स्मारकातील संग्रहालय दालनांचेही पंतप्रधानांनी केले उद्घाटन
जालियनवाला बागच्या भिंतींवरील बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणांमध्ये आजही निष्पाप मुला -मुलींची स्वप्ने दिसतात - पंतप्रधान
13 एप्रिल 1919 रोजीची ती 10 मिनिटे आपल्या स्वातंत्र्यलढ्याची अजरामर कथा बनली, ज्यामुळे आपण आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू शकलो : पंतप्रधान
कोणत्याही देशाने आपल्या भूतकाळातील भयावहतेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.त्यामुळे भारताने दरवर्षी 14 ऑगस्ट हा 'फाळणी वेदना स्मरण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला : पंतप्रधान
स्वातंत्र्यासाठी आपल्या आदिवासी समाजाने मोठे योगदान आणि सर्वोच्च बलिदान दिले मात्र त्यांच्या योगदानाला इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आवश्यक ते स्थान मिळाले नाही : पंतप्रधान
कोरोना असो किंवा अफगाणिस्तान भारतीयांच्या पाठीशी भारत उभा आहे : पंतप्रधान
अमृत महोत्सवादरम्यान, प्रत्येक गावात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण केले जात आहे : पंतप्रधान
स्वातंत्र्यसंग्रामाच्या महत्त्वाच्या टप्प्यांशी आणि राष्ट्रीय नायकांशी संबंधित ठिकाणे जतन करण्यासाठी प्

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे नूतनीकरण केलेलया जालियनवाला बाग स्मारक संकुलाचे  राष्ट्रार्पण केले. या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी स्मारकातील संग्रहालय दालनांचे उद्घाटनही केले. या कार्यक्रमात संकुलाच्या विकासासाठी सरकारने हाती घेतलेले अनेक विकास उपक्रम प्रदर्शित करण्यात आले. पंतप्रधानांनी पंजाबच्या शूर भूमीला आणि जालियनवाला बागच्या पवित्र मातीला वंदन केले. ज्यांच्यात पेटलेले स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग विझवण्यासाठी अभूतपूर्व अमानुषतेला सामोरे गेलेल्या भारतमातेच्या मुलांनाही त्यांनी सलाम केला.

या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, जालियनवाला बागच्या भिंतींवरील बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणांमध्ये आजही निष्पाप मुला -मुलींची, बंधू आणि भगिनींची स्वप्ने दिसत आहेत.शहीदी विहिरीने असंख्य माता भगिनींचे प्रेम आणि जीवन हिसकावून घेतले त्यांचे ही आपण आज स्मरण करत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी नमूद केले की, जालियनवाला बाग हे असे स्थान आहे ज्याने सरदार उधम सिंग, सरदार भगतसिंग यांसारख्या असंख्य क्रांतिकारकांना आणि लढवय्यांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती द्यायला प्रेरित केले.ते पुढे म्हणाले की, 13 एप्रिल 1919 ची ती 10 मिनिटे आपल्या स्वातंत्र्य संग्रामाची अजरामर कथा बनली आहे , ज्यामुळे आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू शकत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. अशा प्रसंगी, स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात  जालियनवाला बाग स्मारकाच्या आधुनिक स्वरूपाचे राष्ट्रार्पण ,आपल्या सर्वांसाठी मोठी प्रेरणादायी  संधी आहे, असे ते म्हणाले.

जालियनवाला बाग हत्याकांडापूर्वी या ठिकाणी पवित्र वैशाखीचे मेळे भरत असत, याचे पंतप्रधानांनी स्मरण केले. 'सरबत दा भला' या  भावनेने गुरु गोविंद सिंग जी खालसा पंथाची स्थापनाही याच दिवशी झाली.आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी, हे नूतनीकरण केलेले जालियनवाला बाग स्मारक नवीन पिढीला या पवित्र स्थळाच्या इतिहासाची आठवण करून देईल आणि त्याच्या भूतकाळातून बरेच काही शिकण्याची प्रेरणा देईल.

पंतप्रधानांनी नमूद केले की, आपल्याला धडा देणाऱ्या  आणि आपल्याला पुढे जाण्याची दिशा दाखविणाऱ्या इतिहासाचे जतन करणे ही प्रत्येक राष्ट्राची जबाबदारी आहे. ते पुढे म्हणाले की, कोणत्याही देशाने आपल्या भूतकाळाच्या अशा भयावह  गोष्टींकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.  म्हणूनच, भारताने दरवर्षी 14 ऑगस्ट हा 'फाळणी वेदना  स्मरण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. भारताने फाळणीच्यावेळी जालियनवाला बाग सारखी भयावह  घटना पाहिली.ते म्हणाले की, पंजाबचे लोक फाळणीचे सर्वात मोठे बळी आहेत.ते पुढे म्हणाले की, भारताच्या कानाकोपऱ्यात आणि विशेषत: पंजाबमधील कुटुंबांमध्ये फाळणीच्या वेळी जे घडले त्याची वेदना आपल्याला  अजूनही जाणवते.

पंतप्रधान म्हणाले की, जर भारतीय जगात कुठेही अडचणीत असतील, तर भारत त्याच्या सर्व शक्तीने त्यांना मदत करण्यासाठी पाठीशी उभा आहे.कोरोनाचा काळ असो किंवा अफगाणिस्तानचे संकट, जगाने ते सातत्याने अनुभवले आहे.ऑपरेशन देवी शक्ती अंतर्गत अफगाणिस्तानातून शेकडो मित्रांना भारतात आणले जात आहे.पंतप्रधान म्हणाले की 'गुरु कृपा' मुळे सरकार लोकांसोबतच पवित्र गुरु ग्रंथ साहिबचे 'स्वरूप' भारतात आणू शकले. अशा परिस्थितीत पिडीत  लोकांसाठी धोरणे तयार करण्यात गुरुंची शिकवण मदत करते.

पंतप्रधान  म्हणाले के, सध्याची जागतिक परिस्थिती ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ चे महत्त्व तसेच आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वासाची गरज अधोरेखित करते.अशा  घटनांमुळे देशाचा पाया मजबूत होण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की आज अमृत महोत्सवात  प्रत्येक गावात स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण केले जात आहे आणि त्यांचा सन्मान केला जात आहे.स्वातंत्र्य संग्रामाच्या महत्त्वाच्या टप्प्यांशी आणि राष्ट्रीय नायकांशी संबंधित ठिकाणांचे जतन करून त्यांना अग्रस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असे त्यांनी सांगितले.. जालियनवाला बाग प्रमाणे, देशभरातल्या  राष्ट्रीय स्मारकांचे नूतनीकरण केले जात आहे उदा. अलाहाबाद संग्रहालयातील इंटरएक्टिव गॅलरी, कोलकाता मधील बिप्लोबी भारत गॅलरी इत्यादीचा त्यांनी उल्लेख केला. अंदमानमध्ये जिथे नेताजींनी प्रथमच राष्ट्रध्वज फडकवला.त्या जागेला नवी ओळख देऊन आझाद हिंद फौज (आयएनए) चे योगदान सर्वांसमोर आणले आहे. अंदमानमधील बेटांची नावे स्वातंत्र्यलढ्याला समर्पित केली आहेत.

पंतप्रधान म्हणाले की आपल्या आदिवासी समुदायाने स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान आणि बलिदान दिले. मात्र त्यांच्या योगदानाला इतिहासाच्या पुस्तकांमध्ये जे   स्थान मिळायला हवे होते ते मिळाले नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. देशातील 9 राज्यांमध्ये आदिवासी स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचा संघर्ष दाखवणाऱ्या संग्रहालयांचे  काम सध्या सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या सैनिकांचे  राष्ट्रीय स्मारक असावे अशी देशाची इच्छा होती. राष्ट्रीय युद्ध स्मारक आजच्या युवकांमध्ये  देशाचे रक्षण करण्याची आणि आपले सर्वस्व अर्पण करण्याची भावना निर्माण करत आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

पंजाबची शौर्याची  परंपरा अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, गुरूंच्या मार्गावर चालत पंजाबचे सुपुत्र  आणि मुली देशाला भेडसावणाऱ्या  सर्व धोक्यांविरोधात निर्भयपणे उभे आहेत.  हा समृद्ध वारसा जपण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सुदैवाने गुरू नानक देवजींचा 550 वा प्रकाशोत्सव, गुरु गोबिंद सिंहजींचा 350 वा प्रकाशोत्सव, गुरु तेग बहादूरजींचा 400 वा प्रकाशोत्सव गेल्या सात वर्षांत झाला आणि केंद्र सरकारने यानिमित्त गुरुंच्या शिकवणींचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. हा समृद्ध वारसा युवकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला, आणि स्वदेश दर्शन योजने अंतर्गत सुलतानपूर लोधीचे  हेरिटेज शहरात रूपांतर , करतारपूर कॉरिडॉर, विविध देशांशी पंजाबची हवाई सेवा , गुरू स्थानांशी संपर्क व्यवस्था  आणि आनंदपूर साहिब - फतेहगढ साहिब - चमकौर साहिब,  फिरोजपूर - अमृतसर - खतकर कलान  - कलानौर - पटियालाचा विकास हे विविध उपक्रम त्यांनी नमूद केले. 

आपल्या स्वातंत्र्याचा हा अमृत कालखंड  संपूर्ण देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या अमृत काळात  त्यांनी वारसा आणि विकास या दोन्ही गोष्टी पुढे नेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले पंजाबच्या भूमीने आपल्याला नेहमीच प्रेरणा दिली आहे आणि आज गरज  आहे की पंजाबने  प्रत्येक स्तरावर आणि प्रत्येक दिशेने प्रगती करावी.  यासाठी त्यांनी सर्वांना 'सबका साथ, सबका विकास' या भावनेने एकत्र काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी जालियनवाला बागच्या या भूमीला देशाला आपली उद्दिष्टे लवकरच  पूर्ण करण्याच्या  संकल्पांसाठी सतत ऊर्जा देत राहो अशा शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय संस्कृती मंत्री, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज  मंत्री, सांस्कृतिक राज्यमंत्री, पंजाबचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, हरियाणा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री; पंजाबचे  लोकसभा आणि राज्यसभेतले खासदार, जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक  ट्रस्टचे सदस्य,आणि  इतर मान्यवर यावेळी  उपस्थित होते.

अधिक तपशीलांसाठी येथे पार्श्वभूमी पहा

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Rs 6,000 Crore Earned, 12.33 Crore Sq Ft Freed: Inside Government's Big Clean-Up

Media Coverage

Rs 6,000 Crore Earned, 12.33 Crore Sq Ft Freed: Inside Government's Big Clean-Up
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 ऑगस्ट 2026
August 24, 2026

Beyond Announcements: Real Milestones Proving India’s Rise Across Defence, Tech & Economy Under the Leadership of PM Modi