ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताच्या स्वदेशी शस्त्रास्त्रांचे आणि ‘मेक इन इंडिया’चे सामर्थ्य जगाने अनुभवले : पंतप्रधान
महानगरांमध्ये मिळणा-या पायाभूत सुविधा आणि संसाधने आता कानपूरमध्येही उपलब्‍ध : पंतप्रधान
उत्तर प्रदेशला आम्ही औद्योगिक संधींचे राज्य बनवत आहोत: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील कानपूर येथे सुमारे 47,600 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे 24 एप्रिल 2025 रोजीचा पूर्वनियोजित कानपूरचा दौरा रद्द करावा लागला होता. या अमानुष कृत्याचे बळी ठरलेले कानपूरचे सुपुत्र शुभम द्विवेदी यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. देशभरातील भगिनी आणि कन्यांच्या वेदना, दुःख, राग आणि सामूहिक रोष यांनी आपण अंतर्मुख झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर सुरू होताच,  हा सामूहिक रोष जगभरात उमटला. पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानी सैन्याला संघर्ष संपवण्याची विनंती करण्यास भाग पाडण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचे यश त्यांनी अधोरेखित केले. स्वातंत्र्यलढ्याच्या भूमीवर सशस्त्र दलांच्या धाडसाला, शौर्याला पंतप्रधानांनी  सलाम केला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान दयेची याचना करणाऱ्या शत्रूने कोणत्याही भ्रमात राहू नये, कारण ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही, असा त्यांनी ठामपणे सांगितले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताची तीन  तत्वे  असल्याचे पंतप्रधानांनी  स्पष्‍ट केले. पहिले म्हणजे, प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला भारत निर्णायक प्रत्युत्तर देईल. या प्रत्युत्तराची वेळ, पद्धत आणि अटी केवळ भारतीय सशस्त्र दलच ठरवतील. दुसरे म्हणजे, भारत आता अण्विक  धमक्यांना घाबरणार नाही आणि अशा पध्‍दतीने दिलेल्या इशाऱ्यांवर आधारित आपले निर्णयही  घेणार नाही. तिसरे म्हणजे, भारत दहशतवादाचे सूत्रधार आणि त्यांना आश्रय देणारी सरकारे या दोघांनाही एकाच दृष्टिकोनातून पाहतो - पाहणार आहे. पाकिस्तानच्या राज्यातील आणि राज्याबाहेरील घटकांमधील फरक आता अस्वीकारार्ह असेल. शत्रू कुठेही असला तरी त्याचा बिमोड केला जाईल,  असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

"ऑपरेशन सिंदूरने भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमता आणि ‘मेक इन इंडिया’ची ताकद जगासमोर दाखवली", असे गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी  केला. ब्रह्मोस क्षेपणास्त्रासह भारताच्या स्वदेशी शस्त्रांनी अचूकतेने लक्ष्यांवर मारा केला आणि शत्रूच्या प्रदेशात अगदी आतपर्यंत जावून, त्यांच्या स्थानांचा  विनाश घडवला असे सांगताना ही क्षमता आत्मनिर्भर भारत बनल्यामुळे आली  आणि  भारताच्या वचनबद्धतेचा थेट परिणाम आहे, असे त्यांनी नमूद केले. एक काळ असा होता जेव्हा भारत आपल्या लष्करी आणि संरक्षण गरजांसाठी परदेशी राष्ट्रांवर अवलंबून होता. तथापि, देशाने त्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यास सुरुवात केली आहे, संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकार  प्रयत्नशील आहे, याकडे मोदींनी लक्ष वेधले. संरक्षणात आत्मनिर्भरता ही केवळ अर्थव्यवस्थेसाठीच महत्त्वाची नाही,  तर राष्ट्रीय अभिमान आणि सार्वभौमत्वासाठी देखील आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला. भारताला या अवलंबित्वापासून मुक्त करण्यासाठी सरकारने आत्मनिर्भर भारत उपक्रम सुरू केला आहे,  याचा पुनरुच्चार करून मोदींनी संरक्षण स्वयंपूर्णता साध्य करण्यात उत्तर प्रदेशच्या प्रमुख योगदानाबद्दल अभिमान व्यक्त केला. कानपूरच्या ऐतिहासिक आयुध -शस्त्रास्त्र  कारखान्याप्रमाणेच, सात आयुध कारखाने प्रगत संरक्षण उत्पादन युनिटमध्ये रूपांतरित झाले आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

 

पंतप्रधान मोदी यांनी  उत्तर प्रदेशात एका प्रमुख संरक्षण कॉरिडॉरच्या स्थापनेवरही प्रकाश टाकला, ज्यामध्ये कानपूर  संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे.

पारंपरिक उद्योग एकेकाळी स्थलांतरित होत असताना, संरक्षण क्षेत्रातील प्रमुख कंपन्या आता त्यांचे अस्तित्व प्रस्थापित करत आहेत हे नमूद करताना अमेठीमध्ये एके-203 रायफल्सचे उत्पादन आधीच सुरू झाले आहे,  यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.

ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे आता उत्तर प्रदेश हे एक नवीन घर बनले आहे, जे संरक्षण उत्पादनात राज्याच्या वाढत्या महत्त्वाचे प्रतीक आहे यावर त्यांनी भर दिला. भविष्यात कानपूर आणि उत्तर प्रदेश  प्रमुख संरक्षण निर्यातदार बनण्याच्या भारताच्या प्रवासाचे नेतृत्व करतील असे पंतप्रधानांनी नमूद केले.  नवीन कारखाने स्थापन होतील, लक्षणीय गुंतवणूक होईल आणि हजारो स्थानिक तरुणांना उत्कृष्ट रोजगाराच्या संधी मिळतील असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेश आणि कानपूरला विकासाच्या नवीन उंचीवर नेण्याला  केंद्र आणि राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे,  यावर भर देत  मोदी म्हणाले की उद्योगांना चालना देऊन आणि कानपूरचे ऐतिहासिक वैभव पुनर्संचयित करून ही प्रगती साध्य केली जाईल.  मागील सरकारांनी आधुनिक उद्योगांच्या गरजांकडे दुर्लक्ष केले, ज्यामुळे कानपूरमधील औद्योगिक अस्तित्व कमी झाले, असे त्यांनी नमूद केले. कुटुंब-केंद्रित सरकारे उदासीन राहिली, परिणामी  केवळ कानपूरच नाही तर संपूर्ण उत्तर प्रदेश विकासात मागे पडला याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शाश्वत वीज पुरवठा सुनिश्चित करणारी ऊर्जा क्षेत्रातील स्वयंपूर्णता आणि भक्कम  पायाभूत सुविधा आणि दळणवळण-संपर्क सुविधा  हे राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी आवश्यक दोन आधारस्तंभ आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला.  660 मेगावॅटचा पनकी वीज निर्मिती  प्रकल्प , 660 मेगावॅटचा नेवेली वीज निर्मिती प्रकल्प, 1320 मेगावॅट  वीज निर्मिती करणारा जवाहरपूर   प्रकल्प , 660 मेगावॅट ओब्रा-सी वीज निर्मिती  प्रकल्प आणि 660 मेगावॅट खुर्जा वीज निर्मिती  प्रकल्प सह अनेक प्रमुख वीज निर्मिती प्रकल्पांचे  उद्घाटन केल्याचे त्यांनी जाहीर केले. ते म्हणाले  की,  हे प्रकल्प उत्तर प्रदेशच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहेत.

 

हे वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर राज्यात विजेची उपलब्धता वाढेल आणि औद्योगिक विकासाला आणखी गती मिळेल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते म्हणाले  की, आज 47,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या  विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि विविध उपक्रमांची पायाभरणी करण्यात आली आहे, ज्यातून प्रगतीबद्दल  वचनबद्धता आणखी दृढ झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी आयुष्मान वय वंदना कार्ड वितरित करण्यात आली,  तर इतर लाभार्थ्यांना विविध कल्याणकारी योजनांद्वारे मदत मिळाली आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले.  हे उपक्रम आणि विकास प्रकल्प यामधून कानपूर आणि उत्तर प्रदेशच्या प्रगतीसाठी सरकारचे अतूट समर्पण प्रतिबिंबित होते असे त्यांनी अधोरेखित केले.

केंद्र आणि राज्य सरकार आधुनिक आणि विकसित उत्तर प्रदेशच्या निर्मितीसाठी सक्रियपणे काम करत आहेत यावर भर देत,  मोदी यांनी अधोरेखित केले की एकेकाळी प्रमुख महानगरांमध्ये असलेल्या पायाभूत सुविधा, सोयी आणि संसाधने आता कानपूरमध्ये दिसू लागली आहेत. काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने कानपूरला पहिली मेट्रो सेवा दिली होती याची आठवण करून देत ते म्हणाले की,  आज कानपूर मेट्रोची ऑरेंज लाईन कानपूर सेंट्रलपर्यंत पोहोचली आहे. त्यांनी नमूद केले की उन्नत मेट्रो नेटवर्क  म्हणून सुरू झालेल्या मेट्रो सेवेचा विस्तार आता  भूमिगत देखील झाला आहे, जो  शहराच्या प्रमुख भागांना अखंडपणे जोडतो.  मोदी म्हणाले की कानपूर मेट्रोचा विस्तार हा एक सामान्य प्रकल्प नाही तर खंबीर नेतृत्व, मजबूत इच्छाशक्ती आणि प्रामाणिक हेतू असलेले सरकार देशाच्या विकासाला कसे चालना देऊ शकते याचा हा दाखला  आहे.

प्रचंड गर्दीचा परिसर , अरुंद रस्ते आणि आधुनिक शहरी नियोजनाचा अभाव यामुळे कानपूरमध्ये मेट्रो सेवा किंवा प्रमुख  पायाभूत सुविधांमध्ये सुधारणांची अंमलबजावणी करता येईल का याबद्दल लोक साशंक  होते. या आव्हानांमुळे कानपूर आणि उत्तर प्रदेशातील अन्य  प्रमुख शहरे विकासाच्या शर्यतीत मागे पडली, वाहतूक कोंडी वाढली आणि शहराची प्रगती मंदावली  असे त्यांनी नमूद केले.

आज तेच कानपूर आणि उत्तर प्रदेश विकासाचे नवीन मापदंड स्थापित करत आहेत असे त्यांनी नमूद केले.  मेट्रो सेवांमुळे  कानपूरच्या लोकांना होणारे थेट फायदे मोदी यांनी अधोरेखित केले, कानपुर एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे हे लक्षात घेऊन मेट्रोमुळे व्यापारी आणि ग्राहकांना नवीन बाजारपेठ  आणि बडा चौराहा येथे प्रवास करणे सोपे होईल.  आयआयटी कानपूरमधील विद्यार्थी आणि सामान्य लोकांचा सेंट्रल  रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास वेळ देखील लक्षणीयरीत्या वाचेल यावर त्यांनी भर दिला.

 

एखाद्या शहराचा वेग त्याची  प्रगती ठरवतो आणि त्यामुळेच  संपर्काच्या आणि वाहतुकीच्या या वाढीव सुविधा  उत्तर प्रदेशच्या विकासाची एक नवीन, आधुनिक प्रतिमा तयार करत आहेत याचा मोदींनी पुनरुच्चार केला.

पायाभूत सुविधा आणि संपर्क सुविधांच्या बाबतीत उत्तर प्रदेशने उल्लेखनीय प्रगती केल्याचे अधोरेखित करत  या राज्याची पूर्वीची खड्डेमय रस्त्यांची ओळख पुसली जाऊन उत्तर प्रदेश आता महामार्गांच्या विस्तृत जाळ्यासाठी ओळखला जाऊ लागला आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला.  लोक एकेकाळी संध्याकाळनंतर बाहेर पडणे टाळत असत, त्याच उत्तर प्रदेशातील महामार्ग आता अहोरात्र प्रवाशांनी गजबजलेले असतात असेही ते म्हणाले. कानपूरच्या लोकांना हे परिवर्तन अन्य कुणापेक्षाही अधिक चांगले समजते, असेही ते म्हणाले. कानपूर-लखनौ द्रुतगती मार्गा   मुळे लखनौला जाण्यासाठी लागणारा प्रवासाचा वेळ कमी होऊन अवघ्या 40-45 मिनिटांवर येणार असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले.

याशिवाय, लखनौ आणि पूर्वांचल द्रुतगती मार्गादरम्यान थेट कनेक्टिव्हिटी स्थापित केली जाईल, तर कानपूर-लखनौ द्रुतगती मार्ग गंगा द्रुतगती मार्गाशी जोडला जाईल  परिणामी दोन्ही बाजूंनी प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी होईल. फारुखाबाद-अनवरगंज विभागातील एकेरी रेल्वे मार्गामुळे कानपूरवासीयांना दीर्घकाळ समस्यांना तोंड द्यावे  लागले. प्रवाशांना 18 रेल्वे  क्रॉसिंगचा सामना करावा लागतो, ते वारंवार बंद पडतात त्यामुळे प्रवासात अडथळा येतो. या भागात उन्नत रेल्वे मार्गिकेच्या उभारणीसाठी 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधानांनी केली,  त्यामुळे वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होईल, वेग वाढेल आणि प्रदूषण कमी होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमामुळे कानपूरच्या लोकांचा बहुमूल्य वेळ वाचेल, यावर त्यांनी भर दिला.

कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानकाचा सध्या कायापालट केला जात असून तेथे जागतिक दर्जाच्या सुविधांचे  काम सुरू असल्याचे मोदींनी अधोरेखित केले. आधुनिक आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत हे स्थानक लवकरच विमानतळाच्या तोडीचे होईल, असे त्यांनी नमूद केले. अमृत भारत रेल्वे स्थानक उपक्रमांतर्गत  सरकार उत्तर प्रदेशातील 150 हून अधिक रेल्वे स्थानके विकसित करत आहे, यामुळे कनेक्टिव्हिटीत वाढ होऊन प्रवाशांना अधिक सुखकारक अनुभव घेता येईल. उत्तर प्रदेश हे आताच भारतात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले राज्य झाले असल्याचे स्पष्ट करत महामार्ग, रेल्वे आणि हवाई मार्गांमध्ये झालेल्या या प्रगतीमुळे राज्य सर्वच क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे, असे मोदींनी नमूद केले. उत्तर प्रदेशला औद्योगिक संधींचे केंद्र बनवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. स्थानिक उद्योगांना आणि उत्पादनाला चालना देऊन मेक इन इंडियाला बळकटी देण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात मिशन मॅन्युफॅक्चरिंग सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कानपूरसारख्या शहरांना या उपक्रमाचा मोठा फायदा होईल, असेही ते पुढे म्हणाले.कानपूरच्या औद्योगिक सामर्थ्याला पूर्वीपासून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी  आणि लघुउद्योगांनी  बळ दिले आहे. या उद्योगांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, त्यांची वाढ आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी सरकार सक्रियपणे काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात  परिवर्तन झाले असल्याचे स्पष्ट करत यापूर्वी, लहान व्यवसायांची व्याख्या ते विस्तारापासून परावृत्त होतील अशा प्रकारे करण्यात आली होती. पण, सरकारने या व्याख्या सुधारल्या आहेत, वाढीला चालना देण्यासाठी उलाढालीच्या मर्यादा वाढवल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले. यंदाच्या अर्थसंकल्पाने याची व्याप्ती आणखी वाढवली असून  त्यांना अतिरिक्त सवलती  दिल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.मागील काळात पतपुरवठ्याची उपलब्धता ही  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची  मोठी समस्या होती. तथापि, गेल्या दहा वर्षांत सरकारने ही समस्या दूर करण्यासाठी अनेक निर्णायक पावले उचलली आहेत यावर त्यांनी भर दिला. ज्या तरुण उद्योजकांना आपला व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना आता मुद्रा योजनेद्वारे त्वरित आर्थिक सहाय्य मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. याव्यतिरिक्त,कर्ज हमी योजनेद्वारे लघु आणि मध्यम उद्योगांना आर्थिकदृष्ट्या बळकटी दिली जात आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांसाठी या कर्ज हमीची रक्कम 20 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांच्या विकासाला सहाय्य करण्यासाठी 5 लाख रूपयांपर्यंतच्या मर्यादेसह क्रेडीट कार्ड प्रदान केले जात आहेत.  प्रक्रिया आणि नियम सोपे करून सरकार सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग आणि नवीन उद्योगांसाठी व्यवसायांना पोषक- वातावरण निर्माण करत आहे यावर त्यांनी भर दिला. एक जिल्हा, एक उत्पादन सारख्या उपक्रमांद्वारे कानपूरच्या पारंपारिक चर्म आणि वस्त्र उद्योगांना सक्षम केले जात आहे यावरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. या प्रयत्नांमुळे केवळ कानपूरलाच लाभ  होईल असे नाही तर उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांच्या एकूण औद्योगिक विकासातही हातभार लागेल, असे त्यांनी नमूद केले.

उत्तर प्रदेशने गुंतवणुकीसाठी अभूतपूर्व आणि सुरक्षित वातावरण निर्माण केले आहे यावर भर देऊन, मोदी म्हणाले की गरिबांसाठी कल्याणकारी योजना पारदर्शकतेने राबवल्या जात आहेत, ज्यामुळे तळागाळापर्यंत त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली जात आहे. मध्यमवर्गाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी असलेल्या सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला  आणि सांगितले की प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यांनी घोषणा केली की या वर्षीच्या अर्थसंकल्पात 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त केले आहे, ज्यामुळे लाखो मध्यमवर्गीय कुटुंबांना नवा आत्मविश्वास मिळाला असून त्यांचे  आर्थिक सबलीकरण झाले  आहे. सरकार सेवा आणि विकासाच्या आपल्या वचनबद्धतेसह वेगाने प्रगती करत राहील, देशाला आणि उत्तर प्रदेशला नवीन उंचीवर नेण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही,याचा पुनरुच्चार करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी या प्रदेशातील पायाभूत सुविधा आणि दळणवळण वाढवण्याच्या उद्देशाने अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी  आणि उदघाटन केले. त्यांनी 2,120 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कानपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या चुन्नीगंज मेट्रो स्टेशन ते कानपूर सेंट्रल मेट्रो स्टेशन या मार्गाचे उद्घाटन केले. यामध्ये पाच नवीन भूमिगत स्थानकांसह 14 नियोजित स्थानकांचा समावेश असेल. या मेट्रो नेटवर्क द्वारे शहरातील प्रमुख स्थळे आणि व्यावसायिक केंद्रांना एकमेकांशी जोडले जाईल. याव्यतिरिक्त, त्यांनी जी.टी. रोडच्या रस्ता रुंदीकरण आणि मजबूतीकरणाच्या कामाचेही उद्घाटन केले.

या प्रदेशातील वीज निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी, अनेक प्रकल्प हाती घेतले जातील. या प्रदेशाच्या वाढत्या ऊर्जेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी पंतप्रधानांनी सेक्टर 28 मध्ये यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण, गौतम बुद्ध नगर येथील 220 केव्हीच्या सबस्टेशनची पायाभरणी केली. त्यांनी ग्रेटर नोएडामधील इकोटेक-8 आणि इकोटेक-10 येथील 320 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 132 केव्ही सबस्टेशन्सचे उद्घाटन देखील केले.

 

पंतप्रधानांनी उत्तरप्रदेशातील ऊर्जा क्षमतेच्या विकासासाठी कानपूरमधील 8300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 660 मेगावॅटच्या पंकी औष्णिक वीज विस्तार प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्यांनी 9330 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या घाटमपूर औष्णिक वीज प्रकल्पाच्या 660 मेगावॅटच्या तीन  युनिट्सचे उद्घाटन केले ज्यामुळे वीज पुरवठा लक्षणीयरीत्या वाढेल.

पंतप्रधानांनी कानपूरमधील कल्याणपूर पनकी मंदिर येथे पंकी पॉवर हाऊस रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वे ओव्हर ब्रिज आणि पंकी रोडवरील पंकी धाम क्रॉसिंगचेही उद्घाटन केले. पंकी औष्णिक वीज विस्तार प्रकल्पाच्या वाहतूक पुरवठ्याला सहाय्य करेल तसेच स्थानिक लोकांची  वाहतूक कोंडी पासून सुटका करेल.

 

पंतप्रधानांनी कानपूरमधील बिंगवन येथे 290  कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 40 एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) तृतीय स्तरावरील प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केले. यामुळे प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करणे शक्य होईल, तसेच या प्रदेशातील जलसंवर्धन आणि शाश्वत संसाधन व्यवस्थापनाला चालना मिळेल.

या प्रदेशातील रस्ते पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधानांनी कानपूर नगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी गौरिया पाली मार्गाच्या आणि कानपूर नगर जिल्ह्यातील संरक्षण कॉरिडॉर अंतर्गत प्रयागराज महामार्गावरील नरवाल मोड (एएच-1) ते कानपूर संरक्षण नोड (चौपदरी मार्ग) यांना  जोडणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबूतीकरणाची पायाभरणी केली यामुळे संरक्षण कॉरिडॉरसाठी असलेल्या दळणवळण व्यवस्थेत  लक्षणीय सुधारणा होईल आणि वाहतूक  सुलभता वाढेल.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते  पंतप्रधान आयुष्मान वय वंदना योजना, राष्ट्रीय उपजीविका अभियान आणि पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि धनादेश वितरीत करण्यात आले.

 

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
With HPV vaccine rollout, AIIMS oncologist says it’s the beginning of the end for cervical cancer in India

Media Coverage

With HPV vaccine rollout, AIIMS oncologist says it’s the beginning of the end for cervical cancer in India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister congratulates Jammu and Kashmir team on their first-ever Ranji Trophy victory
February 28, 2026

The Prime Minister has congratulated the Jammu and Kashmir team for their first-ever Ranji Trophy win.

The Prime Minister stated that this historic triumph reflects the remarkable grit, discipline, and passion of the team. Highlighting that it is a proud moment for the people of Jammu and Kashmir, he noted that the victory underscores the growing sporting passion and talent in the region.

The Prime Minister expressed hope that this feat will inspire many young athletes to dream big and play more.

The Prime Minister shared on X post;

"Congratulations to the Jammu and Kashmir team for their first ever Ranji Trophy win! This historic triumph reflects remarkable grit, discipline and passion of the team. It is a proud moment for the people of Jammu and Kashmir and it highlights the growing sporting passion and talent there. May this feat inspire many young athletes to dream big and play more."