तुमकुरू औद्योगिक वसाहत आणि तुमकुरू येथे जल जीवन अभियानातील दोन प्रकल्पांची पंतप्रधानांच्या हस्ते कोनशीला बसवली
“दुहेरी इंजिन सरकारने कर्नाटकला गुंतवणूकदारांचा पहिला पर्याय म्हणून स्थापित केले”
“आपल्या संरक्षणक्षेत्रविषयक गरजांच्या बाबतीत परदेशावरील अवलंबित्व आपण कमी करायला हवे”
“ ‘राष्ट्र प्रथम’ संकल्पनेच्या भावनेमुळे हमखास यशाची सुनिश्चिती”
“हा कारखाना आणि एचएएल कंपनीच्या वाढत्या सामर्थ्यामुळे खोटेपणा करणाऱ्यांचे पितळ उघड”
“फूड पार्क आणि एचएएल नंतर विकसित झालेली ही औद्योगिक वसाहत म्हणजे तुमकुरूला मिळालेली मोठी देणगी आहे आणि तुमकुरूला देशातील मोठे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी तिचा फार मोठा हातभार लागेल”
“दुहेरी इंजिन सरकार सामाजिक पायाभूत सुविधा तसेच भौतिक पायाभूत सुविधा या दोन्हीकडे सारखेच लक्ष पुरवत आहे”
“यावर्षीचा अर्थसंकल्प म्हणजे समर्थ भारत, संपन्न भारत, स्वयंपूर्ण भारत, शक्तिमान भारत आणि गतिमान भारत घडवण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल”
“या अर्थसंकल्पात देण्यात आलेल्या करविषयक लाभांमुळे मध्यमवर्गीयांमध्ये प्रचंड उत्साही वातावरण”
“महिलांच्या आर्थिक समावेशनामुळे घरात त्यांच्या मताला अधिक वजन मिळते आणि या वर्षीच्या अर्थसंकल्पात यासाठी अनेक तरतुदी”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तुमकुरू येथे एचएएल हेलिकॉप्टर कारखान्याचे लोकार्पण केले. तसेच त्यांनी तुमकुरू औद्योगिक वसाहत आणि तुमकुरू मधील टिपूर आणि चिक्कनायकनहळ्ळी या दोन ठिकाणी जल जीवन अभियान प्रकल्पांची कोनशीला देखील बसविली. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी हेलिकॉप्टर निर्माण सुविधा आणि स्ट्रक्चर हँगर यांची पाहणी केली तसेच हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरचे अनावरण केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की कर्नाटक ही साधूंची आणि संतांची भूमी आहे आणि या भूमीने अध्यात्मिकता, ज्ञान आणि वैज्ञानिक मूल्यांची  भारतीय परंपरा बळकट केली आहे. तुमकुरुचे विशेष महत्त्व आणि सिद्धगंगा मठाच्या योगदानाचा देखील त्यांनी ठळक उल्लेख केला. शिवकुमार स्वामी यांनी घालून दिलेला अन्न, अक्षर आणि आश्रय यांचा वारसा आज सिद्धलिंग स्वामींकडून पुढे चालवला जात आहे अशी माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज युवकांसाठी रोजगार संधी निर्माण करणाऱ्या, ग्रामीण भागातील जनतेचे आणि महिलांचे आयुष्य अधिक सुखकर करणाऱ्या, सशस्त्र दलांना बळकटी तसेच ‘स्वदेशात निर्मितीची’ संकल्पना बळकट करणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे किंवा त्यांची पायाभरणी केली जात आहे.

कर्नाटकातील युवकांची प्रतिभा आणि नवोन्मेष यांची प्रशंसा करून पंतप्रधान म्हणाले की  ड्रोन्स ते तेजस लढाऊ विमाने अशा अनेक उत्पादनांमध्ये निर्मिती क्षेत्राचे सामर्थ्य दिसून येत आहे. “दुहेरी इंजिन सरकारने कर्नाटकला गुंतवणूकदारांचा पहिला पर्याय म्हणून स्थापित केले,” पंतप्रधान म्हणाले. आज लोकार्पण झालेल्या एचएएलच्या प्रकल्पाची कोनशीला संरक्षण क्षेत्रविषयक गरजांच्या बाबतीत परदेशावरील अवलंबित्व कमी करण्याच्या निर्धारासह 2016 मध्ये आपण बसवली होती असे त्यांनी स्पष्ट केले.

संरक्षण दलांमध्ये आज वापरली जात असलेली हजारो प्रकारची शस्त्रे आणि संरक्षण क्षेत्रातील इतर सामग्री यांचे उत्पादन भारतात होऊ लागल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. “प्राणघातक आधुनिक रायफल्स ते रणगाडे, विमानवाहू जहाजे, हेलिकॉप्टर्स, लढाऊ विमाने, वाहतूक करणारी विमाने अशा सर्व प्रकारच्या सामग्रीचे उत्पादन भारतात होत आहे,” पंतप्रधान म्हणाले. हवाई क्षेत्राच्या कामगिरीवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी सांगितले की गेल्या 8 ते 9 वर्षांत या क्षेत्रात झालेली गुंतवणूक 2014 पूर्वी आणि त्याच्या अगोदरच्या 15 वर्षांत या क्षेत्रात करण्यात आलेल्या गुंतवणुकीच्या पाचपट आहे. भारतात निर्मित शस्त्रास्त्रे केवळ आपल्या देशाच्याच संरक्षण दलांना पुरविली जात नाहीत तर संरक्षण सामग्रीची देशातून होणारी निर्यात देखील 2014 पूर्वी होत असलेल्या निर्यातीच्या कितीतरी पटींनी वाढली आहे. नजीकच्या भविष्यात तुमकुरू येथील प्रकल्पातून शेकडो  हेलिकॉप्टरची  निर्मिती होणार असून त्यातून 4 लाख कोटी रुपयांची व्यापारी उलाढाल होईल या मुद्द्यावर पंतप्रधानांनी भर दिला. “जेव्हा अशा प्रकारची उत्पादन एकके उभारली जातात, तेव्हा केवळ सशस्त्र दलांच्या सामर्थ्यात वाढ होते असे नाही तर त्यायोगे रोजगार आणि स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात” असे पंतप्रधानांनी सांगितले. तुमकुरु येथील हेलिकॉप्टर कारखान्याच्या परिसरातले  छोटे उद्योग देखील यामुळे अधिक सक्षम होतील, असे पंतप्रधानांनी   अधोरेखित केले.

“राष्ट्र प्रथम” या भावनेने प्रेरित होऊन कार्य केल्यास यश निश्चित आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या   कामकाजात सुधारणा आणि पुनरुज्जीवन आवश्यक असून खाजगी क्षेत्रासाठी संधी खुल्या करण्याबाबत त्यांनी विचार मांडले.

अलीकडेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नावाखाली अपप्रचार करून केंद्र सरकारला बदनाम करण्याच्या घटनेचा त्यांनी उल्लेख केला. असत्य हे कितीही मोठे असले, वारंवार सांगितले गेले किंवा किंवा उच्चरवात सांगितले तरी सत्यासमोर त्याचा नेहमी पराभव होतो, असे ते म्हणाले. “हा कारखाना आणि एच ए एलच्या वाढत्या सामर्थ्याने खोटे बोलणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. वास्तव  नेहमी स्वतःच बोलते” असे सांगून ते म्हणाले की हेच  एच ए एल आज भारतीय सशस्त्र दलांसाठी अत्याधुनिक तेजसची निर्मिती करत असून ते वैश्विक आकर्षणाचे केंद्र झाले आहे, एवढेच नव्हे तर संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यात योगदान देत आहे.   

फूड पार्क आणि एच ए एल  नंतर टुमकुरु औद्योगिक नगरी ही तुमकुरुला  मिळालेली मोठी भेट आहे, ज्यामुळे तुमकुरुला देशाचे मोठे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्यात मदत होईल, असे पंतप्रधान म्हणाले. ही वसाहत पी एम गतीशक्ती बृहद आराखड्या अंतर्गत विकसित होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. त्यामुळे ती मुंबई-चेन्नई महामार्ग, बेंगळुरू विमानतळ, तुमकुरु रेल्वे स्थानक, मंगलुरू बंदर मार्गे बहुपर्यायी संपर्क यंत्रणेने जोडली  जाईल.

“डबल इंजिन सरकार जितके भौतिक पायाभूत सुविधांच्या विकासावर  लक्ष केंद्रित करत आहे तितकेच सामाजिक पायाभूत सुविधांवर देखील करत आहे” असे ते म्हणाले. यावर्षीच्या अर्थसंकल्पावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सांगितले की, अर्थसंकल्पात जलजीवन अभियानासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत 20,000  कोटी रुपयांची  वाढीव तरतूद  केली आहे आणि या योजनेचा सर्वात मोठा लाभ अशा माता-भगिनींना मिळणार  आहे ज्यांना आता आपल्या घरासाठी पाणी आणण्याकरता दूरवर जावे लागणार नाही. गेल्या तीन वर्षात या योजनेची व्याप्ती 3 कोटी ग्रामीण कुटुंबांपासून 11 कोटी ग्रामीण कुटुंबांपर्यंत पोहोचली आहे, असे ते म्हणाले. डबल इंजिन सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत पंतप्रधान म्हणाले की अप्पर भद्रा प्रकल्पासाठी 5,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ज्यामुळे तुमकुरु, चिकमंगलुरू, चित्रदुर्ग, दावणगेरे आणि मध्य कर्नाटकातील दुष्काळग्रस्त भागांना फायदा होईल. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना देखील याचा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.

यावर्षीचा  मध्यम वर्ग स्नेही अर्थसंकल्प ‘विकसित भारताच्या” निर्मितीच्या प्रत्येकाच्या प्रयत्नांना बळ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा अर्थसंकल्प समर्थ भारत, संपन्न भारत, स्वयंपूर्ण भारत, शक्तीमान भारत, गतिमान भारत या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. “हा  एक लोकप्रिय, सर्वांच्या जीवनाला स्पर्श करणारा, सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे” असे पंतप्रधानांनी सांगितले. वंचित, युवा आणि शेती करणाऱ्या महिला या सर्वांसाठी या अर्थसंकल्पात असलेल्या लाभांची त्यांनी माहिती दिली. "अर्थसंकल्पात आम्ही तुमच्या गरजा, तुम्हाला पुरवले  जाणारे  सहाय्य  आणि तुमचे उत्पन्न या तिन्ही बाबी लक्षात घेतल्या  आहेत", असे ते म्हणाले .

समाजातील ज्या वर्गाला  सरकारी मदत मिळणे अवघड होते  त्या वर्गाच्या सक्षमीकरणासाठी  2014 पासून सरकारने केलेल्या प्रयत्नांवर पंतप्रधानांनी भर दिला. “एकतर सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत किंवा मध्यस्थांनी त्यांना लुबाडले , असे सांगत पूर्वीपासून वंचित राहिलेल्या प्रत्येक वर्गाला त्यांच्या सरकारने दिलेली मदत पंतप्रधानांनी अधोरेखित केली.‘कर्मचारी-कामगार’ वर्गाला निवृत्तीवेतन  आणि विम्याची सुविधा पहिल्यांदाच मिळाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. छोट्या शेतकर्‍यांना मदत करणाऱ्या पीएम-शेतकरी सन्मान निधीला स्पर्श करत त्यांनी  पदपथावरील  विक्रेत्यांना उपलब्ध करून दिलेल्या कर्जाचा उल्लेख केला. यंदाचा अर्थसंकल्पही त्याच भावनेला पुढे नेणारा असल्याचे नमूद करत जे आपल्या हाताच्या कौशल्याने  आणि हाताने वापरल्या जाणाऱ्या साधनांच्या माध्यमातून  निर्मिती करणाऱ्या   कुंभार, कम्मार  अक्कासलिगा, शिल्पी, गारेकेलासदवा, बडगी आणि अन्य कारागीरांना किंवा विश्वकर्मांना  त्यांची कला आणि कौशल्ये अधिक समृद्ध करण्याची संधी देणारी पंतप्रधान विकास योजना पंतप्रधानांनी अधोरेखित केली.  

महामारीच्या काळात गरिबांसाठी विनामूल्य  रेशन देण्यासाठी सरकारने 4लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. गरिबांसाठी घरांसाठी 70 हजार कोटी रुपयांची अभूतपूर्व तरतूद करण्यात आली आहे, अशा वंचित आणि गरीबांच्या मदतीसाठी केलेल्या अनेक उपायोजनांची यादी पंतप्रधानांनी यावेळी सांगितली.

मध्यमवर्गीयांना लाभदायक ठरणाऱ्या अर्थसंकल्पातील तरतुदी अधोरेखित करत पंतप्रधानांनी प्राप्तिकरातील कर फायदे स्पष्ट केले.सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य प्राप्तिकर  असल्याने मध्यमवर्गीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.विशेषत: 30 वर्षांखालील तरुण, ज्यांच्याकडे नवीन नोकरी, नवीन व्यवसाय आहे, त्यांच्या खात्यात दर महिन्याला अधिक पैसे येतील,”असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे ठेव मर्यादा 15 लाखांवरून 30 लाखांपर्यंत वाढवून दुप्पट केल्याने सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना मदत होईल. रजा रोखीकरणावरील कर सवलत पूर्वी 3 लाखांच्या तुलनेत आता 25 लाखांपर्यंत करण्यात आली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

“महिलांच्या आर्थिक समावेशनामुळे घरातील त्यांचा आवाज बळकट होतो आणि घरातील निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग वाढतो, असे महिलांच्या आर्थिक समावेशनाच्या केंद्रस्थानावर भर देत पंतप्रधान म्हणाले. या अर्थसंकल्पात आम्ही ,आमच्या माता, भगिनी  आणि मुली अधिकाधिक बँकांशी  जोडल्या जाव्यात यासाठी   मोठी पावले उचलली आहेत.आम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना घेऊन आलो आहोत. सुकन्या समृद्धी, मुद्रा, जन-धन योजना आणि पीएम आवास नंतर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा एक मोठा उपक्रम असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे किंवा सहकाराचा विस्तार करताना शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर मदत करत  या अर्थसंकल्पात ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अधिकाधिक लक्ष केंद्रित केल्यावर  पंतप्रधानांनी भर दिला.त्याचा फायदा शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांना होईल, तर कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस सहकारी संस्था स्थापन करण्यास मदत मिळेल, असे ते म्हणाले. नजीकच्या काळात, अनेक नवीन सहकारी संस्थाही स्थापन केल्या जातील आणि अन्नधान्याच्या साठवणुकीसाठी देशभरात मोठ्या प्रमाणात गोदामे  बांधली जातील,  यामुळे लहान शेतकऱ्यांनाही आपले धान्य साठवून त्याची  चांगल्या दराने विक्री करता  येईल अशी माहिती त्यांनी दिली. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून लहान शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी हजारो मदत केंद्रेही स्थापन करण्यात येत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

कर्नाटकात भरडधान्यांचे  महत्त्व समजलेले आहे  इथे भरडधान्याला ‘श्री अन्न ’ अशी ओळख याआधीच देण्यात आली आहे, आता याच भावनेला देश पुढे नेत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यंदाच्या अर्थसंकल्पात भरड धान्याच्या उत्पादनावर दिलेला भरही त्यांनी अधोरेखित केला आणि कर्नाटकातील छोट्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री   बसवराज बोम्मई, केंद्रीय संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री  ए नारायणस्वामी आणि कर्नाटक सरकारचे मंत्री उपस्थित होते.

पार्श्वभूमी

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरताच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, पंतप्रधानांनी तुमकुरू येथील एचएएल हेलिकॉप्टर कारखाना राष्ट्राला समर्पित केला. 2016 मध्ये या कारखान्याची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली होती. हा एक समर्पित नवीन ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर कारखाना असून यामुळे   हेलिकॉप्टर तयार करण्याची क्षमता आणि व्यवस्था यात वाढ करेल. हे आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर निर्मिती केंद्र असून  या माध्यमातून सुरुवातीला लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (एलयुएच ) तयार करण्यात येतील. एलयुएच हे स्वदेशी डिझाइन केलेले आणि विकसित केलेले 3-टन श्रेणीचे , उच्च कार्यक्षमतेची अनोखी वैशिष्ट्ये  असणारे एकच इंजिन असलेले  बहुउद्देशीय उपयुक्त हेलिकॉप्टर आहे . भविष्यात हलकी लढाऊ  हेलिकॉप्टर (एलसीएच ) आणि भारतीय बहुकार्यक्षम  हेलिकॉप्टर (आयएमआरएच ) तसेच एलसीएच, एलयुएच, सिविल एएलएच आणि आयएमआरएच  यांसारख्या अन्य हेलिकॉप्टर्सच्या  दुरुस्तीसाठी  आणि  पूर्ण परीक्षणासाठी   कारखान्याचा विस्तार केला जाईल.  भविष्यात  सिव्हिल एलयूएच   निर्यात करण्याची क्षमता देखील या कारखान्यात आहे. या सुविधेमुळे भारताला संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या हेलिकॉप्टरची  निर्मिती करता येईल आणि  हेलिकॉप्टर डिझाइन, विकास आणि निर्मितीमध्ये आत्मनिर्भर  बनवण्याचा बहुमान भारताला प्राप्त होईल. या कारखान्यात उद्योग  4.0 मानकांच्या दर्जाची उत्पादन सज्जता असेल. पुढील 20 वर्षांमध्ये,  तुमकुरु इथून  3-15 टनांच्या श्रेणीतील 1000 हून अधिक हेलिकॉप्टर्स  तयार करण्याची योजना एचएएल आखत आहे.यामुळे या  परिसरातील सुमारे 6000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

तुमकुरु औद्योगिक नगरीची   पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. राष्ट्रीय औद्योगिक मार्गिका विकास कार्यक्रमांतर्गत, चेन्नई -बंगळुरू औद्योगिक मार्गिकेचा  एक भाग म्हणून , तुमाकुरूमध्ये  8484 एकरमध्ये पसरलेल्या औद्योगिक नगरीचा  विकास तीन टप्प्यांत हाती घेण्यात आला आहे.

या  कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी तुमाकुरू येथील तिप्तूर आणि चिक्कनायकनहल्ली येथे दोन जल जीवन अभियान  प्रकल्पांची पायाभरणीही केली.तिप्तूर बहु-ग्राम पेयजल पुरवठा प्रकल्प 430 कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे. चिक्कनायकनहल्ली तालुक्यातील 147 वस्त्यांसाठी  बहु-ग्राम पाणीपुरवठा योजना प्रकल्प सुमारे रु.115 कोटी  खर्चून बांधण्यात येणार आहे.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
DPIIT Releases BHAVYA Scheme Guidelines To Develop 100 Industrial Parks With Rs 33,660 Crore Investment Push

Media Coverage

DPIIT Releases BHAVYA Scheme Guidelines To Develop 100 Industrial Parks With Rs 33,660 Crore Investment Push
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam praying for the eternal abundance, happiness and prosperity of all
May 25, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today shared a Sanskrit Subhashitam, observing that the boundless grace of nature, the energy of Surya Deva, and the holy blessings of rain enrich our lives with happiness and good fortune. Shri Modi expressed his heartfelt wish that the earth may forever remain vibrant, green, and prosperous.

The Prime Minister posted on X:

"प्रकृति की असीम कृपा, सूर्यदेव की ऊर्जा और वर्षा का पावन आशीर्वाद हम सभी के जीवन को सुख-सौभाग्य से समृद्ध करता है। मेरी कामना है कि धरती पर सदैव हरियाली और खुशहाली बनी रहे।

शं नो देवः सविता त्रायमाणः शं नो भवन्तूषसो विभातीः।

शं नः पर्जन्यो भवतु प्रजाभ्यः शं नः क्षेत्रस्य पतिरस्तु शम्भुः॥"

May Savita Deva, the radiant protector of the world, be auspicious for us. May the shining dawns bring happiness and well-being into our lives. May Parjanya, the god of rain, bring welfare to our people and may the gracious lord of the fields, crops, and land grant us happiness and prosperity.