''गुलामगिरीच्या काळात स्वामी विवेकानंद यांनी देशाला नवी ऊर्जा आणि उत्साहाने भारले''
''राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या पवित्र प्रसंगी देशभरातल्या सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम आयोजित करा''
''नवे कुशल मनुष्यबळ म्हणून जग भारताकडे अपेक्षेने पाहत आहे''
'आजच्या युवापिढीला इतिहास घडवण्याची, आपले नाव इतिहासात कोरण्याची संधी आहे''
''आज देशाची वृत्ती आणि शैली तरुण आहे''
''अमृतकाळाचा प्रारंभ देशासाठी अभिमानाने भारलेला असून या अमृतकाळात युवांनी विकसित भारतासाठी देशाला पुढे न्यावे ''
''लोकशाहीत युवांचा अधिकाधिक सहभाग देशाचे अधिक उज्ज्वल भवितव्य घडवेल''
''प्रथमच मतदान करणारे नवमतदार देशाच्या लोकशाहीला नवी ऊर्जा आणि सामर्थ्य पुरवू शकतात''
''आगामी 25 वर्षांचा अमृतकाळ युवांसाठी कर्तव्याचा काळ असून युवा जेव्हा आपली कर्तव्ये सर्वोच्च स्थानी मानतात तेव्हा समाज आणि देश प्रगती करतात ''

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पंतप्रधान मोदी यांनी पुष्पांजली अर्पण केली. राज्य पथकांच्या संचालनाचे निरीक्षण त्यांनी केले  आणि 'विकसित भारत @ 2047 -युवांसाठी, युवांच्या माध्यमातून' ही संकल्पना असलेल्या ,जिम्नॅस्टिक, मलखांब, योगासने आणि राष्ट्रीय युवा महोत्सव गीताचा  समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला. 

पंतप्रधानांनी यावेळी कार्यक्रमाला संबोधित केले.  भारताच्या युवाशक्तीचा आजचा दिवस असून गुलामगिरीच्या काळात देशाला नवी ऊर्जा आणि उत्साहाने भारणारे महान व्यक्तिमत्त्व स्वामी विवेकानंद यांना समर्पित आजचा दिवस असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व युवांना शुभेच्छा दिल्या. भारतीय स्त्री शक्तीचे प्रतीक असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचा त्यांनी उल्लेख केला आणि या प्रसंगी महाराष्ट्रात उपस्थित असल्याबद्दल कृतज्ञभाव व्यक्त केला.

 

महाराष्ट्राच्या भूमीने देशाला अनेक महान व्यक्ती दिल्या असून शौर्य आणि सत्त्वशीलतेने भरलेल्या मातीची ही देणगी आहे., असे पंतप्रधान म्हणाले. ही भूमी अनेक थोर व्यक्तींची आहे. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवले, देवी अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर अशा महान महिलांची, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, अनंत कान्हेरे, दादासाहेब पोतनीस आणि चाफेकर बंधू अशा महान देशभक्तांची ही भूमी असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

“भगवान श्रीरामांनी नाशिकच्या पंचवटीत बराच काळ वास्तव्य केले,” असे पंतप्रधानांनी महापुरुषांच्या भूमीला वंदन करताना सांगितले. या वर्षी 22 जानेवारीपूर्वी स्वच्छता मोहीम राबवण्याच्या आणि भारतातील प्रार्थनास्थळे स्वच्छ करण्याच्या त्यांच्या आवाहनाचे स्मरण करून, पंतप्रधानांनी नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात दर्शन आणि पूजा केल्याचा उल्लेख केला. लवकरच उद्घाटन होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी देशातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे आणि तीर्थक्षेत्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याची आणि या कार्यात योगदान देण्याच्या  उपक्रमाचा त्यांनी यावेळी  पुनरुच्चार केला.

 

युवाशक्तीला सर्वोच्च ठेवण्याच्या परंपरेवर प्रकाश टाकत, पंतप्रधान मोदींनी, श्री अरबिंदो आणि स्वामी विवेकानंद यांचा उल्लेख करून, जगातील पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये भारताच्या प्रवेशाचे श्रेय युवाशक्तीला दिले. भारत हा  स्टार्टअप परिसंस्थेत पहिल्या 3 मध्ये असल्याचा, पेटंटची विक्रमी संख्या असलेला आणि देशाच्या युवा शक्तीचे प्रकटीकरण म्हणून एक प्रमुख उत्पादन केंद्र बनल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

‘अमृतकाळ’ चा सध्याचा क्षण हा भारतातील तरुणांसाठी एक अनोखा क्षण आहे, यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. एम विश्वेश्वरय्या, मेजर ध्यानचंद, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांसारख्या व्यक्तिमत्त्वांच्या काळानुरूप योगदानाचे स्मरण करून पंतप्रधानांनी ‘अमृतकाळ’ दरम्यान तरुणांना त्यांच्या तत्सम जबाबदाऱ्यांची आठवण करून देत देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी झटण्यास सांगितले. या अनोख्या संधीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान म्हणाले, “मी तुम्हाला भारताच्या इतिहासातील सर्वात भाग्यवान पिढी मानतो. मला माहित आहे की भारतातील तरुण हे ध्येय साध्य करू शकतात.” माय -भारत पोर्टलशी युवक ज्या वेगाने जोडले जात आहेत त्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. 75 दिवसांपेक्षा कमी कालावधीत 1.10 कोटी तरुणांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे.

 

सध्याच्या सरकारने भारतातील तरुणांसाठी संधींचा सागर उपलब्ध करून दिला आहे आणि सरकारला सत्तेत 10 वर्षे पूर्ण होत असताना देशातील युवा पिढीचे सर्व अडथळे दूर केले आहेत, हे नमूद करून पंतप्रधानांनी शिक्षण, रोजगार, उद्योजकता, उदयोन्मुख क्षेत्रे, स्टार्टअप्स, कौशल्य आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये आधुनिक आणि गतिमान परिसंस्थेच्या विकासाचा उल्लेख केला. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, आधुनिक कौशल्यवर्धन परिसंस्थेचा विकास, कला आणि हस्तकला क्षेत्रासाठी पीएम विश्वकर्मा योजनेची अंमलबजावणी, पीएम कौशल्य विकास योजनेद्वारे कोट्यवधी तरुणांचे कौशल्यवर्धन आणि देशात नवीन आयआयटी आणि एनआयटी ची उभारणी याचा त्यांनी उल्लेख केला. आपली कौशल्ये जगासमोर दाखवू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देण्याबाबत बोलताना मोदींनी नमूद केले कि “कुशल मनुष्यबळ असलेला देश म्हणून जग भारताकडे पाहत आहे.” फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, इटली, ऑस्ट्रिया आदी देशांसोबत सरकारने केलेल्या मोबिलिटी करारांचा देशातील तरुणांना मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले की, "आज तरुणांसाठी संधींचे एक नवीन क्षितीज खुले होत आहे आणि त्यासाठी सरकार पूर्ण ताकदीने काम करत आहे". ड्रोन, एनिमेशन, गेमिंग, कमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स, अण्विक, अंतराळ आणि मॅपिंग या क्षेत्रांमध्ये निर्माण होत असलेल्या सक्षम वातावरणाचा त्यांनी उल्लेख केला. सध्याच्या सरकारच्या काळात झपाट्याने होत असलेल्या प्रगतीवर भर देताना पंतप्रधान म्हणाले की, महामार्ग, आधुनिक गाड्या, जागतिक दर्जाचे विमानतळ, लसीकरण प्रमाणपत्रांसारख्या डिजिटल सेवा आणि परवडणारी माहिती यामुळे देशातील तरुणांसाठी नवीन मार्ग खुले होत आहेत. "आज देशाची मानसिकता  आणि काम करण्‍याची शैलीही  युवकांप्रमाणे वेगवान, नेतृत्व करणारी  आहे". आजचे तरुण मागे राहत नाहीत तर नेतृत्व करतात,  हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. म्हणूनच, चांद्रयान 3 आणि आदित्य एल 1 या यशस्वी मोहिमांची उदाहरणे देताना भारत तंत्रज्ञानात अग्रेसर बनला आहे असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी 'मेड इन इंडिया' आय. एन. एस. विक्रांत,  स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात बंदुकीच्या सलामीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्वदेशी तोफा आणि तेजस या लढाऊ विमानांचा देखील उल्लेख केला. इतर बाबींबरोबरच, सर्वात मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये छोट्या दुकानांमध्ये यू. पी. आय. किंवा डिजिटल देयकांच्या व्यापक वापराचा उल्लेखही त्यांनी केला.

 

"अमृतकाळाचे आगमन भारतासाठी अभिमानाने भारलेले आहे", असे सांगून, भारताला 'विकसित भारत' बनवण्यासाठी या अमृतकाळात भारताला पुढे नेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी युवकांना केले. तरुण पिढीने आपल्या स्वप्नांना नवे पंख देण्याची हीच वेळ आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.

"आता आपल्याला केवळ आव्हानांवर मात करायची नाही. तर आपल्याला स्वतःसाठीच नवनवीन आव्हाने तयार  करावी लागतील.

5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था, तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणे, उत्पादनाचे केंद्र बनणे, हवामान बदल रोखण्यासाठी काम करणे आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे यासारख्या जबाबदाऱ्या या नव्या उद्दिष्टांची यादीच त्यांनी यावेळी सांगितली. तरुण पिढीवरील आपल्या विश्वासाचे कारण स्पष्ट करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "गुलामगिरीच्या दबाव आणि प्रभावापासून पूर्णपणे मुक्त अशी तरुण पिढी या काळात देशात घडवली जात आहे. विकासही आणि तसेच वारसाही असे या पिढीतील तरुण आत्मविश्वासाने म्हणत आहेत. " संपूर्ण जग आता  योग आणि आयुर्वेदाचे मूल्य ओळखत आहे आणि भारतीय युवक योग आणि आयुर्वेदाचे ब्रँड अॅम्बेसेडर – सदिच्‍छा दूत  बनत आहेत असे ते म्हणाले.

तरुणांनी, आजी-आजोबांना त्यांच्या काळातील बाजरीची रोटी, कोडो-कुटकी, रागी-ज्वारीच्या सेवनाबद्दल विचारावे असे आवाहन करतानाच पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की,  गुलामगिरीच्या मानसिकतेमुळेच हे अन्न गरिबीशी जोडले गेले आणि भारतीय स्वयंपाकघरातून हळहळू बाहेर गेले.

सरकारने भरड धान्यांना सुपरफूड  म्हणून एक नवीन ओळख दिली आहे आणि त्याद्वारे भारतीय घरांमध्ये त्याने श्री अन्न म्हणून पुनरागमन केले आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. "आता तुम्हाला या तृणधान्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर बनायचे आहे. या अन्नधान्यामुळे तुमचे आरोग्यही सुधारेल आणि देशातील छोट्या शेतकऱ्यांनाही फायदा होईल ", असे मोदी पुढे म्हणाले.

 

पंतप्रधानांनी तरुणांना राजकारणाच्या माध्यमातून देशसेवा करण्याचे आवाहन केले. अलीकडे जागतिक नेते भारतावर विश्वास ठेवतात,  ही गोष्ट आशादायी असल्याचे ते म्हणाले.

“या आशेचे, या आकांक्षेचे कारण आहे – भारत ही लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत तरुणांचा सहभाग जेवढा जास्त असेल, तेवढे देशाचे भविष्य चांगले असेल.” त्यांच्या सहभागाने घराणेशाहीचे राजकारण निष्प्रभ ठरेल. त्यांनी मतदानाच्या माध्यमातून आपला कल नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. पहिल्यांदाच मतदान करणार्‍यांना त्यांनी सांगितले, “प्रथम मतदान करणारे आपल्या लोकशाहीला नवी ऊर्जा आणि ताकद देऊ शकतील.”

“आगामी 25 वर्षांचा अमृत काळ हा तुमच्यासाठी आपले कर्तव्य बजावण्याचा कल असेल”. पंतप्रधान म्हणाले, "जेव्हा तुम्ही कर्तव्याला सर्वोच्च स्थान द्याल, तेव्हा समाजाची प्रगती होईल आणि देशाचीही प्रगती होईल." लाल किल्ल्यावरून केलेल्या विनंतीचे स्मरण करून, पंतप्रधानांनी तरुणांना आवाहन केले की, त्यांनी स्थानिक उत्पादनांच्या वापराला  प्रोत्साहन द्यावे, केवळ ‘मेड इन इंडिया’  उत्पादनांचा वापर करावा, कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ आणि व्यसनांपासून दूर राहावे, माता, भगिनी आणि कन्या यांना उद्देशून अपमानास्पद शब्द वापरण्याविरोधात आवाज उठवावा आणि अशा दुष्कृत्यांचा अंत करावा, असे आवाहन केले. आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की, भारतातील तरुण आपली प्रत्येक जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि क्षमतेने पार पाडतील.

 

"सशक्त, समर्थ आणि सक्षम भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण प्रज्वलित केलेला दिवा चिरंतन प्रकाश बनेल आणि या शाश्वत युगात जगाला प्रकाशित करेल" पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुरागसिंह ठाकूर आणि केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार राज्यमंत्री निसीथ प्रामाणिक आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

देशाच्या विकासाच्या प्रवासात तरुणांना महत्त्वाचा भाग बनवण्याचा पंतप्रधानांचा सातत्त्याने प्रयत्न असतो. या प्रयत्नांच्या दिशेने आणखी एक पाउूल म्हणून, पंतप्रधानांनी नाशिकमध्ये 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे (एनवायएफ) उद्घाटन केले.

12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस असून, दरवर्षी 12 ते 16 जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते.

यंदाच्या महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र राज्याने केले आहे. या वर्षीच्या महोत्सवाची संकल्पना  आहे, Viksit Bharat@2047: युवा के लिए, युवा के द्वारा (युवकांसाठी, युवकांकडून).

राष्ट्रीय युवा महोत्सव असा एक मंच तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्या ठिकाणी  भारताच्या विविध प्रदेशातील तरुण त्यांच्या अनुभवांचे आदान-प्रदान करतील, ‘एक भारत श्रेष्ठ भारताच्या’ भावनेने एकसंघ राष्ट्राचा पाया मजबूत करतील. नाशिक येथील राष्ट्रीय युवा महोत्सवात देशभरातील जवळजवळ 7500 युवा प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, स्वदेशी खेळ, घोषणा आणि विषयावर आधारित सादरीकरण, युवा कलाकार शिबिर, पोस्टर मेकिंग, कथा लेखन, युवा संमेलन, खाद्य महोत्सव इ. यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian Railways clears ₹755-crore project to build third line between Champa and Korba

Media Coverage

Indian Railways clears ₹755-crore project to build third line between Champa and Korba
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister hails India-UK Comprehensive Economic and Trade Agreement as a historic milestone for bilateral relations
June 17, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, has expressed delight that the India-UK Comprehensive Economic and Trade Agreement will enter into force on 15 July 2026.

The Prime Minister said that the agreement will significantly boost bilateral trade and investment.

Shri Modi stated that the agreement will unlock numerous opportunities for Indian farmers, workers, MSMEs, startups and innovators and contribute meaningfully to the realisation of Viksit Bharat 2047.

The Prime Minister noted that both he and UK Prime Minister Keir Starmer, who are in Evian for the G7 Summit, are very happy with the significant momentum being added to India-UK economic ties.

The Prime Minister wrote on X;

“A historic milestone for India-UK relations.

Delighted to note that the India-UK Comprehensive Economic and Trade Agreement will enter into force on 15th July 2026.

This agreement will significantly boost our bilateral trade and investment.

It will also unlock numerous opportunities for Indian farmers, workers, MSMEs, startups and innovators and contribute meaningfully to the realisation of Viksit Bharat 2047.

Both PM Starmer and I, who are in Evian for the G7 Summit, are naturally very happy with the significant momentum being added to our economic ties.

@Keir_Starmer”