एकही पैसा नसला तरी आपण 5 हजार रुपये आपल्या गरजेसाठी काढू शकता. हे एक प्रकारे सुलभ कर्ज आहे, ज्याची सुविधा आपल्याला जन धन खात्यावर मिळेल.

याच प्रमाणे, मुद्रा योजने अंतर्गतही,प्रत्येक स्वयं सहाय्यता गटाच्या एका महिला सदस्याला 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी अथवा त्याचा विस्तार करण्यासाठी यामुळे मदत मिळणार आहे.

मित्रहो, महिलांना उद्योजक बनवण्यात, मुद्रा योजना महत्वाची भूमिका बजावत आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत, देशात 20 कोटी लाभार्थीना कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी 14 कोटी लाभार्थी महिला आहेत.महाराष्ट्रातही,मुद्रा योजनेच्या दीड कोटी लाभार्थी पैकी, सव्वा कोटी लाभार्थी माता- भगिनी आहेत. महिला उद्योजकतेच्या या क्षेत्रात घडणारे बदल आम्हाला अधिक वेगवान करायचे आहेत,अधिक मजबूत करायचे आहेत.यासाठी सरकारी स्तरावर जी पाऊले उचलावी लागतील ती आम्ही नक्की उचलू.

मित्रहो, स्वयं सहाय्यता गटाच्या रूपाने आपण आर्थिक सशक्तीकरणाचे माध्यम आहातच, त्याचबरोबर आपण सामाजिक परिवर्तनाचाही महत्वाचा घटक आहात. बालिकांचे जीवन वाचवण्यापासून ते त्यांचे शिक्षण आणि त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी, सरकारने अनेक पावले उचलली आहेत. देवेंद्रजी यांच्या सरकारनेही याबाबत प्रशंसनीय कामगिरी केली आहे. मात्र केवळ सरकारी योजना अथवा कायदा पुरेसा नाही.मुलींप्रती समाजाच्या मानसिकतेत व्यापक परिवर्तन घडवण्याची गरज आहे. यामध्ये आपणा माता- भगिनींची भूमिका महत्वाची आहे.

नुकतेच आपण पाहिलेत की मुस्लिम महिलांना त्रिवार तलाकच्या अनिष्ट रितीपासून सोडवण्यासाठी एक कायदा करण्यात आला आहे.आपल्याला समाजामध्ये याबाबत जागरूकता निर्माण करावी लागेल.

मित्रहो, नियोजित वेळेच्या आधीच आपण जेव्हा उद्दिष्ट साध्य करतो तेव्हा मोठे संकल्प साध्य करण्याचा उत्साह आपोआप वाढतो.सचोटी आणि प्रामाणिकपणाने काम केले जाते तेव्हा प्रयत्नांत कसूर राहत नाही. चंद्रयाना संदर्भातली नुकतीच आलेली बातमी आपल्याला माहीत असेलच. आपल्या वैज्ञानिकांनी एक मोठे लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात समस्या आली. या मोहिमेसाठी वैज्ञानिक कठोर परिश्रम घेत होते.

बंधू-भगिनींनो, काल रात्री आणि आज सकाळी मी त्यांच्या समवेत होतो. ते भावुक झाले होते मात्र मनोबल प्रचंड होते की आता आणखी वेगाने काम करायचे आहे, जे झाले त्यातून धडा घेऊन पुढे जायचे आहे. इसरो प्रमाणे कटीबद्धता ठेवूनच देशाचा विकास घडवत येऊ शकतो, लोकांचे जीवन अधिक सुकर करता येऊ शकते.

मित्रहो, वेगवेगळ्या क्षेत्रात अशा कटिबद्ध असलेल्या लोकांमुळे देशातल्या प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवणे, 8 कोटी गॅस कनेक्शन देणे अशी अनेक काम नियोजित वेळेआधीच पूर्ण झाली आहेत.आता लवकरच संपूर्ण देश,हागणदारी मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

2022 मधे स्वातंत्र्याची 75 वर्षे आपण साजरी करू त्यावेळेसाठी आपण जो संकल्प केला आहे तो नक्कीच पूर्ण होईल असा मला विश्वास आहे.

बंधू-भगिनींनो, 2022 पर्यंत,प्रत्येक गरीब कुटुंबाला पक्के घर देण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने आम्ही वेगाने आगेकूच करत आहोत. आतापर्यंत देशातल्या गावात आणि शहरात सुमारे 1 कोटी 80 लाख घरे तयार झाली आहेत. लाभार्थी त्यात राहायलाही गेले आहेत. काही लोक विचारतात,की गरिबांना घरे देण्याची योजना तर आधीपासून सुरू होती, निधीही आधी होता, मग तुम्ही वेगळे काय केले ?

सर्वात आधी मी सांगू इच्छितो की आम्हाला ‘हाऊस’ नव्हे तर ‘होम’ उभारायची आहेत हे आम्ही ठरवले होते. केवळ चार भिंती असलेले घर नव्हे तर आपल्या स्वप्नातलं घर उभे करायचे आहे.आम्हाला असे घर निर्माण करायचे होते जे सर्व सुविधांनी युक्त असेल. घराच्या नावाखाली फक्त चार भिंती उभारण्यापेक्षा आम्हाला वेगळी निर्मिती करायची होती. कमीत कमी वेळात, माफक खर्चात, जास्तीत जास्त सुविधा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

मित्रहो, आमच्या सरकारने जी घरे बांधली त्यासाठी कोणताही एक पक्का आराखडा ठेवला नाही,की अशीच घरे संपूर्ण देशात उभारली गेली पाहिजेत.घरे उभारताना आम्ही स्थानिक लोकांच्या गरजा आणि तिथल्या लोकांच्या इच्छा ही केंद्रस्थानी ठेवली आणि ती लक्षात घेऊनच घरे उभारण्याची योजना आखली. घरात सर्व प्रकारच्या आवश्यक सुविधा असाव्यात यासाठी आम्ही वेगवेगळ्या सरकारी योजना एकत्र आणल्या. ज्यायोगे घरात वीज, गॅस कनेक्शन, स्वच्छता गृह अशा सर्व सुविधा एकत्र मिळाव्यात.

ही घरे लोकांच्या अपेक्षेनुरूप निर्माण व्हावीत यासाठी आम्ही लोकांच्या गरजा त्यांच्याकडून ऐकून घेतल्या. त्यानंतर घराची जागा वाढवली आणि निर्मितीसाठीच्या रकमेतही वाढ करण्यात आली. या प्रक्रियेत स्थानिक कारागीर आणि कामगारांनाही सहभागी करून घेतले, झारखंड मधे गेलात तर आपल्याला राणी मिस्त्री यांचे नाव ऐकायला मिळेल.कोणत्याही वाढीव खर्चावाचून, कमीत कमी वेळात, लोकांच्या ताब्यात घरे कशी देता येतील यावर आम्ही लक्ष केंद्रित केले. यासाठी तंत्रज्ञानाचा एक महत्वपूर्ण भाग म्हणून उपयोग केला.

बंधू-भगिनींनो, आम्ही अशा लोकांचे स्वप्नही पूर्ण करण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न केला जे आपल्या स्वतःच्या मालकीचे घर घेऊ इच्छितात. परवडणाऱ्या दरातल्या घरांसाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता सरकारने, गृह कर्जावरच्या दीड लाख रुपयांच्या व्याजावर,प्राप्तिकरात अतिरिक्त सूट देण्याची तरतूद केली, ज्यायोगे मध्यम वर्गाला आपले स्वतःचे घर घेता येईल.

मित्रहो, आमचा भर पारदर्शकतेवरही राहिला आहे.घरांच्या निर्मितीच्या वेगवेगळ्या टप्प्यातली छायाचित्रे ऑनलाइन अपलोड केली. पारदर्शी पद्धतीने प्रशासनाला योग्य माहिती उपलब्ध करून देण्यात आली. एव्हढेच नव्हे, बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता खूपच अल्प होती. यामुळे घर खरेदी करणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. सरकारने रेरा कायदा आणून घर खरेदी करणाऱ्या लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम केले. आज अनेक राज्यात रेरा अधिसूचित करण्यात आला आहे. न्यायाधिकरणही काम करत आहे. या प्रकल्पाअंतर्गत लाखो नव्या सदनिका निर्माण करण्यात येत आहेत.

घरांच्या बाबतीत आम्ही समग्र दृष्टिकोन बाळगून काम केले आहे. वेगवेगळ्या योजना, एक-एक करून आम्ही घेऊन आलो असतो तर इतके यश मिळणे कठीण होते.सर्व विभाग,सर्व निर्णय, एक मोठे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून घेतले तरच मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट पुर्ती शक्य आहे. सर्व मंत्रालये आणि सर्व योजना मिळून एकाच दिशेने काम करतात. ही आमच्या सरकारच्या कामकाजाची ओळख आहे. तुकड्या तुकड्यात नव्हे तर समग्र विचार करा आणि सर्वाना एकत्र घेऊन काम करा.

मित्रहो, गेल्या पाच वर्षात स्वच्छतेपासून, बँकांद्वारे व्यवहारापर्यंत, समाजाच्या व्यवहार परिवर्तनाच्या सर्व जन चळवळीत आपणा सर्वांनी हिरीरीने योगदान दिले आहे. याच कारणामुळे येत्या पाच वर्षांसाठी जे संकल्प केले आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपणा सर्वांवर माझा विश्वास आहे. हा दृढ विश्वास अखंड राहील अशी आशा बाळगून आपण सर्वांचे खूप खूप आभार.

धन्यवाद. सणाच्या दिवशी इतक्या मोठ्या संख्येने माता- भगिनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे आल्या आहेत. या मातृशक्तीला नमन करून भाषण आवरते घेतो. माझ्यासमवेत, दोन्ही हात उंचावून म्हणा-

भारत माता की – जय

भारत माता की – जय

भारत माता की – जय

खूप खूप धन्‍यवाद!

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
18% tariffs, boosts to exports, agriculture protected: How India benefits from trade deal with US? Explained

Media Coverage

18% tariffs, boosts to exports, agriculture protected: How India benefits from trade deal with US? Explained
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi congratulates Sanae Takaichi on her landmark victory in Japan’s House of Representatives elections
February 08, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated H.E. Sanae Takaichi on her landmark victory in the elections to the House of Representatives of Japan.

The Prime Minister said that the Special Strategic and Global Partnership between India and Japan plays a vital role in enhancing global peace, stability and prosperity.

The Prime Minister expressed confidence that under H.E. Takaichi’s able leadership, the India-Japan friendship will continue to reach greater heights.

The Prime Minister wrote on X;

“Congratulations Sanae Takaichi on your landmark victory in the elections to the House of Representatives!

Our Special Strategic and Global Partnership plays a vital role in enhancing global peace, stability and prosperity.

I am confident that under your able leadership, we will continue to take the India-Japan friendship to greater heights.

@takaichi_sanae”