विक्रम साराभाई अंतराळ केंद्र (व्हीएसएससी),तिरुवनंतपुरमला पंतप्रधान भेट देणार आणि सुमारे 1800 कोटी रुपये खर्चाच्या अंतराळ संबंधी तीन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे करणार उद्घाटन
या प्रकल्पांमध्ये श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात ‘पीएसएलव्ही एकात्मीकरण सुविधा’, महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये ‘सेमी-क्रायोजेनिक्स इंटिग्रेटेड इंजिन आणि स्टेज चाचणी सुविधा’; आणि व्हीएसएससी येथे 'ट्रायसोनिक विंड टनल' यांचा आहे समावेश
पंतप्रधान गगनयानच्या प्रगतीचाही घेणार आढावा
पंतप्रधान तामिळनाडूमध्ये 17,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे करणार उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी
देशाच्या पूर्व किनारपट्टीसाठी ट्रान्सशिपमेंट हब स्थापन करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून, पंतप्रधान व्ही. ओ. चिदंबरनार बंदर येथे बाह्य हार्बर कंटेनर टर्मिनलची करणार पायाभरणी
पंतप्रधानांच्या हस्ते भारतातील पहिल्या स्वदेशी हरित हायड्रोजन इंधन सेल वरील अंतर्देशीय जलमार्ग जहाजाचे होणार उद्घाटन
मदुराईमध्ये वाहन निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो एमएसएमई उद्योजकांना पंतप्रधान करणार संबोधित
पंतप्रधान महाराष्ट्रात 4900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे, रस्ते आणि सिंचनाशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे करणार उद्घाटन आणि लोकार्पण
पंतप्रधान पीएम -किसान अंतर्गत सुमारे 21,000 कोटी रुपयांचा 16 वा हप्ता ; आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ अंतर्गत सुमारे 3800 कोटी रुपयांचा दुसरा आणि तिसरा हप्ता करणार जारी
पंतप्रधान महाराष्ट्रातील 5.5 लाख महिला बचत गटांना 825 कोटी रुपयांचा फिरता निधी वितरित करणार
संपूर्ण महाराष्ट्रात एक कोटी आयुष्मान कार्ड वितरणाचा पंतप्रधान करणार प्रारंभ
मोदी आवास घरकुल योजनेचा पंतप्रधान करणार प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27-28 फेब्रुवारी 2024 रोजी केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्राला भेट देणार आहेत.

27 फेब्रुवारी रोजी, सकाळी 10:45 वाजता, पंतप्रधान केरळमधील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला (व्हीएसएससी) भेट देतील. संध्याकाळी  5:15 वाजता, पंतप्रधान तामिळनाडूत   मदुराई येथे  ‘क्रिएटिंग द फ्युचर – डिजिटल मोबिलिटी फॉर ऑटोमोटिव्ह एमएसएमई आंत्रप्रुनर्स ’ या कार्यक्रमात सहभागी होतील.

28 फेब्रुवारी रोजी, सकाळी 9:45 वाजता, पंतप्रधान तामिळनाडूच्या थुथुकुडी येथे सुमारे 17,300 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. दुपारी 4:30 वाजता, पंतप्रधान महाराष्ट्रात यवतमाळ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील आणि यवतमाळ येथे 4900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील. कार्यक्रमादरम्यान ते पीएम किसान आणि इतर योजनांतर्गत दिले  जाणारे लाभ  जारी करतील.

पंतप्रधान केरळमध्ये

तिरुवनंतपुरमच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या भेटीदरम्यान तीन महत्त्वाच्या अंतराळ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान करणार असून यामुळे देशाच्या अंतराळ क्षेत्राची  पूर्ण क्षमता साकारण्यासाठी त्यात सुधारणा घडवून आणण्याचा पंतप्रधानांचा दृष्टीकोन आणि या क्षेत्रातील तांत्रिक तसेच संशोधन आणि विकास क्षमता वाढविण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला चालना मिळणार आहे .

या प्रकल्पांमध्ये सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथे पीएसएलव्ही एकात्मीकरण सुविधा ,  महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये नवीन ‘सेमी-क्रायोजेनिक्स इंटिग्रेटेड इंजिन आणि स्टेज चाचणी सुविधा ’; आणि व्हीएसएससी, तिरुवनंतपुरम येथे ‘ट्रायसोनिक विंड टनल’ यांचा समावेश आहे . अंतराळ क्षेत्रासाठी जागतिक दर्जाच्या तांत्रिक सुविधा पुरवणारे हे तीन प्रकल्प सुमारे 1800 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आले आहेत.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील पीएसएलव्ही एकात्मीकरण सुविधा पीएसएलव्ही प्रक्षेपणांची वारंवारता वार्षिक 6 वरून 15 पर्यंत वाढवण्यात मदत करेल. ही अत्याधुनिक सुविधा एसएसएलव्ही आणि खाजगी अंतराळ कंपन्यांनी डिझाइन केलेल्या इतर लघु प्रक्षेपण वाहनांच्या प्रक्षेपणाची गरज देखील पूर्ण करेल.

आयपीआरसी महेंद्रगिरी येथे नवीन ‘सेमी-क्रायोजेनिक इंटिग्रेटेड इंजिन आणि स्टेज चाचणी सुविधा' सेमी क्रायोजेनिक इंजिन आणि त्याचे टप्पे विकसित करण्यास उपयुक्त ठरेल ,  ज्यामुळे सध्याच्या प्रक्षेपण वाहनांची पेलोड क्षमता वाढेल. 200 टन थ्रस्टपर्यंतच्या इंजिनची चाचणी घेण्यासाठी ही सुविधा द्रवरूप  ऑक्सिजन आणि केरोसीन पुरवठा प्रणालीने  सुसज्ज आहे.

हवेत  उड्डाण करताना रॉकेट आणि विमानांच्या वैशिष्ट्यांच्या वायुगतिशास्त्रीय चाचणीसाठी विंड टनेल्स  आवश्यक आहेत. व्हीएसएससी मधील "ट्रायसोनिक विंड टनेल" चे उद्घाटन केले जाणार असून  ही एक जटिल तंत्रज्ञान विषयक प्रणाली आहे जी आपल्या भविष्यातील तंत्रज्ञान विकासाच्या गरजा पूर्ण करेल.

या दौऱ्यात पंतप्रधान गगनयान मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतील आणि यातून अंतराळात जाण्यासाठी निवड झालेल्या अंतराळवीरांना ‘अंतराळवीर पंख’ प्रदान करतील. गगनयान मोहीम हा भारताचा पहिला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम आहे ज्यासाठी इस्रोच्या विविध केंद्रांवर विशेष  तयारी सुरू आहे.

तामिळनाडूमध्ये पंतप्रधान

मदुराईमध्ये पंतप्रधान ‘क्रिएटिंग द फ्युचर – डिजिटल मोबिलिटी फॉर ऑटोमोटिव्ह एमएसएमई आंत्रप्रुनर्स  ’ या कार्यक्रमात सहभागी होतील आणि वाहन निर्मिती क्षेत्रात  काम करणाऱ्या हजारो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातील (एमएसएमई) उद्योजकांना संबोधित करतील. पंतप्रधान भारतीय वाहन निर्मिती उद्योगातील एमएसएमईंना पाठबळ  देण्यासाठी आणि त्यांचे उत्थान करण्यासाठी तयार  केलेल्या दोन प्रमुख उपक्रमांचा शुभारंभ देखील करतील. या उपक्रमांमध्ये टीव्हीएस ओपन मोबिलिटी प्लॅटफॉर्म आणि टीव्हीएस मोबिलिटी-सीआयआय सेंटर ऑफ एक्सलन्स यांचा समावेश आहे. देशातील एमएसएमईच्या वाढीला सहाय्य करण्याच्या आणि त्यांना परिचालन तसेच जागतिक मूल्य साखळ्यांबरोबर एकत्रीकरण करण्यासाठी आणि स्वयंपूर्ण बनण्यासाठी मदत करण्याची पंतप्रधानांची कल्पना साकारण्यासाठी हे  उपक्रम एक महत्वाचे पाऊल ठरतील.

तुतूकुडी येथील जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान व्ही. ओ. चिदंबरनार बंदरामधील, आऊटर हार्बर कंटेनर टर्मिनलची पायाभरणी करतील. हे कंटेनर टर्मिनल व्ही. ओ. चिदंबरनार बंदराला पूर्व किनाऱ्यासाठीचे मालवाहू व्यापार केंद्रामध्ये रूपांतरित करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. भारताच्या लांबलचक  किनारपट्टीचा आणि अनुकूल भौगोलिक स्थानाचा लाभ घेणे आणि जागतिक व्यापार क्षेत्रात भारताची स्पर्धात्मकता मजबूत करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पामुळे या प्रदेशात रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकास होईल.

व्ही. ओ. चिदंबरनार बंदराला देशातील पहिले हरित हायड्रोजन केंद्र असलेले बंदर बनवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान इतर अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करतील. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारे केंद्र, हायड्रोजन उत्पादन आणि बंकरिंग सुविधा आदी प्रकल्पांचा यात समावेश आहे.

पंतप्रधान या दौऱ्यात हरित नौका उपक्रमांतर्गत, भारतातील पहिले स्वदेशी हरित हायड्रोजन इंधनावरील देशांतर्गत प्रवासी जहाजाचे उद्घाटन करतील. या जहाजाची निर्मिती कोचीन शिपयार्डने केली असून, स्वच्छ ऊर्जा उपाय स्वीकारण्याच्या आणि देशाच्या निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जनाच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने एक महत्वाचे पाऊल आहे. पंतप्रधान या  कार्यक्रमादरम्यान देशातील दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 75 दीपगृहांच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पर्यटन सुविधांचे लोकार्पण करतील.

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान, वांची मनियाच्ची - तिरुनेलवेली विभाग आणि मेलापलायम - अरल्वायमोली विभागासह वांची मनियाच्ची - नागरकोइल रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या राष्ट्रीय रेल्वे मार्ग प्रकल्पांचे लोकार्पण करतील. सुमारे रु. 1,477 कोटी खर्चाचा हा दुपदरीकरण प्रकल्प कन्याकुमारी, नागरकोइल आणि तिरुनेलवेली येथून चेन्नईकडे जाणाऱ्या गाड्यांचा प्रवासाचा वेळ कमी करेल.

पंतप्रधान तामिळनाडूमध्ये सुमारे रु. 4,586 कोटी खर्चाने विकसित केलेल्या चार रस्ते प्रकल्पांचेही लोकार्पण करतील. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग-844 च्या जित्तांदहल्ली-धर्मपुरी विभागाचे चौपदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग-81 च्या मीनसुरत्ती-चिदंबरम विभागातील महामार्गालगत मार्गाचे दुपदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग -83 च्या ओडनचात्रम-मदथुकुलम विभागाचे चौपदरीकरण आणि राष्ट्रीय महामार्ग-83 च्या नागापट्टिनम-तंजावर विभागातील रस्त्याचे दुपदरीकरण, या प्रकल्पांचा समावेश आहे. कनेक्टिव्हिटी (संपर्क सक्षमता) सुधारणे, प्रवासाचा वेळ कमी करणे, सामाजिक-आर्थिक विकास आणि या प्रदेशातील तीर्थयात्रा सुकर करणे हे या प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा

यवतमाळ येथील जाहीर कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजने अंतर्गत, 16 व्या हप्त्याची रु. 21,000 कोटींहून अधिक रक्कम थेट लाभ हस्तांतरणा द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल यातून शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती पंतप्रधानांची वचनबद्धता प्रतीत होत आहे.  याबरोबरच 3 लाख कोटींहून अधिक रक्कम, 11 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना हस्तांतरित करण्याचा टप्पा पार होईल.

पंतप्रधान ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ चा सुमारे 3800 कोटी रुपयांचा 2रा आणि 3रा हप्ता देखील वितरित करतील, ज्याचा लाभ महाराष्ट्रातील सुमारे 88 लाख पात्र शेतकऱ्यांना मिळेल. ही योजना महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपये अतिरिक्त रक्कम प्रदान करते.

पंतप्रधान महाराष्ट्रातील 5.5 लाख महिला बचत गटांना (SHGs) रु. 825 कोटी इतका  फिरता निधी वितरित करतील. ही रक्कम भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना (NRLM) अंतर्गत प्रदान केलेल्या रकमे व्यतिरिक्त आहे.हा निधी बचत गटा अंतर्गत फिरत्या तत्त्वावर कर्ज द्यायला प्रोत्साहन देण्यासाठी दिले जाते, जेणे करून ग्रामीण पातळीवर महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, आणि गरीब कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न वाढेल.

पंतप्रधान महाराष्ट्रातील एक कोटी आयुष्मान कार्ड वितरणाचा शुभारंभ करतील. सरकारच्या कल्याणकारी योजना कानाकोपऱ्यातील जनतेपर्यंत पोहोचवून, 100 टक्के पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक पाउल आहे.

पंतप्रधान महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ करतील. आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान एकूण 10 लाख घरे बांधण्याची या योजनेची संकल्पना आहे. पंतप्रधान, या योजनेच्या 2.5 लाख लाभार्थ्यांना 375 कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित करतील. 

पंतप्रधान महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ परिसराला लाभ देणाऱ्या अनेक सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण करतील. हे प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) आणि बळीराजा जल संजीवनी योजने (BJSY) अंतर्गत 2750 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून पूर्ण करण्यात आले आहेत. 

पंतप्रधान महाराष्ट्रातील  1300 कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटनही करतील. यामध्ये वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे मार्ग (वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन ब्रॉडगेज मार्ग  प्रकल्पाचा भाग) आणि नवीन आष्टी - अमळनेर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग (अहमदनगर-बीड-परळी नवीन ब्रॉडगेज मार्ग प्रकल्पाचा भाग), या प्रकल्पांचा समावेश आहे. नवीन ब्रॉडगेज मार्गांमुळे विदर्भ आणि मराठवाडा या विभागांचे दळणवळण सुधारेल आणि इथल्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान दोन रेल्वे सेवांना दूरदृश्य प्रणाली द्वारे हिरवा झेंडा दाखवतील. यामध्ये कळंब आणि वर्धा यांना जोडणारी रेल्वे सेवा आणि अमळनेर आणि नवीन आष्टीला जोडणाऱ्या रेल्वे सेवेचा समावेश आहे. या नवीन रेल्वे सेवांमुळे या भागातील रेल्वेचे दळणवळण सुधारेल आणि विद्यार्थी, व्यापारी आणि दैनंदिन प्रवाशांना त्याचा लाभ मिळेल.  

पंतप्रधान महाराष्ट्रातील रस्ते क्षेत्राला बळकटी देणाऱ्या अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करतील. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग -930 च्या वरोरा-वणी विभागाचे चौपदरीकरण, आणि साकोली-भंडारा आणि सालईखुर्द-तिरोडा यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या श्रेणी सुधारणा प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे दळणवळण सुधारेल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि या प्रदेशातील सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल. पंतप्रधान यवतमाळ शहरातील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरणही करतील.

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
GIFT City scales new heights as India's 1st international finance and IT hub

Media Coverage

GIFT City scales new heights as India's 1st international finance and IT hub
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister speaks with Prime Minister of Netherlands
March 30, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, today spoke with the Prime Minister of Netherlands Rob Jetten. “We discussed ways to further strengthen India-Netherlands ties. Highlighted the potential of our partnership in areas such as semiconductors, mega water projects, green hydrogen and talent mobility”, Shri Modi stated. Shri Modi reiterated the need for early restoration of peace and stability in the West Asia region.

Shri Modi posted on X:

“Pleased to speak with Prime Minister of the Netherlands Rob Jetten today. We discussed ways to further strengthen India-Netherlands ties.

Highlighted the potential of our partnership in areas such as semiconductors, mega water projects, green hydrogen and talent mobility.

Also exchanged views on the situation in West Asia and emphasized the need for early restoration of peace and stability in the region.”

@MinPres