पंतप्रधानांच्या हस्ते रेल्वे, कृषी, ग्राम विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी
यंदाचा पश्चिम बंग दिवस अधिक विशेष आहे, स्वातंत्र्यानंतर बंगालच्या उज्ज्वल भविष्यासाठी महापुरुषांनी पाहिलेली स्वप्ने, इथल्या महान व्यक्तिमत्वांनी मांडलेले संकल्प आज खऱ्या अर्थाने साकार होत आहेत, एका अर्थाने आजच्या पश्चिम बंग दिनी आपण ही स्वप्ने प्रत्यक्षात साकारली जात असल्याचे पाहात आहोत : पंतप्रधान
ही ऐतिहासिक तारीख पश्चिम बंगालच्या विकासाची प्रेरणा बनो, आपण सर्व मिळून एक नवीन आणि गौरवशाली इतिहास घडवू या: पंतप्रधान
आज शेकडो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली, हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, कृषी आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्राशी संबंधित असून, बंगालच्या विकासाला नवी गती देतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देतील : पंतप्रधान
बंगालने रक्तपात सहन केला, बंगालने आपली स्वतःची माणसे गमावली आणि या राज्याने आपली मातृभूमी विभागली जात असल्याचे पाहिले, मात्र तरीही बंगालने आपली ओळख आणि स्वाभिमान कधीही नष्ट होऊ दिला नाही : पंतप्रधान
आज पश्चिमबंग दिन आपण केवळ एक तारीख म्हणून साजरी करत नसून, आपण एका संपूर्ण इतिहासाचे स्मरण करत आहोत, आपण बंगालच्या हजारो वर्षांच्या वारशाला अभिवादन करत आहोत : पंतप्रधान
2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे ध्येय पूर्ण करण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरु आहे, भारताच्या पूर्वेकडील भागाचा विकास करणे हाच या संकल्पाचा भक्कम पाया असणार आहे, यासाठी आम्ही मिशन पूर्वोदय वर काम करत आहोत: पंतप्रधान
ही संकल्पना पश्चिम बंगालची सांस्कृतिक समृद्धी, सामाजिक सलोखा आणि विकासात्मक आकांक्षेचे प्रतिनिधीत्व करणारी ठरली
Theme of IDY 2026: “Yoga for Healthy Ageing”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिमबंग दिन  सोहळ्यात सहभागी झाले . हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतींशी जोडले गेलेल्या ऐतिहासिक ठिकाणी या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  पश्चिम बंगाल: वारसा, सलोखा आणि विकास अशी यंदाच्या पश्चिमबंग दिवसाची मुख्य संकल्पना होती. ही संकल्पना पश्चिम बंगालची सांस्कृतिक समृद्धी, सामाजिक सलोखा आणि विकासात्मक आकांक्षेचे प्रतिनिधीत्व करणारी ठरली.

या कार्यक्रमात पंतप्रधानांनी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमीपूजन केले. रेल्वे, कृषी, रामीण विकास, मत्स्य व्यवसाय व पशुपालन क्षेत्रातील या प्रकल्पांमुळे राज्यातील पायाभूत सुविधा मजबूत होतील, राहणीमानात सुधारणा होईल, शेतकऱ्यांचे कल्याण होईल आणि राज्यभरात सामाजिक आर्थिक विकासाला चालना मिळेल.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा 23 वा हप्ता यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करण्यात आला. याअंतर्गत ₹ 18,880 कोटींपेक्षा अधिक निधी देशभरातील 9.44 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आला.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतरच्या व नवीन सरकारच्या सत्ता स्थापनेनंतरच्या राज्याच्या पहिल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली. हा ऐतिहासिक क्षण असून नवा आशावाद, विश्वास आणि राज्याच्या प्रगतीचे प्रतिबिंब यातून दिसून येते असे मोदी पश्चिम बंगालच्या आणि देशाच्या जनतेला शुभेच्छा देताना म्हणाले. “पश्चिम बंगालने विकास व राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने नवा प्रवास सुरू केला आहे. लोकांमध्ये असलेला उत्साह आणि राज्यभरातील सकारात्मक वातावरण यातून उज्ज्वल भविष्याबाबतचा वाढता विश्वास प्रतिबिंबित होत आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.

‘स्वच्छता से स्वागत’ उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल नागरिकांचे अभिनंदन करुन स्वच्छतेची सवय हा आपल्या जीवनशैलीचा तसेच शाश्वत विकासाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे असे आग्रही प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. पश्चिम बंगाल दिनाचे महत्त्व अधोरेखित करुन मोदी म्हणाले की, स्वातंत्र्य व फाळणीच्या काळात बंगालची सांस्कृतिक ओळख, वारसा आणि भारतातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी केल्या गेलेल्या त्यागाचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. बंगालमधील लोकांच्या हितासाठी व आकांक्षापूर्तीसाठी काम केलेल्या विचारवंतांना, सामाजिक नेत्यांना, विद्वानांना आणि सार्वजनिक जीवनातील प्रतिनिधींना त्यांनी आदरांजली वाहिली.

फाळणीच्या काळात बंगालचा भाग भारतातच राहावा यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या कार्याचे पंतप्रधानांनी स्मरण केले. त्या ऐतिहासिक चळवळीत मदत करणाऱ्या विद्वानांचा, विचारवंतांचा, समाज सुधारकांचा, सामाजिक नेत्यांचा आणि उद्योजकांचा त्यांनी उल्लेख केला.  “रविंद्रनाथ टागोर, बंकीमचंद्र चट्टोपाध्याय, स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाष चंद्र बोस आणि ईश्वर चंद्र विद्यासागर यांच्यासारख्या महान व्यक्तींनी साकारलेला पश्चिम बंगालचा समृद्ध वारसा यापुढेही देशाला प्रेरणा देत राहील. भविष्यातील पिढ्यांसाठी नव्या संधी निर्माण करतानाच हा वारसा जपण्याची व साजरा करण्याची गरज आहे,” असे मत मोदी यांनी व्यक्त केले.

अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या  आव्हानांना सामोरे जाण्यास  नवीन सरकारने सुरुवात केली असून,  ते विकासाला गती देण्यासाठी वेगाने काम  करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. राज्याची आर्थिक क्षमता विकसित करण्यासाठी त्वरित  निर्णय घेतले जात आहेत आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रकल्प पुनरुज्जीवित केले जात आहेत, असेही ते म्हणाले. “या कार्यक्रमादरम्यान रेल्वे, रस्ते, कृषी आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित शेकडो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. या उपक्रमांमुळे ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत होतील, संपर्क प्रणाली सुधारेल, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच रोजगार आणि विकासाच्या नवीन संधी निर्माण होतील”, हे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट हस्तांतरित केलेल्या पीएम-किसान योजनेच्या 23 व्या हप्त्याच्या वितरणावर प्रकाश टाकला. तसेच सर्व लाभार्थी शेतकरी कुटुंबांना शुभेच्छा दिल्या. राज्यातील नागरिकांनी आपल्या इतिहासातून प्रेरणा घ्यावी , असे आवाहन त्यांनी केले. पश्चिम बंगालमध्ये  सांस्कृतिक, बौद्धिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्‍ये प्रचंड सामर्थ्य आहे आणि  हे राज्य  पुन्हा एकदा भारताच्या विकासाच्या प्रवासात एक प्रमुख योगदानकर्ता म्हणून उदयास येऊ शकते,  ही गोष्‍ट  त्यांनी अधोरेखित केली. “पश्चिम बंगाल दिन हा केवळ इतिहासाचे स्मरण करण्याचा दिवस नाही , तर विकास, प्रगती आणि राष्ट्रीय ऐक्य याविषयी असलेल्या नूतन वचनबद्धतेचे प्रतीक म्हणूनही साजरा व्हायला हवा, असे ते म्हणाले. अधिक मजबूत आणि समृद्ध भारत घडवण्यात राज्यातील जनता अग्रगण्य भूमिका बजावेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालच्या जनतेला दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील प्रत्येक पात्र गरीब कुटुंबाला आता आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळेल, अशी घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर पंतप्रधानांनी  अन्नपूर्णा योजनेची अंमलबजावणी, जल जीवन मिशनच्या माध्यमातून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची वाढलेली उपलब्धता, सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादेत शिथिलता आणि महिलांसाठी मोफत बस प्रवासाची अंमलबजावणी यावरही प्रकाश टाकला. “वर्षानुवर्षे रखडलेल्या कल्याणकारी योजना आता सार्वजनिक संपर्क शिबिरांच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जात असल्याने पारदर्शकता, कार्यक्षमता सुनिश्चित होत आहे आणि दलालांचा नायनाट होत आहे”, असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना मोदी यांनी पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रकाश टाकला. अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प आता वेगाने पुढे सरकत आहेत. यामध्ये कोलकाता मेट्रोच्या ऑरेंज लाईनचे चिंगरीघाटा क्रॉसिंग येथील काम पूर्ण करणे, हावडा येथील नवीन विभागीय रेल्वे रुग्णालयाची पायाभरणी, पूर्व मेदिनीपूरमधील रस्त्यावरील उन्नत सेतू  आणि संक्राईल-संत्रागाछी रेल्वे लिंक प्रकल्पाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या कल्याणावर भर देत पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमध्ये 'प्रधानमंत्री पीक विमा योजने'च्या शुभारंभाचे स्वागत केले, त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या बदल्यामध्‍ये  आर्थिक सुरक्षा मिळेल. त्यांनी पश्चिम बंगालचा 'डिजिटल ॲग्रीकल्चर मिशन'मध्ये (डिजिटल कृषी अभियान) समावेश करण्याची घोषणाही केली; यामुळे शेतकरी नोंदणी पुस्तिका, डिजिटल जमिनीच्या नोंदी आणि कृषी सेवा आणि  लाभांचे वितरण अधिक चांगल्या प्रकारे करणे शक्य होईल. पीएम धन धान्य कृषी योजनेअंतर्गत पश्चिम बंगालमधील पुरुलिया, दार्जिलिंग, अलिपुरदुआरा आणि झारग्राम या चार जिल्ह्यांना कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी, साठवणुकीच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि सुलभ कर्जपुरवठा मिळवून देण्यासाठी विशेष मदत दिली जाईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

राज्याच्या अर्थव्यवस्थेत मत्स्यव्यवसायाचे असलेले महत्त्व ओळखून मोदी यांनी, दक्षिण 24 परगणामधील फ्रेझरगंज फिशिंग हार्बरचा म्हणजेच मासेमारी बंदराचा  विस्तार आणि बीरभूम येथे आधुनिक मासळी बाजाराच्या विकासाचा आवर्जून उल्लेख केला. यामुळे रोजगार वाढण्यास आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राला बळकटी मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. यासोबतच, पंतप्रधानांनी देशभरातील शेतकऱ्यांना सरकारच्या "शेत वाचवा अभियानात" (खेत बचाओ अभियान) सहभागी होण्याचे आवाहन केले, जे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्यास आणि नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देते.

2047 पर्यंत 'विकसित भारत' घडवण्याच्या सरकारच्या संकल्पाचा पुनरुच्चार करताना पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून सांगितले की, 'पूर्वोदय उपक्रमा'अंतर्गत पूर्व भारताचा विकास हा या मोहिमेचा मुख्य केंद्रबिंदू असून, प्रादेशिक आणि राष्ट्रीय विकासाला गती देण्यात पश्चिम बंगालची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शाश्वत विकासासोबतच शांतता, सामाजिक सलोखा आणि संस्कृतीचे जतन होणे गरजेचे आहे; तसेच बंगालचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक वीण अधिक मजबूत करत आपण सर्वांच्या सामूहिक प्रगतीसाठी एकत्र काम केले पाहिजे, यावर मोदी यांनी भर दिला.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी राज्यातील जनतेला 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. स्वामी विवेकानंद आणि श्री अरविंद यांची ही भूमी योग, आरोग्य आणि मानवी एकतेच्या संदेशाद्वारे संपूर्ण जगाला पुन्हा एकदा नक्कीच प्रेरित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending

Media Coverage

Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026