बिहार समृद्ध होईल आणि देशाच्या समृद्धीमध्येही मोठी भूमिका बजावेल: पंतप्रधान
गेल्या दशकात विक्रमी 25 कोटी भारतीयांनी गरिबीवर मात केली आहे: पंतप्रधान
बिहार 'मेड इन इंडिया' चे मोठे केंद्र बनेल, आज मारहौरा लोकोमोटिव्ह फॅक्टरीतून पहिले इंजिन आफ्रिकेला निर्यात केले जात आहे: पंतप्रधान

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली. उपस्थितांना शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी बाबा महेंद्रनाथ आणि बाबा हंसनाथ यांना आदराने वंदन केले आणि सोहगरा धामच्या पवित्र उपस्थितीचा उल्लेख केला. त्यांनी माँ थावे भवानी आणि माँ अंबिका भवानी यांनाही वंदन केले. पंतप्रधानांनी देशाचे पहिले राष्ट्रपती, देशरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना अभिवादन केले.

सिवान म्हणजे स्वातंत्र्य संग्रामातील भारताची प्रेरणादायी भूमी होती असे वर्णन करताना  मोदी यांनी अधोरेखित केले की या भूमीने देशाच्या लोकशाहीला सक्षम केले आहे आणि संविधानाला बळ दिले आहे. सिवानने देशाला डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासारखा महान सुपुत्र दिला, ज्यांनी संविधान निर्मिती आणि देशाची दिशा निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधानांनी महिला सक्षमीकरणाच्या कार्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे महान समाजसुधारक ब्रजकिशोर प्रसाद यांच्या रूपाने सिवानच्या योगदानाचा गौरव केला.

 

अशा महात्म्यांचे अभियान केंद्र आणि राज्य सरकारांकडून अतिशय दृढ संकल्पाने पुढे नेले जात असल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. आजचा कार्यक्रम हा याच सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी याच व्यासपीठावरून करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आणि या विकास उपक्रमांमुळे बिहार उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करेल आणि समृद्ध राज्य निर्माण करण्यात योगदान देईल यावर भर दिला. सिवान, सासाराम, बक्सर, मोतिहारी, बेतिया आणि आरा यांसारख्या प्रदेशांच्या विकासात या प्रकल्पांची मोठी भूमिका असेल असे  मोदी यांनी नमूद केले. या उपक्रमांमुळे गरीब, वंचित, दलित, महादलित, मागास आणि अत्यंत मागासलेल्या समुदायांचे जीवन सुकर होईल यावर त्यांनी भर दिला आणि या प्रकल्पांसाठी बिहारच्या जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

आपण नुकतेच परदेश दौऱ्यावरून परतल्याचे सांगताना  मोदी यांनी सांगितले की, या दौऱ्यात त्यांनी जगातील काही सर्वाधिक विकसित राष्ट्रांच्या नेत्यांशी चर्चा केली. भारताच्या वेगाने होणाऱ्या वाढीने जागतिक नेते खूप प्रभावित झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हे नेते भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत असल्याचे पाहतात असे पंतप्रधानांनी नमूद केले आणि या परिवर्तनात बिहारची मोठी भूमिका असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. "समृद्ध बिहार देशाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल," असे मोदी म्हणाले. याचे श्रेय त्यांनी बिहारच्या लोकांची शक्ती आणि क्षमतेमुळे निर्माण झालेल्या आत्मविश्वासाला दिले.  राज्यातील अराजकाचे युग संपुष्टात आणल्याबद्दल पंतप्रधानांनी जनतेचे कौतुक केले.

बिहारमधील आजच्या युवकांना  दोन दशकांपूर्वीची या राज्याची स्थिती केवळ कथा आणि किस्से यांच्या माध्यमातून समजते असे त्यांनी नमूद केले.  अराजकतेच्या त्या काळात झालेल्या अधोगतीची व्याप्ती त्यांना पूर्णपणे समजू शकत नाही याकडे लक्ष वेधत मोदी यांनी अधोरेखित केले की अनेक शतके भारताच्या प्रगतीचे नेतृत्व करणारे बिहार एकेकाळी मागील शासन  व्यवस्थांच्या  विळख्यामुळे सक्तीच्या स्थलांतराचे प्रतीक बनले होते.

 

बिहारमधील प्रत्येक रहिवाशासाठी स्वाभिमान सर्वोपरि आहे यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की, माझे बिहारी बंधू आणि भगिनी अत्यंत कठीण परिस्थितीतही यशस्वी होऊन उल्लेखनीय लवचिकता दाखवतात. ते कधीही त्यांच्या स्वाभिमानाशी तडजोड करत नाहीत. मागील राजवटींनी बिहारच्या अभिमानाला मोठी हानी पोहचवली आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. मोठ्या प्रमाणात  भ्रष्टाचार चाललेल्या त्या राजवटींवर त्यांनी टीका केली, ज्यामुळे गरिबी बिहारचे दुर्दैव बनले.  मात्र असंख्य आव्हानांना न जुमानता, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या सरकारने बिहारला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणले आहे असे ते म्हणाले.  गेल्या 10–11 वर्षांमध्ये बिहारमध्ये सुमारे 55,000 किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते बांधण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. ते  पुढे म्हणाले  की, 1.5 कोटींहून अधिक घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे तर 1.5 कोटी घरांना पाण्याची जोडणी मिळाली  आहे. मोदी यांनी नमूद केले की, राज्यभरात 45,000  हून अधिक  सामान्य  सामान्य सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, बिहारमधील लहान शहरांमध्ये आता नवीन स्टार्ट-अप्स उदयास येत आहेत यावर त्यांनीभर दिला.

बिहारच्या विकासाची गती वाढत असल्याचे नमूद करत  मोदी यांनी सावध केले  की, पूर्वीच्या अराजकतेसाठी जबाबदार असलेले घटक आता सरकार आणि बिहारच्या आर्थिक संसाधनांवर पुन्हा नियंत्रण मिळविण्याची संधी शोधत आहेत. हे गट त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरत आहेत असे ते म्हणाले.  पंतप्रधानांनी बिहारच्या लोकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आणि समृद्ध बिहारच्या प्रवासाला खीळ बसवणाऱ्यांना दूर ठेवण्याची गरज अधोरेखित केली.

देशाने गरिबी निर्मूलनाच्या घोषणा बऱ्याच काळापासून ऐकल्या आहेत, परंतु त्यांच्या सरकारने हे दाखवून दिले आहे की गरिबी खरोखरच कमी करता येते असे पंतप्रधान म्हणाले.  "गेल्या दशकात,  25 कोटी इतक्या विक्रमी संख्येने भारतीयांनी गरिबीवर मात केली आहे", असे सांगून  मोदी यांनी जागतिक बँकेसारख्या जागतिक स्तरावरच्या  प्रसिद्ध संस्थांनी भारताच्या कामगिरीचे कौतुक केल्याचे अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की बिहार आणि विशेषतः  नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या राष्ट्रीय यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पंतप्रधान म्हणाले की, यापूर्वी बिहारची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या अत्यंत हलाखीच्या स्थितीत होती. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये  बिहारमधील सुमारे चार कोटी लोकांनी गरिबीवर मात केली आहे.

 

स्वातंत्र्यानंतर इतकी दशके उलटूनही लाखो लोक  प्रयत्नांच्या अभावामुळे नव्हे तर त्यांच्याकडे पुढे जाण्याचा कोणताही मार्ग नसल्यामुळे गरीब राहिले याकडे लक्ष वेधत मोदी यांनी यासाठी मागील राजवटीत दीर्घकाळ चाललेल्या परवाना राजला जबाबदार धरले, ज्यामुळे देश गरीब राहिला.  त्या काळात प्रत्येक सेवा आणि संधीसाठी कठोर कोटा-परमिट प्रणाली होत्या, त्यामुळे अगदी छोट्याछोट्या कामांनाही परवाना  आवश्यक होता . पंतप्रधानांनी सांगितले की, मागील सरकारांच्या राजवटीत गरिबांना घरे नाकारली जात होती, तर दलाल  रेशनचे अन्नधान्य लुबाडून घेत होते.  आरोग्यसेवा गरिबांच्या आवाक्याबाहेर होती आणि शिक्षण आणि रोजगार यासाठी सतत संघर्ष करावा लागत होता यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी नमूद केले की नागरिकांना वीज किंवा पाण्याची जोडणी  मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये असंख्य हेलपाटे घालावे  लागत होते. ते पुढे म्हणाले  की गॅस जोडणी  मिळवण्यासाठी खासदाराची शिफारस आवश्यक असायची  आणि लाच दिल्याशिवाय किंवा शिफारशीशिवाय नोकऱ्या मिळत नव्हत्या.ते म्हणाले की या व्यवस्थेचा सर्वाधिक फटका प्रामुख्याने दलित, महादलित, मागास आणि अतिमागास समाजातील लोकांना बसला असून, या वर्गांना गरिबी निर्मूलनाची स्वप्ने दाखवली जात असताना, काही मूठभर कुटुंबे या प्रक्रियेत कोट्याधीश आणि अब्जाधीश झाली.

"गेली 11 वर्षे , आमचे सरकार गरिबांच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करण्यासाठी वचनबद्ध राहिले आहे. परिणामी, आता दृश्यमान आणि परिणामकारक परिणाम दिसू लागले आहेत.” पंतप्रधान मोदी म्हणाले. गेल्या दशकभरात, देशातील 4 कोटींहून अधिक गरीब कुटुंबांना सरकारी उपक्रमांतर्गत पक्की घरे मिळाली असून, आगामी काळात आणखी 3 कोटी घरे बांधली जाणार आहेत, असे त्यांनी नमूद केले. या विकासामुळे बिहारमधील गरीब, दलित, महादलित, मागासवर्गीय आणि अत्यंत मागास कुटुंबांना मोठा लाभ मिळाला आहे, यावर मोदी यांनी भर दिला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, केवळ या एका राज्यात 57 लाखांहून अधिक पक्की घरे बांधण्यात आली. सिवान जिल्ह्यात गरिबांसाठी 1.10 लाखांहून अधिक घरे बांधण्यात आली, असे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले आणि हे काम सुरळीतपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की आज बिहारमधील 50,000 हून अधिक कुटुंबांना घरांचे हप्ते वितरित करण्यात आले. यापैकी बहुतेक घरे माता आणि भगिनींच्या नावावर नोंदणीकृत आहेत याबद्दल मोदी यांनी विशेष समाधान व्यक्त केले. त्यांनी अभिमानाने नमूद केले की परंपरेने कधीही आपल्या नावावर मालमत्ता नसलेल्या महिलांना आता आपण घरमालक असल्याचा अभिमान आहे.

सरकार गरिबांना केवळ घरेच नव्हे तर मोफत रेशन, वीज आणि पाण्याची सुविधाही देत आहे, याकडे लक्ष वेधत पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही वर्षांत देशभरात 12 कोटींहून अधिक नवीन कुटुंबांना नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळत आहे. केवळ सिवान जिल्ह्यात साडेचार लाखांहून अधिक कुटुंबांना प्रथमच नळाचे पाणी मिळाल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळ जोडणी आणि शहरी भागात पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने सरकार काम करत असल्याचे मोदी म्हणाले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की अलिकडच्या काळात बिहारच्या विविध शहरांमध्ये अनेक पाइपलाइन आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवण्यात आले आहेत. ते पुढे म्हणाले की, आता आणखी डझनभर शहरांसाठी नवीन पाइपलाइन आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. हे सर्व प्रकल्प गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जीवनाच्या दर्जात लक्षणीय सुधारणा घडवतील, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

 

मागील सरकारच्या कारकिर्दीवर कडक टीका करताना, मोदी म्हणाले की त्यांची कृती सातत्याने बिहारविरोधी आणि गुंतवणूकविरोधी राहिली. त्यांनी असे म्हटले की जेव्हा जेव्हा हे पक्ष विकासाबद्दल बोलतात तेव्हा लोकांना बंद दुकाने, ठप्प झालेले व्यवसाय आणि बंद पडलेल्या उद्योगांची आठवण येते. म्हणूनच अशा पक्षांना बिहारच्या तरुणांचा विश्वास कधीच संपादन करता आला नाही, असे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले की, आजपर्यंतच्या इतिहासात या पक्षांनी मोडकळीस आलेल्या पायाभूत सुविधा, माफिया राजवट, अराजकता आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले आहे.

पंतप्रधानांनी सांगितले की, बिहारमधील प्रतिभावान तरुण प्रत्यक्ष कामाचे बारकाईने निरीक्षण आणि मूल्यांकन करत आहेत. बिहारमधील एनडीएच्या विकास मॉडेलचे प्रमुख उदाहरण म्हणून त्यांनी मरहौरा लोकोमोटिव्ह फॅक्टरीचा उल्लेख केला. त्यांनी घोषित केले की या  कारखान्यात तयार केलेले पहिले इंजिन आफ्रिकेत निर्यात केले जात असून, हा एक ऐतिहासिक टप्पा आहे.

मोदी यांनी भर दिला की हा कारखाना सारण जिल्ह्यात आहे, जो एकेकाळी पूर्वीच्या राजवटीने मागासलेला ठरवून नाकारला होता. त्यांनी सांगितले की आज याच जिल्ह्याने जागतिक उत्पादन आणि निर्यात नकाशावर स्थान मिळवले आहे. बिहारच्या विकास इंजिनाला रोखल्याबद्दल मागील राजवटींवर टीका करताना, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की बिहारमध्ये बनलेली इंजिने आता आफ्रिकेतील गाड्यांना ऊर्जा देतील, हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. 'मेड इन इंडिया' उत्पादनांचे प्रमुख केंद्र म्हणून बिहार उदयास येईल, असा दृढ विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, मखाणा, फळे आणि भाज्या यांसारखी स्थानिक उत्पादनेच केवळ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचणार नाहीत तर बिहारच्या कारखान्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंनादेखील जागतिक मागणी येईल. "बिहारच्या तरुणांनी तयार केलेल्या उत्पादनांमुळे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न बळकट होईल", असे मोदी म्हणाले.

 

बिहारमध्ये विकसित होत असलेल्या आधुनिक पायाभूत सुविधा राज्याच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असे अधोरेखित करून पंतप्रधानांनी सांगितले की, बिहारमध्ये रस्ते, रेल्वे, हवाई प्रवास आणि जलमार्गांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक केली जात आहे. बिहारला सातत्याने नवीन रेल्वेगाड्या मिळत आहेत, ज्यामध्ये अत्याधुनिक वंदे भारत गाड्यांचा समावेश आहे, असे त्यांनी नमूद केले. श्रावण सुरू होण्यापूर्वी बाबा हरिहरनाथांची भूमी आता नवीन वंदे भारत एक्सप्रेसद्वारे बाबा गोरखनाथांच्या भूमीशी जोडली गेली आहे, असे सांगून मोदी यांनी या प्रमुख टप्प्याची घोषणा केली. त्यांनी पुढे सांगितले की, नवीन पाटणा-गोरखपूर वंदे भारत रेल्वेगाडीने पूर्वांचलमधील भगवान शिवाच्या भक्तांसाठी एका आधुनिक प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ही गाडी भगवान बुद्धांच्या तपश्चर्येची भूमी आणि त्यांचे महापरिनिर्वाण स्थळ, कुशीनगर यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून देखील काम करते, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

अशा प्रयत्नांमुळे बिहारमधील औद्योगिक आणि व्यावसायिक घडामोडीना चालना मिळेलच, याशिवाय पर्यटन क्षेत्रालाही मोठा फायदा होईल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. या विकासामुळे जागतिक पर्यटन नकाशावर बिहार अधिक ठळकपणे चमकेल असे ते म्हणाले. परिणामी, बिहारमधील तरुणांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील यावर त्यांनी भर दिला.

सर्वांना समान संधी प्रदान करणे आणि भेदभाव दूर करणे हा संविधानाचा आत्मा आहे, असे स्पष्ट करून मोदी यांनी या तत्त्वाप्रती 'सबका साथ, सबका विकास' या मंत्राद्वारे असलेल्या सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. त्यांनी याची मागील सरकारच्या दृष्टिकोनाशी तुलना केली आणि म्हटले की त्यांचे राजकारण फक्त स्वतःच्या हितासाठी, "कुटुंब-प्रथम" विकासाभोवती केंद्रित आहे. त्यांनी बिहार आणि देशभरातील लाखो कुटुंबांच्या हितांना स्वतःच्या कुटुंबांसाठी हानी पोहोचवल्याबद्दल त्यांच्यावर पंतप्रधानांनी टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा घराणेशाहीच्या राजकारणाविरुद्ध ठामपणे उभे राहिले यावर पंतप्रधानांनी भर दिला आणि त्यांच्या वारशाचा या पक्षांनी वारंवार अपमान केल्याचे म्हटले. त्यांनी दुसऱ्या पक्षाशी संबंधित एका अलिकडील घटनेचा उल्लेख केला, जिथे डॉ. आंबेडकरांच्या छायाचित्राचा अपमान करण्यात आला होता यासाठी माफीची मागणी  करणारे  पोस्टर्स बिहारमध्ये लागले तथापि, कोणतीही माफी मागितली जाईल की नाही याबद्दल पंतप्रधानांनी साशंकता  व्यक्त केली, या पक्षांना दलित आणि महादलितांबद्दल खरा आदर नाही, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मागील सरकारांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला योग्य स्थान दिले नाही  परंतु आपण  स्वतः डॉ. आंबेडकरांना हृदयात जपले आहे. डॉ. आंबेडकरांचा अपमान करून त्यांनी स्वतःला त्यांच्यापेक्षा मोठे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून  बाबासाहेबांचा हा अपमान बिहारची जनता कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी  केले.

 

नितिश कुमार यांच्या प्रयत्नांमुळे बिहारची झपाट्याने वाढ होण्यासाठी आवश्यक असलेली तयारी आधीच झाली आहे असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. आता एकत्र काम करायची आणि बिहारला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊन ठेवायची जबाबदारी त्यांच्या आघाडीची आहे असे ते म्हणाले.  बिहारच्या युवकांवर त्यांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला. ही युवाशक्ती बिहारचे प्राचीन वैभव परत आणण्यासाठी एकीने काम करेल आणि विकसित भारताचे शक्तिशाली इंजिन म्हणून बिहारमध्ये स्थित्यंतर घडवून आणेल, असे ते म्हणाले. त्यांनी बिहारमध्ये सध्या सुरू असलेल्या विकासकामांना शुभेच्छा देऊन भाषणाचा समारोप केला.

बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग, जीतन राम मांजी, गिरीराज सिंह, चिराग पासवान, नित्यानंद राय, राम नाथ ठाकूर, डॉ. राज भूषण चौधरी, सतीश चंद्र दुबे यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

बिहारमधील पायाभूत सुविधा आणि सामाजिक-आर्थिक विकासाला मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधानांनी सिवान येथे अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली आणि उद्घाटन केले.

 

बिहारमधील रेल्वे पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी, पंतप्रधानांनी 400  कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नवीन वैशाली-देवरिया रेल्वे मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन केले आणि या मार्गावर नवीन रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. याव्यतिरिक्त उत्तर बिहारमधील पाटलीपुत्र आणि गोरखपूर दरम्यान मुझफ्फरपूर आणि बेतिया मार्गे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

"मेक इन इंडिया - मेक फॉर द वर्ल्ड" या दृष्टिकोनाला अनुसरुन पंतप्रधानांनी गिनी प्रजासत्ताकाला निर्यात करण्यासाठी मारहोवरा प्लांटमध्ये बांधलेल्या अत्याधुनिक लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवला. या कारखान्यात उत्पादित होणारे हे पहिले निर्यात लोकोमोटिव्ह आहे. ते उच्च-अश्वशक्ती इंजिन, प्रगत एसी प्रोपल्शन सिस्टम, मायक्रोप्रोसेसर-आधारित नियंत्रण प्रणाली, एर्गोनॉमिक कॅब डिझाइन आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सारख्या तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.

गंगा नदीच्या संवर्धन आणि पुनरुज्जीवनाच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधानांनी नमामि गंगे प्रकल्पांतर्गत 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सहा सांडपाणी प्रक्रिया संयंत्रांचे (एसटीपी) उद्घाटन केले. या प्रकल्पांमुळे या भागातील लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.

 

पंतप्रधानांनी बिहारमधील विविध शहरांमध्ये 3000  कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यांची पायाभरणी देखील केली. या प्रकल्पांचा उद्देश या शहरांमधील नागरिकांना स्वच्छ आणि पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे आहे.

बिहारमधील वीज पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधानांनी 500 मेगावॅट ताशी बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (बीईएसएस) क्षमतेच्या प्रकल्पाची पायाभरणी केली. राज्यातील मुझफ्फरपूर, मोतिहारी, बेतिया, सिवानसह 15 ग्रिड उपकेंद्रांवर स्वतंत्र बीईएसएस बसवले जात आहेत. प्रत्येक उपकेंद्रात बसवल्या जाणाऱ्या बॅटरीची क्षमता 20 ते 80 मेगावॅट अशी आहे. यामुळे आधीच साठवलेली वीज पुन्हा ग्रिडमध्ये पाठवता येईल. त्यामुळे ग्राहकांना थेट फायदा होईल. तसेच वितरण कंपन्यांना महागड्या दराने वीज खरेदी करावी लागणार नाही.

बिहारमधील प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (पीएमएवाययू)च्या 53,600 हून अधिक लाभार्थ्यांना पहिला हप्ता देखील पंतप्रधानांनी वितरीत केला. पीएमएवाययूच्या 6,600 हून अधिक पूर्ण झालेल्या घरांच्या गृहप्रवेश समारंभाचे औचित्य साधून ते काही लाभार्थ्यांना चाव्या देखील देणार आहेत.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
82 km in less than 1 hour: Delhi-Meerut Namo Bharat corridor set for full opening on Feb 22

Media Coverage

82 km in less than 1 hour: Delhi-Meerut Namo Bharat corridor set for full opening on Feb 22
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 22 फेब्रुवारी 2026
February 22, 2026

From Hours to Minutes: PM Modi’s Vision Turns Namo Bharat into Atmanirbhar Chips, AI & Global Pride