140 कोटी भारतीय विकसित भारताच्या उभारणीसाठी एकत्र आले आहेत: पंतप्रधान
आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपल्याला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट इथे भारतातच बनवली पाहिजे: पंतप्रधान
आदिवासी समाजाच्या विकासासाठी गेल्या 11 वर्षांमध्ये अभूतपूर्व प्रयत्न करण्यात आले आहेत: पंतप्रधान
ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी कारवाई नाही, तर ती आपल्या भारतीयांच्या संस्कारांची आणि भावनांची अभिव्यक्ती आहे: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील दाहोद येथे 24,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले  की, 26 मे या दिवसाला विशेष महत्व आहे कारण 2014 मध्ये आजच्याच दिवशी त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.  देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवणाऱ्या गुजरातच्या जनतेच्या अढळ पाठिंब्याचा आणि आशीर्वादाचा त्यांनी उल्लेख केला.  या विश्वासाने आणि प्रोत्साहनाने देशाची दिवसरात्र सेवा करण्याप्रति  त्यांच्या समर्पणाला बळ दिले  आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  गेल्या काही वर्षांमध्ये भारताने असे काही निर्णय घेतले आहेत जे अभूतपूर्व आणि अकल्पनीय होते, दशकांच्या जुन्या बंधनांमधून मुक्त होत आज  देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. "आज, देश  निराशेच्या आणि अंधाराच्या युगातून आत्मविश्वास आणि आशावादाच्या नवीन युगात उदयाला आला  आहे", असे ते म्हणाले.

"140 कोटी भारतीय विकसित भारताच्या उभारणीसाठी एकत्र आले आहेत", असे सांगत मोदी यांनी  आवश्यक वस्तूंचे भारतातच  उत्पादन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि स्वयंपूर्ण बनणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले.   जागतिक निर्मिती क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत असून  देशांतर्गत उत्पादन आणि निर्यात दोन्हीमध्ये  सातत्याने वाढ होत आहे असे ते म्हणाले. भारत आता स्मार्टफोन, ऑटोमोबाईल्स, खेळणी, संरक्षण उपकरणे आणि औषधे यासह विविध उत्पादनांची निर्यात करत आहे. ते पुढे म्हणाले  की भारत केवळ रेल्वे आणि मेट्रो तंत्रज्ञानाची निर्मिती करत नाही तर जागतिक स्तरावर त्याची निर्यातही करत आहे. या प्रगतीचे दाहोद  हे प्रमुख उदाहरण आहे जिथे हजारो कोटी रुपयांच्या मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि प्रारंभ  करण्यात आला असे सांगत मोदी यांनी  दाहोद इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह फॅक्टरी ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी असल्याचे अधोरेखित केले. तीन वर्षांपूर्वी त्यांनी याची पायाभरणी केल्याची आठवण करून दिली आणि पहिले इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आता यशस्वीरित्या तयार झाले आहे याबद्दल अभिमान व्यक्त केला. त्यांनी लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवला,  गुजरात आणि संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. याचबरोबर त्यांनी घोषणा केली की गुजरातने आपल्या रेल्वे नेटवर्कचे 100%  विद्युतीकरण साध्य केले आहे, हा एक उल्लेखनीय टप्पा असल्याचे नमूद करत त्यांनी  या कामगिरीबद्दल गुजरातच्या जनतेचे अभिनंदन केले.

 

दाहोदशी असलेले आपले  दीर्घकालीन नाते आणि या प्रदेशाशी निगडित अनेक आठवणींना उजाळा देत पंतप्रधानांनी सांगितले की ते गेल्या अनेक दशकांपासून दाहोदला भेट देत आहेत आणि त्यांच्या सुरुवातीच्या काळात ते अनेकदा सायकलवरून या भागात फिरले आहेत.  या अनुभवांमुळे त्यांना दाहोदची आव्हाने आणि क्षमता दोन्ही समजून घेता आल्या असे त्यांनी अधोरेखित केले. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरही, त्यांनी या अनेकदा या भागाला भेट दिली आणि तेथील समस्या सोडवण्यासाठी निर्णायक पावले उचलली. दाहोदमधील प्रत्येक विकास कार्य  त्यांना प्रचंड समाधान देते  आणि आज त्यांच्यासाठी आणखी एक अर्थपूर्ण दिवस आहे यावर त्यांनी भर दिला.

गेल्या 10-11 वर्षात भारताच्या रेल्वे क्षेत्राच्या जलद विकासावर प्रकाश टाकताना मोदी यांनी मेट्रो सेवांचा विस्तार आणि अर्ध द्रुतगती रेल्वेगाड्या सुरू करण्यावर भर दिला, ज्यामुळे देशभरातील संपर्कव्यवस्थेत बदल झाला. त्यांनी सांगितले की वंदे भारत ट्रेन आता जवळजवळ 70 मार्गांवर धावतात, ज्यामुळे भारताचे वाहतूक जाळे आणखी मजबूत होत आहे. त्यांनी अहमदाबाद आणि वेरावळ दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची घोषणा केली.

मोदी पुढे म्हणाले की, भारतात आधुनिक गाड्यांचा उदय हा देशातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे झाला आहे. त्यांनी यावर भर दिला की डबे आणि इंजिने आता देशामध्येच तयार होतात, ज्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होते. "भारत रेल्वे उपकरणांचा आघाडीचा निर्यातदार म्हणून उदयास आला आहे", असे मोदी म्हणाले, भारत ऑस्ट्रेलियाला मेट्रो डबे तसेच इंग्लंड, सौदी अरेबिया आणि फ्रान्सला रेल्वे डबे निर्यात करतो.

 

ते पुढे म्हणाले की मेक्सिको, स्पेन, जर्मनी आणि इटली देखील भारतातून रेल्वेशी संबंधित घटक आयात करतात. मोदी यांनी पुढे सांगितले की भारतीय प्रवासी डबे मोझांबिक आणि लंकेत वापरले जात आहेत आणि 'मेड इन इंडिया' इंजिने अनेक देशांमध्ये निर्यात केली जात आहेत. त्यांनी सांगितले की हे 'मेक इन इंडिया' उपक्रमाच्या सतत विस्ताराचे प्रतिबिंब आहे, ज्यामुळे राष्ट्रीय अभिमान वाढतो.

"एक मजबूत रेल्वे जाळे सुविधा वाढवते आणि उद्योग तसेच शेतीला चालना देते", असे पंतप्रधानांनी नमूद केले. गेल्या दशकात भारतातील अनेक प्रदेशांना पहिल्यांदाच रेल्वे जोडणी मिळाली आहे. त्यांनी नमूद केले की गुजरातमधील अनेक भागात पूर्वी फक्त लहान, संथ गतीने धावणाऱ्या गाड्या होत्या, परंतु आता अनेक नॅरो-गेज मार्गांचा विस्तार करण्यात आला आहे.

दाहोद आणि वलसाड दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडीसह आदिवासी पट्ट्याला मोठा फायदा होणाऱ्या अनेक रेल्वे मार्गांच्या उद्घाटनाची घोषणा करताना पंतप्रधान म्हणाले की कारखाने तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करतात. दाहोदचा रेल्वे कारखाना 9,000 अश्वशक्तीची इंजिने तयार करेल, ज्यामुळे भारतातील गाड्यांची शक्ती तसेच क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल, दाहोदमध्ये उत्पादित होणारे प्रत्येक इंजिन शहराचे नाव धारण करेल हे त्यांनी अधोरेखित केले.

येत्या काळात शेकडो इंजिने बांधले जातील, ज्यामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी भर दिला की हा कारखाना रेल्वेचे घटक तयार करणाऱ्या लघु उद्योगांना देखील पाठिंबा देईल, ज्यामुळे आजूबाजूच्या भागात आर्थिक विकास होईल. त्यांनी सांगितले की रोजगाराच्या संधी कारखान्याच्या पलीकडे विस्तारतात, ज्यामुळे शेतकरी, पशुधन मालक, दुकानदार आणि कामगारांना फायदा होतो आणि व्यापक आर्थिक प्रगती सुनिश्चित होते.

शिक्षण, आयटी, सेमीकंडक्टर आणि पर्यटन यासह अनेक क्षेत्रांमध्ये गुजरातने उल्लेखनीय प्रगती केली आहे यावर मोदी यांनी भर दिला. त्यांनी विविध उद्योगांमध्ये राज्याने स्वतःला आघाडीवर स्थापित केले आहे , असे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की गुजरातमध्ये हजारो कोटींच्या गुंतवणुकीतून एक मोठा सेमीकंडक्टर प्लांट उभारला जात आहे, ज्यामुळे जागतिक सेमीकंडक्टर उद्योगात भारताचे स्थान आणखी मजबूत होत आहे. त्यांनी सांगितले की या उपक्रमांमुळे गुजरातमधील लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत, ज्यामुळे राज्याच्या आर्थिक वृद्धी आणि विकासात हातभार लागत आहे.

 

दाहोद, वडोदरा, गोधरा, कलोल आणि हलोल यांनी एकत्रितपणे गुजरातमध्ये एक उच्च-तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि उत्पादन कॉरिडॉर स्थापन केला आहे हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. वडोदरा काही महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या एअरबस असेंब्ली लाइनसह विमान उत्पादनात वेगाने प्रगती करत आहे, असेही त्यांनी सांगितले. वडोदरा हे भारतातील पहिले गतिशक्ती विद्यापीठ देखील आहे, असेही ते म्हणाले. सावली येथे आधीच एक प्रमुख रेल्वे- डबे उत्पादन कारखाना आहे, तर दाहोदमध्ये आता भारतातील सर्वात शक्तिशाली लोकोमोटिव्ह - 9,000 अश्वशक्तीची इंजिने - तयार करण्याची सुविधा आहे, जी देशासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गोधरा, कलोल आणि हलोलमध्ये उत्पादन युनिट्स, लघु उद्योग तसेच सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग यांची लक्षणीय उपस्थिती असून ते गुजरातच्या औद्योगिक विकासात योगदान देत आहेत, असे ते म्हणाले. हा प्रदेश सायकल आणि मोटारसायकलपासून रेल्वे इंजिन आणि विमानांपर्यंत सर्व काही उत्पादन करण्यासाठी ओळखला जाईल अशी भविष्यातील गुजरातची कल्पना पंतप्रधानांनी केली. असा उच्च-तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि उत्पादन कॉरिडॉर जागतिक स्तरावर दुर्मिळ आहे, जो औद्योगिक पॉवरहाऊस म्हणून गुजरातचे स्थान मजबूत करतो, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

"विकसित भारताच्या उभारणीसाठी आदिवासी क्षेत्रांचा विकास आवश्यक आहे", असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की गेल्या 11 वर्षांत आदिवासी समुदायांच्या उन्नतीसाठी अभूतपूर्व प्रयत्न केले गेले आहेत. गुजरातच्या आदिवासी भागात काम करण्याचा आपला दीर्घ अनुभव राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांना हातभार लावत असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरातमधील आदिवासी मुलांना विज्ञान शिकण्यात आव्हानांचा सामना करावा लागत होता अशा काळाची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. आज संपूर्ण आदिवासी पट्ट्यात दर्जेदार शिक्षणाची सुविधा, चांगली महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैद्यकीय महाविद्यालये आणि या समुदायांना सेवा देणारी दोन समर्पित आदिवासी विद्यापीठे उपलब्ध आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या 11 वर्षांत एकलव्य मॉडेल शाळांचे जाळे लक्षणीयरीत्या मजबूत झाले आहे, ज्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी चांगल्या शैक्षणिक संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. दाहोदमध्येच अनेक एकलव्य मॉडेल शाळा असून त्या आदिवासी शिक्षणाला आणखी पाठिंबा देत आहेत, असेही ते म्हणाले.

देशभरातील आदिवासी समुदायांच्या विकासासाठी केल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सांगितले की स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आदिवासी गावांच्या उन्नतीसाठी एक मोठी योजना सुरू करण्यात आली आहे. 'धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान' हा एक ऐतिहासिक उपक्रम असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार सुमारे 80,000 कोटी रुपये गुंतवणूक करत आहे, असे त्यांनी नमूद केले. या योजनेअंतर्गत, गुजरातसह देशभरातील 60,000 हून अधिक गावांमध्ये विकास कामे केली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. जीवनमान सुधारण्यासाठी या गावांमध्ये वीज, पाणी, रस्ते, शाळा आणि रुग्णालये सुसज्ज केली जात आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. आदिवासी कुटुंबांसाठी पक्की घरे बांधली जात असून त्यामुळे या समुदायाच्या चांगल्या राहणीमानाची खात्री होते हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

 

सर्वाधिक उपेक्षित  आदिवासी समुदायांच्या उन्नतीसाठी आपल्या वचनबद्धतेवर पंतप्रधान मोदी यांनी  भर दिला आणि आपले सरकार  सरकार दीर्घकाळ उपेक्षित असलेल्यांना प्राधान्य देत असल्याचे सांगितले. त्यांनी अधोरेखित केले की, विशेषतः असुरक्षित असलेल्या आदिवासी समुदायांसाठी सरकारने पहिल्यांदाच पंतप्रधान जनमन योजना सुरू केली आहे जेणेकरून  अनेक दशकांपासून आवश्यक सुविधांपासून वंचित राहिलेल्या विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांना मदत करता येईल.  या योजनेअंतर्गत, आदिवासी गावांमध्ये नवीन पायाभूत सुविधा आणि सोयी विकसित केल्या जात आहेत आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात आहेत. यामुळे  या समुदायांसाठी अधिक आर्थिक आणि सामाजिक समावेशन सुनिश्चित केले जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

आदिवासी समुदायांना सिकलसेल अॅनिमियापासून मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय मोहिमेच्या प्रारंभाबाबत  पंतप्रधानांनी सांगितले.  या उपक्रमांतर्गत लाखो आदिवासी नागरिकांची तपासणी झाली आहे.  विकासामध्ये मागे पडलेल्या क्षेत्रांच्या  विकासाला गती देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे यावर त्यांनी  भर दिला. पूर्वी 100 हून अधिक जिल्हे पूर्वी मागास म्हणून गणले जायचे, त्यापैकी बरेच आदिवासी बहुल क्षेत्र होते. त्यापैकी  दाहोद हा असाच एक जिल्हा होता, परंतु आज तो आधुनिक पायाभूत सुविधा आणि स्मार्ट सुविधांसह कायापालट होत असलेला  आकांक्षी जिल्हा म्हणून प्रगती करत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.   दक्षिण दाहोदमध्ये  तीव्र पाणीटंचाई होती, परंतु आता शेकडो किलोमीटर जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत, त्यामुळे  नर्मदेचे पाणी प्रत्येक घरात पोहोचते आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.  गेल्या काही वर्षांत उमरगाम ते अंबाजीपर्यंत 11 लाख एकर जमिनीला  सिंचनसुविधा उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे आदिवासी समुदायांसाठी शेती करणे सुलभ झाले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

देश आणि सशस्त्र दलांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी वडोदरा येथे जमलेल्या  हजारो महिलांच्या प्रचंड उपस्थितीचे कौतुक करताना, पंतप्रधान मोदी यांनी  देशातील महिलांच्या अढळ पाठिंब्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी दाहोद ही त्याग आणि समर्पणाची भूमी आहे हे अधोरेखित केले.  महर्षी दधीची यांनी सृष्टीचे रक्षण करण्यासाठी दुधीमती नदीच्या काठावर आपले जीवन अर्पण केले याची आठवण त्यांनी  करून दिली. संकटाच्या काळात स्वातंत्र्यसैनिक तात्या टोपे यांना या प्रदेशाने साहाय्य केले आणि मानगड धाम हे गोविंद गुरू  आणि शेकडो आदिवासी योद्ध्यांनी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक असल्याचे  देखील मोदी यांनी नमूद केले. भारताची सांस्कृतिक मूल्ये अन्यायाविरुद्ध कारवाईची मागणी करतात, यावर भर देऊन, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्र शांत राहू शकते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  मोदी म्हणाले, "ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नव्हती तर भारताच्या मूल्यांचे आणि भावनांचे प्रतिबिंब होते". दहशतवाद्यांना त्यांच्या कृतींच्या परिणामांची कल्पना नव्हती, असे त्यांनी नमूद केले, एका वडिलांना त्याच्या मुलांसमोर मारण्याच्या क्रूर प्रसंगाचा उल्लेख त्यांनी केला.  पंतप्रधान म्हणाले, अशी दृश्ये अजूनही देशभरात संताप निर्माण करतात, 140 कोटी भारतीयांना दहशतवादाने आव्हान दिले आहे. पंतप्रधानांनी जाहीर केले की त्यांनी देशाचे नेते म्हणून आपली जबाबदारी पार पाडली, भारतीय सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले, त्यानंतर  सशस्त्र दलांनी दशकांमध्ये झाली नव्हती अशी कारवाई केली. सीमेपलीकडे नऊ प्रमुख दहशतवादी तळ ओळखून  22 मिनिटांत ते उद्ध्वस्त करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.   पाकिस्तानच्या सैन्याने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु भारतीय सैन्याने त्यांचा निर्णायक पराभव केला, असे त्यांनी सांगितले.  दाहोदच्या पवित्र भूमीवरून सशस्त्र दलांच्या  धैर्य आणि समर्पणाला वंदन करत पंतप्रधानांनी सशस्त्र दलांच्या शौर्याबद्दल पुन्हा आदर व्यक्त केला.

 

फाळणीनंतर जन्माला आलेल्या देशाने भारतासोबत शत्रुत्व राखण्यावर आणि हानी पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. “तर , भारत मात्र गरिबी निर्मूलन,अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि विकास साध्य करण्यासाठी वचनबद्ध आहे”, असे ते म्हणाले. विकसित भारताची निर्मिती तेव्हाच होऊ शकते जेव्हा  सशस्त्र दल आणि अर्थव्यवस्था हे दोन्ही मजबूत असतील,असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, सरकार या दिशेने सतत काम करत आहे, राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक विकास एकत्र मिळून चालेल याची खातरजमा करत आहे.

दाहोदमधे असलेल्या अफाट क्षमतेवर प्रकाश टाकत, हा कार्यक्रम म्हणजे त्याच्या क्षमतांची फक्त एक झलक असल्याचे सांगत, मोदींनी दाहोदच्या मेहनती लोकांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आणि नव्याने विकसित केलेल्या सुविधांचा ते सर्वोत्तम वापर करतील आणि दाहोदला देशातील सर्वात विकसित जिल्ह्यांपैकी एक बनवतील, यावर भर दिला. त्यांनी दाहोदच्या लोकांचे पुन्हा एकदा अभिनंदन करून, त्यांच्या समर्पणवृत्तीवर  आणि प्रगतीवरील आपला विश्वास  व्यक्त केला.

 

या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री  भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री  अश्विनी वैष्णव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

दळणवळणाच्या सुविधा वाढवण्याच्या आणि जागतिक दर्जाच्या प्रवासी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधानांनी दाहोद येथे भारतीय रेल्वेच्या लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्पाचे  उद्घाटन केले. यातून देशांतर्गत तसेच निर्यात करण्यासाठी 9000 एचपी क्षमतेचे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह तयार केले जातील. त्यांनी प्रकल्पातून उत्पादित केलेल्या पहिल्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवला.या गाड्या भारतीय रेल्वेची मालवाहतूक क्षमता वाढविण्यास मदत करतील.या गाड्या रीजनरेटीव्ह ब्रेकिंग सिस्टमने सुसज्ज असतील आणि ऊर्जा वापर कमी करण्यासाठी डिझाइन केले जात आहेत, ज्यामुळे पर्यावरणीय सुरक्षेला हातभार लागेल.

 

त्यानंतर, पंतप्रधानांनी दाहोदमध्ये 24,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. या प्रकल्पांमध्ये रेल्वे  आणि गुजरात सरकारच्या विविध प्रकल्पांचा समावेश आहे.यावेळी त्यांनी वेरावळ आणि अहमदाबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस आणि वलसाड आणि दाहोद स्थानकांदरम्यान जलद गाडीला  हिरवा झेंडा दाखवला.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Centre hikes non-urea fertiliser subsidy 10-21% amid West Asia crisis

Media Coverage

Centre hikes non-urea fertiliser subsidy 10-21% amid West Asia crisis
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam highlighting the importance of inner wisdom
April 09, 2026

Prime Minister Shri Narendra Modi shared a Sanskrit Subhashitam today highlighting the importance of inner wisdom as the true essence of the universe.

The Prime Minister remarked that India's heritage and culture have consistently taught that true knowledge and its rightful application are the foundation of a nation's progress. Shri Modi observed that by following this path, the youth of the country are actively engaged in building a prosperous and empowered India. He further noted that this wisdom, which resides within us and transcends ordinary knowledge, is worshipped by great and wise men.

The Prime Minister wrote on X:

"हमारी विरासत और संस्कृति हमें यही सिखाती आई है कि सच्चा ज्ञान और उसका सदुपयोग ही राष्ट्र की प्रगति का आधार है। इसी मार्ग पर चलकर आज हमारे देश के युवा समृद्ध और सशक्त भारत को गढ़ने में जुटे हैं।

अन्तःस्थमेव यज्ज्ञानं ज्ञानादपि च यत्परम्।
तदेव सर्वसंसारसारं सद्भिरुपास्यते॥"

The wisdom that resides within us, which transcends ordinary or external knowledge, is the true essence of this entire universe. It is this inner wisdom that is worshipped by great men and wise men.