पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील साणंद येथे सीजी सेमी'च्या आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट' (ओसॅट) सुविधेचे उद्घाटन केले. या प्रसंगाचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी हा उद्घाटन सोहळा म्हणजे देशाने निर्धारित केलेली उद्दीष्टे पूर्ण करण्याप्रती दृढ कटिबद्धतेचे प्रतीक असल्याचे उद्गार काढले. देशाने केलेले दृढ संकल्प कोणत्याही प्रकारे न डगमगता प्रत्यक्ष वास्तवात उतरवणे गरजेचे असल्याच्या मुदद्यावर त्यांनी भर दिला. "भारत जेव्हा एखादा संकल्प करतो, तेव्हा तो पूर्णत्वास नेतोच; आजचा कार्यक्रम हा त्याचाच पुरावा असल्याचे मोदी म्हणाले.
पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या धोरणात्मक दृष्टिकोनाचा मागोवा घेताना, पंतप्रधानांनी देशाला प्रगत तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र बनवणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याची आठवण करून दिली. देशांतर्गत डिझाइन आणि स्थानिक उत्पादनाच्या व्यापक धोरणांच्या जोरावर उभारलेल्या या तिसऱ्या मोठ्या सुविधेमध्ये व्यावसायिक 'चिप पॅकेजिंग'ला अधिकृतपणे सुरुवात होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. "आम्ही 'डिझाइन इन इंडिया' आणि 'मेक इन इंडिया' हे मूलभूत तत्त्व बाळगत यशस्वीपणे पुढचा पल्ला गाठला आहे," असे मोदींनी नमूद केले.
प्रकल्प अत्यंत कमी वेळात जलद गतीने विकसित करण्यात आला यावर भाष्य करताना, पंतप्रधानांनी या प्रकल्पाची 2024 मध्ये पायाभरणी करण्यात आली होती याची आठवण सांगत त्यानंतर लगेचच ऑगस्ट 2025 पर्यंत चिपच्या चाचणीला सुरुवात देखील झाल्याचे नमूद केले. प्रकल्पाच्या सुरुवातीपासून ते पूर्ण-स्तरीय उत्पादनापर्यंतचा हा अत्यंत वेगवान प्रवास, या प्रकल्पाशी संबंधित अनेक सहकाऱ्यांची अथक निष्ठा आणि कठोर परिश्रमांचेच फलित असल्याचे त्यांनी नमूद केले. "पायाभरणीपासून उत्पादनापर्यंतचा हा उल्लेखनीय प्रवास म्हणजे अनेक सहकाऱ्यांच्या अफाट कष्टांचेच फळ आहे," असे मत मोदींनी व्यक्त केले

सभास्थळी उपस्थितांना संबोधित करण्यापूर्वी झालेल्या वैयक्तिक भेटीगाठींचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी या सुविधेत काम करणाऱ्या समर्पित कर्मचाऱ्यांशी बोलताना आलेले अनुभव कथन केले. प्रदर्शनाची पाहणी करताना अनेक तरुण व्यावसायिकांशी थेट संवाद साधल्यानंतर, त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवलेली ऊर्जा, आशावाद आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे त्यांनी कौतुक केले. "आज ज्या तरुण सहकाऱ्याशी मी संवाद साधला, त्यातील प्रत्येक जणात पूर्ण आत्मविश्वास होता," असे मोदी म्हणाले
या नवीन सुविधेचे उद्घाटन करताना, भारतांतर्गत तसेच जपान आणि थायलंडमधील औद्योगिक भागीदारांना एकत्र आणणाऱ्या संयुक्त प्रयत्नांचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले. ही सुविधा म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्याचे एक उत्कृष्ट प्रतीक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हा प्रकल्प केवळ एक व्यावसायिक उपक्रम नसून, तंत्रज्ञानावरील परस्परांचा विश्वास आणि सीमेपलीकडील दृढ भागीदारीचा एक उत्तम आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले. ही एकात्मिक भागीदारी भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रवासाला नवीन गती देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या सव्वादोन वर्षांत झालेल्या अभूतपूर्व प्रगतीची दखल घेत, वार्षिक 20 कोटी युनिट्सच्या निर्मितीक्षमतेसह सुरू झालेल्या व्यावसायिक उत्पादनाच्या टप्प्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. वार्षिक 500 कोटी युनिट्सचे उद्दिष्ट गाठण्याच्या या समूहाच्या महत्त्वाकांक्षी ध्येयावर पूर्ण विश्वास व्यक्त करत, त्यांनी या वेगवान प्रगतीचे श्रेय देशभरात सुरू असलेल्या तंत्रज्ञान कार्यक्रमाच्या वाढत्या गतीला दिले. एक-एक पाऊल टाकत, प्रत्येक घटकाची उभारणी करत आणि प्रत्येक चिप तयार करत हे यश साध्य केल्याबद्दल त्यांनी संपूर्ण समूह, राज्य सरकार आणि देशाचे अभिनंदन केले.

उपस्थित सर्व उद्योग तज्ज्ञ आणि तरुण पिढीला संबोधित करताना, पंतप्रधानांनी जागतिक औद्योगिक इतिहासातील महत्त्वपूर्ण दाखले दिले. कोणताही खरा उत्पादनक्षम देश किंवा मॅन्युफॅक्चरिंग पॉवर ही केवळ काही मोजक्या, सुट्या कारखान्यांमुळे उभी राहत नाही, यावर त्यांनी भर दिला. 'सिलिकॉन व्हॅली', 'ह्सिंचू सायन्स पार्क' आणि 'त्सुकुबा सायन्स सिटी' सारख्या जगप्रसिद्ध तंत्रज्ञान केंद्रांचे उदाहरण देत, त्यांनी सर्वसमावेशक आणि एकात्मिक परिसंस्था विकसित करण्याची गरज व्यक्त केली. आज, सानंद देखील अशाच प्रकारची शक्तिशाली औद्योगिक क्लस्टर्स स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले.
देशांतर्गत परिसंस्थेच्या वेगाने होत असलेल्या विकासाचा सविस्तर आढावा घेताना, पंतप्रधानांनी केवळ काही महिन्यांच्या कालावधीत मायक्रॉन, केन्स आणि सीजी सेमी सारख्या आघाडीच्या कंपन्यांनी या भागात सुरू केलेल्या व्यावसायिक उत्पादनाचा प्रामुख्याने उल्लेख केला. आगामी काळात येथे येणारे विशेष रसायनांचे उत्पादक, चाचणी प्रयोगशाळा, डिझाइन सेंटर्स आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स याविषयीची माहिती देऊन त्यांनी, स्थानिक पातळीवरील उद्योग कशा प्रकारे आर्थिक आणि रोजगाराच्या व्यापक संधींमध्ये प्रचंड वाढ करतात, हे स्पष्ट केले. एका उद्योगातून आणखी दहा नवीन उद्योग जन्माला येतात आणि अखेर पूर्ण क्षेत्राची अर्थव्यवस्था बदलून टाकतात, हीच एका क्लस्टरची खरी ताकद असते, असे त्यांनी सांगितले.
या क्षेत्रातील तेजीमुळे देशभरात आणि जगभरात उत्साह निर्माण झाला असून, ही अचानक घडलेली घटना नसल्याचे ते म्हणाले. हा विस्तार म्हणजे प्रत्यक्षात गेल्या दहा वर्षांत आखलेल्या दीर्घकालीन तंत्रज्ञानविषयक धोरणांतून झालेली एक पद्धतशीर आणि सुनियोजित प्रगती असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या दशकात भारतात झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीचे हे पुढचे पाऊल असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
स्थानिक उत्पादन क्षेत्रातील या यशामागील प्रवासाचा आढावा घेताना, पंतप्रधानांनी पूर्वी स्मार्टफोनसाठी असलेल्या आयातीवरील अवलंबित्वाची आणि सध्याच्या उत्पादन क्षेत्रातील अभूतपूर्व वाढीची तुलना करत उत्पादनात तब्बल 33 पट वाढ झाल्याचा उल्लेख केला. त्यांनी मोबाइल क्षेत्रात भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार म्हणून ओळखला जातो असा अभिमानाने उल्लेख केला. या उल्लेखनीय टप्प्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक मोबाईल फोन उत्पादनापासून आपल्या प्रवासाची सुरुवात केली होती, असे मोदी म्हणाले.

गेल्या काही वर्षांतील देशांतर्गत परिसंस्थेच्या व्यापक यशाची आकडेवारी मांडताना, पंतप्रधानांनी संपूर्ण क्षेत्रातील उल्लेखनीय वाढीची माहिती दिली. 2014 च्या तुलनेत एकूण उत्पादनात जवळपास 7 पट वाढ झाली असून, एकूण निर्यातीत तब्बल 11 पट वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले. आपण संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन परिसंस्था यशस्वीपणे आणि सर्वसमावेशक पद्धतीने बळकट केली आहे, असेही मोदी म्हणाले.
अंतिम ग्राहक उत्पादनांमध्ये स्वावलंबन मिळवणे हेच सरकारचे अंतिम उद्दिष्ट नसून, त्या उत्पादनांच्या मूलभूत घटकांचे उत्पादन करणे हेही त्यामागचे उद्दिष्ट आहे, असे सरकारच्या धोरणात्मक आराखड्याबाबत अधिक माहिती देताना, पंतप्रधानांनी स्पष्ट केले. जागतिक तंत्रज्ञानाला चालना देणाऱ्या चिप्सचेही देशात उत्पादन करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत त्यांनी उत्पादनापासून घटक आणि सेमीकंडक्टर निर्मितीपर्यंतची संपूर्ण देशांतर्गत मूल्यसाखळी उभारण्याचा सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट केला. प्रथम उत्पादन, त्यानंतर घटक आणि आता सेमीकंडक्टर मेक इन इंडिया उपक्रमाच्या पुढील निर्णायक टप्प्याचे हेच स्वरूप आहे, असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.
परिसंस्थेच्या पुढील टप्प्यांची रूपरेषा स्पष्ट करताना, पंतप्रधानांनी संपूर्ण पुरवठा साखळी सुरक्षित करण्यासाठी उच्च-तंत्रज्ञानाधारित सामग्री आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रात स्वावलंबन प्राप्त करण्याची अत्यावश्यक गरज अधोरेखित केली. रचना ते पॅकेजिंगपर्यंतची देशांतर्गत साखळी उभारण्याची संकल्पना मांडत, त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्समधील पुढील पिढीच्या क्रांतीसाठी भारतात निर्मित चिप्सचा वापर करून देशातील युवक मोठी भूमिका बजावतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. आपले युवक मेड इन इंडिया चिप्सचा वापर करून पुढील पिढीतील तंत्रज्ञान क्रांतीला सक्रियपणे गती देतील, असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.
इतिहास साक्षी आहे की, प्रत्येक मोठ्या औद्योगिक परिवर्तनामुळे रोजगाराच्या अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत, असे युवकांना उद्देशून पंतप्रधान म्हणाले. माहिती तंत्रज्ञान आणि स्मार्टफोन उत्पादन क्षेत्रातील पूर्वीच्या प्रचंड वाढीमुळे उपलब्ध झालेल्या व्यापक संधींचा संदर्भ देत, सध्याच्या तांत्रिक परिवर्तनाच्या लाटेतूनही अशाच प्रकारच्या अफाट संधी उपलब्ध होतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांतीच्या युगामुळे संशोधन आणि रचनांपासून ते पुरवठा साखळी व्यवस्थापनापर्यंत असंख्य संधी निर्माण होत आहेत, असे मोदी म्हणाले.

नवीन गोष्टींचा सातत्याने अंगीकार करण्याचे आव्हान भावी कार्यबलास देत ताज्या दमाचे कौशल्य संपादन करण्यावर आणि अभिनव कल्पनांचा परिपोष करण्यावरच आधुनिक काळात यशस्वितेचे औचित्य अवलंबून आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. कृत्रिम बुद्धिमत्तेने खुली केलेली नवी क्षितिजे लक्षात आणून देत, अत्यंत महत्त्वाकांक्षेने या उगवत्या संधींवर पकड घेण्याचे आवाहन त्यांनी तरुण पिढीला केले. "काहीतरी नवीन शिकण्याची आणि करून दाखवण्याची ही अतुलनीय संधी भारताच्या युवावर्गाने अजिबात दवडता कामा नये" असे मोदींनी सांगितले.
या तांत्रिक प्रगतीचा सर्वसमावेशक सामाजिक प्रभाव मांडत पंतप्रधानांनी, नव्या केंद्रात सक्रिय असणाऱ्या आदिवासी समुदायातील तरुण स्त्रियांच्या प्रेरक कथा सांगितल्या. सर्वसामान्य पार्श्वभूमीतून पुढे येण्यापासून आयटीआय शिक्षण घेणे आणि मलेशियामध्ये प्रगत तांत्रिक प्रशिक्षण घेण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाने भारावून गेल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. आपल्या गावच्या वेशीबाहेरही न पडलेल्या या स्त्रियांनी जगातील सर्वात अद्ययावत उत्पादन प्रक्रिया राबवण्यात त्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी कौतुक केले. "खरोखरच असामान्य स्वप्ने बघणाऱ्या या कन्या आज 'मेड इन इंडिया' चिप उत्पादन प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहेत" असे पंतप्रधानांनी नमूद केले.

पूर्ण विकसित राष्ट्र होण्याकडे प्रवास करताना भारताने घेतलेल्या वेगाचा पुनरुच्चार करून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. काही महिन्यांपूर्वीच आश्वासन दिलेल्या बहु-उत्पादन सुविधांची निर्मिती अगदी वेळेवर प्रत्यक्षात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देशात पूर्णपणे धोरणात्मक स्थैर्य राहील आणि त्याबरोबरच निर्णयप्रक्रिया निःसंदिग्ध असेल, अंमलबजावणीचा वेग अतुल्य राहील अशी ग्वाही देत पंतप्रधानांनी व्यवस्थेतील आर्थिक सुधारणा अधिक वेगाने होतील असे आश्वासन दिले. "व्यवसायसुलभतेप्रति पूर्ण वचनबद्ध राहून, 140 कोटी भारतीय 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून नावारूपाला आणतील", असे पंतप्रधान म्हणाले.
Click here to read full text speech
The Semicon India programme is gathering rapid momentum...
— PMO India (@PMOIndia) July 4, 2026
Step by step.
Brick by brick.
Chip by chip. pic.twitter.com/EaEfWPNT2F
The expansion of the semiconductor industry in India did not happen overnight.
— PMO India (@PMOIndia) July 4, 2026
It is the next step in the electronics revolution that has taken place in India over the past decade. pic.twitter.com/fxQkRpY4W2
First products, then components and now semiconductors... India is building the entire electronics value chain.
— PMO India (@PMOIndia) July 4, 2026
This is the roadmap to Viksit Bharat. This is the next phase of Make in India. pic.twitter.com/aw556v0pmP
Our goal is to build a complete semiconductor ecosystem in India, from chip design to fabrication and packaging. pic.twitter.com/7CiVSTi5oE
— PMO India (@PMOIndia) July 4, 2026
India's youth will power the AI, robotics and next-gen tech revolution with Made in India chips. pic.twitter.com/pM8YJ3fgOx
— PMO India (@PMOIndia) July 4, 2026


