On October 3, 2014, on the auspicious day of Vijay Dashami, we started the journey of 'Mann Ki Baat': PM Modi
‘Mann Ki Baat’ has become a festival of celebrating the goodness and positivity of the fellow citizens: PM Modi
The issues which came up during 'Mann Ki Baat' became mass movements: PM Modi
For me, 'Mann Ki Baat' has been about worshiping the qualities of the countrymen: PM Modi
'Mann Ki Baat' gave a platform to me to connect with the citizens of our country: PM Modi
Thank the colleagues of All India Radio who record ‘Mann Ki Baat’ with great patience. I am also thankful to the translators, who translate 'Mann Ki Baat' into different regional languages: PM Modi
Grateful to Doordarshan, MyGov, electronic media and of course, the people of India, for the success of ‘Mann Ki Baat’: PM Modi

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज मन की बातचा शंभरावा भाग आहे. मला आपल्या सर्वांची हजारो पत्रं मिळाली आहेत, लाखो संदेश आले आहेत आणि मी असा प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त पत्रे वाचेन, पाहीन आणि संदेशांना जरा समजण्याचा प्रयत्न करावा. आपली पत्रं वाचताना मी कित्येकदा तर अतिशय भावनावश झालो, भावनांनी ह्रदय उचंबळून आलं आणि भावनामध्ये वाहूनही गेलो आणि स्वतःला पुन्हा सावरलं. आपण माझं मन की बातच्या शंभराव्या भागासाठी अभिनंदन केलं आहे. परंतु मी खरोखर सांगतो की वास्तविक पहाता अभिनंदनास पात्र तर आपण सर्व मन की बातचे श्रोते आहात, आमचे देशवासी आहेत. मन की बात कोटी कोटी भारतीयांची मन की बात आहे त्यांच्या भावनांचं प्रकटीकरण आहे.

मित्रांनो, ३ ऑक्टोबर २०१४ या दिवशी विजयादशमीचं ते पर्व होतं आणि आम्ही सर्वानी मिळून विजया दशमीच्या दिवशीच मन की बात चा प्रवास सुरू केला  होता. विजया दशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय  साजरा करण्याचं पर्व. मन की बात सुद्धा देशवासियांच्या भलेपणाचं, सकारात्मकतेचं एक आगळंवेगळं  पर्व बनली आहे. एक असं पर्व की जे प्रत्येक महिन्याला येतं, ज्याची प्रतीक्षा सर्वांनाच असते. यात आम्ही सकारात्मकता साजरी करतो. आम्ही यात लोक सहभागालाही साजरं करतो. अनेक वेळा मन की बात ने इतके महिने आणि इतके वर्षांचा प्रवास केला, यावर विश्वासच बसत नाही. प्रत्येक भाग अगदी खास होता. प्रत्येक वेळेस, नवीन उदाहरणांचं नाविन्य, प्रत्येक वेळेस देशवासियांच्या यशस्वीतेचा विस्तार. मन की बात कार्यक्रमाला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक जोडले गेले, प्रत्येक वयोगट आणि प्रत्येक वर्गातील लोक जोडले गेले. बेटी बचाओ-बेटी पढाओची गोष्ट असो, स्वच्छ भारत अभियानाची गोष्ट असो, खादी प्रती  प्रेम असो की निसर्गाबद्दल चर्चा असो, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असो की मग अमृत सरोवर याची चर्चा, मन की बात ज्या विषयाशी जोडला गेला, तो लोक आंदोलनाचा विषय झाला आणि आपण लोकांनी त्याला तसा  बनवला. जेव्हा मी तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी मन की बात सामायिक केली होती, तेव्हा याची चर्चा संपूर्ण जगभरात झाली.

मित्रांनो, मन की बात तर माझ्यासाठी दुसऱ्यांच्या गुणांची पूजा करण्यासारखीच आहे. माझे एक मार्गदर्शक होते-लक्ष्मणराव जी इनामदार. आम्ही त्यांना वकील साहेब म्हणत असू. ते नेहमी असं म्हणत की, कुणीही दुसऱ्यांच्या गुणांची पूजा केली पाहिजे. समोर कुणीही असो,  आपला साथीदार असो की आपला विरोधी गटातील असो, त्याचे चांगले गुण जाणण्याची, त्यांच्यापासून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या या शिकवणीने नेहमीच मला प्रेरणा दिली आहे. मन की  बात दुसऱ्यांच्या गुणांपासून शिकण्याचं एक फार मोठं माध्यम बनलं आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, या कार्यक्रमानं मला कधीही आपल्यापासून दूर जाऊ दिलं नाही. मला आठवतं की, जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा स्वाभाविकपणेच सामान्य जनांशी भेटणं आणि त्यांच्याशी चर्चा करणं होतच होतं. मुख्यमंत्री पदाचं कामकाज आणि कार्यकाल  असा असतो की लोकांना भेटण्याची खूप संधी मिळत असते. पण २०१४ मध्ये जेव्हा दिल्लीत आलो, तेव्हा मला असं आढळलं की येथील जीवन तर खूपच वेगळं आहे. कामाचं स्वरूप वेगळं आहे, जबाबदारी वेगळी आहे आणि स्थिती, परिस्थितीची बंधने, सुरक्षेचा बंदोबस्त, वेळेची मर्यादा सारं काही वेगळं आहे. सुरूवातीच्या दिवसात, काही वेगळेंपण जाणवत होतं. काहीतरी रितेपण वाटत होतं. पन्नास वर्षांपूर्वी मी यासाठी माझें घर सोडलं नव्हतं की आपल्याच देशवासियांशी संपर्क अवघड व्हावा. देशवासी माझ्यासाठी सर्वतोपरी आहेत, मी त्यांच्यापासून अलग होऊन मी जगूच शकत नाही. मन की बात ने मला या आव्हानावर  उपाय दिला , सामान्य माणसांशी जोडलं जाण्याचा मार्ग दिला. पदभार आणि शिष्टाचार हा  शासकीय व्यवस्थेपर्यंतच मर्यादित राहिला आणि लोकभावना, कोटी कोटी भारतीयांसोबत माझ्या भावविश्वाचं अतूट भाग बनून गेला. प्रत्येक महिन्याला मी देशातल्या लोकांची हजारो संदेश वाचतो, प्रत्येक महिन्याला देशवासियांच्या एकाहून एक अद्भुत स्वरूपाचं दर्शन घडतं. मी देशवासियांच्या तपश्चर्या आणि त्यागाची परिसीमा पहातो, ती मला जाणवते. मला असं वाटत नाही की मी आपल्यापासून थोडाही दूर अंतरावर आहे. माझ्यासाठी मन की बात एक कार्यक्रम नाही, तर माझ्यासाठी एक श्रद्धा, पूजा आणि व्रत आहे. जसे लोक ईश्वराची पूजा करण्यासाठी जातात तेव्हा प्रसादाची थाळी आणतात. माझ्यासाठी मन की बात कार्यक्रम ईश्वररूपी जनता जनार्दनाच्या चरणांच्या प्रसादाची थाळीसारखा आहे. मन  की बात माझ्या मनाचा अध्यात्मिक प्रवास बनला आहे.

मन की बात स्वपासून ते समष्टीपर्यंतचा प्रवास आहे.

मन की बात अहंपासू ते वयम पर्यंतचा प्रवास आहे.

हा तर मी नाही तर तू ही याची संस्कार साधना आहे.

आपण कल्पना करा, एखादा माझा देशवासी ४०-४० वर्षांपासून निर्जन डोंगरी भाग आणि नापीक जमिनीवर वृक्ष लावतो आहे, कितीही लोक ३०-३० वर्षांपासून जल संरक्षणासाठी विहीरी आणि तलाव तयार करत आहेत आणि त्यांची स्वच्छता करत आहेत. कुणी २५ ते ३० वर्षांपासून निर्धन परिवारांतील मुलांना शिकवत आहे तर कुणी गरीबांच्या इलाजासाठी मदत करतो आहे. कित्येकदा मन की बात मध्ये याचा उल्लेख करताना मी भावविवश झालो आहे. किती वेळा याचं पुन्हा ध्वनीमुद्रण करावं लागलं आहे. आज मागचे कितीतरी भाग, पुन्हा डोळ्यासमोर येत आहेत. देशवासियांच्या या प्रयत्नांमुळे मला सातत्यानं स्वतःला कार्यरत रहाण्याची प्रेरणा दिली आहे.

मित्रांनो, मन की बात कार्यक्रमात मी ज्या लोकांचा उल्लेख करतो, ते सर्व आमचे हिरो आहेते, ज्यांनी या कार्यक्रमाला जिवंत बनवलं आहे. आज जेव्हा आम्ही १०० व्या भागाच्या मुक्कामापर्यंत पोहचलो आहोत, ते माझी ही इच्छा आहे की पुन्हा एकदा आम्ही त्या सर्व नायकांकडे जाऊन त्यांच्या प्रवासाच्या बाबत जाणून घ्यावं. आज आम्ही काही मित्रांशी पुन्हा चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्याशी आता हरियाणातील सुनील जगलाल भाईजी जोडले जात आहेत. सुनील जगलानजी यांचा माझ्या मनावर इतका प्रभाव यासाठी पडला की  हरियाणातील लिंगगुणोत्तराच्या व्यस्त प्रमाणावर जोरदार चर्चा होत असते आणि मी सुद्धा बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान हरियाणातूनच सुरू केलं होतं. याच दरम्यान, जेव्हा सुनील जी यांच्या सेल्फी विथ डॉटर मोहीमेकडे माझं लक्ष गेलं तेव्हा मला खूप चांगलं वाटलं. मी त्यांच्यापासून शिकलो आणि याचा मन की बातमध्ये समावेश केला. पहाता पहाता, सेल्फी विथ डॉटर एका जागतिक मोहीमेत परिवर्तित झाली. आणि यात मुद्दा सेल्फीचा नव्हता तर यात कन्येला प्रमुख स्थान दिलं होतं. जीवनात कन्येला किती मोठं स्थान आहे, हे या अभियानातून समोर आलं. अशाच अनेक् प्रयत्नांचा परिणाम असा झाला की आज हरियाणातील लिग गुणोत्तर खूपच सुधारलं आहे. या आपण आता सुनील जी यांच्याशी जरा गप्पा मारू या.  

प्रधानमंत्री जी- नमस्कार सुनीलजी.

सुनीलः नमस्कार सर. आपला आवाज ऐकूनच माझा आनंद प्रचंड वाढला आहे सर.

प्रधानमंत्री जी- सुनील जी, सेल्फी विथ डॉटर प्रत्येकाला आठवणीत आहे. आज त्यावर पुन्हा चर्चा होत आहे तर आपल्याला कसं वाटत आहे?

सुनीलः प्रधानमंत्री जी, हे आपण जो हरियाणातील पानिपतच्या चौथं  युद्ध मुलींच्या चेहऱ्यांवर स्मितहासय आणण्यासाठी सुरू  केलं होतं, आणि ज्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली पूर्ण देशानं जितके प्रयत्न केले आहेत, तर खरोखरच माझ्यासाठी आणि प्रत्येक कन्या प्रेमींसाठी ही खूप मोठी बाब  आहे.

प्रधानमंत्री जी- सुनील जी, आता आपली कन्या कशी आहे, आजकाल ती काय करते?

सुनीलः माझ्या दोन कन्या आहेत नंदनी आणि याचिका. त्यापैकी एक सातवी इयत्तेत शिकत आहे तर दुसरी चौथ्या इयत्तेत शिकते. आपली ती मोठी प्रशंसक आहे आणि आणि आपल्यासाठी तिने वास्तवात धन्यवाद प्रधानमंत्रीजी म्हणून तिनेच आपल्या वर्गसहकारी आहेत, त्यांच्याकडून तिने पत्रंही लिहीली  होती तिने.

प्रधानमंत्री जी- वाहवा. आपल्या कन्येला माझ्याकडून आणि मन की बातच्या श्रोत्यांकडून खूप सारे आशीर्वाद द्या.

सुनील-खूप धन्यवादजी, आपल्यामुळेच देशाच्या कन्यांच्या चेहऱ्यांवर सातत्याने स्मितहास्य वाढत चाललं आहे.

प्रधानमंत्री जी- खूप खूप धन्यवाद, सुनील जी.

सुनील- जी धन्यवाद.

मित्रांनो,

मला या गोष्टीचा इतका आनंद आहे की मन की बातमधून आम्ही देशातील स्त्री शक्तीच्या शेकडो प्रेरणादायक कहाण्यांचा उल्लेख केला आहे. मग त्यात आमचं  सैन्य असो की मग क्रीडा जगत असो. जेव्हा मी महिलांच्या यशाबद्दल उल्लेख केला आहे, त्यांची खूप प्रशंसा केली गेली आहे. जेव्हा आम्ही छत्तीसगढच्या देऊर गावातील महिलांची चर्चा केली  होती. तेव्हा या महिला स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून गावातील चौक, रस्ते आणि मंदिरांमध्ये स्वच्छतेसाठी अभियान चालवत असतात. अशाच प्रकारे,  तामिळनाडूतील त्या आदिवासी महिला ज्यांनी मातीचे हजारो पर्यावरणस्नेही कप निर्यात केले आणि त्यांच्यापासूनही देशानं खूप प्रेरणा घेतली. तामिळनाडूतील  २० हजार महिलांनी एकत्र येऊन वेल्लोर इथं नाग नदीला पुनरूज्जीवित केलं होतं. अशा कितीतरी अभियानांना आमच्या स्त्री शक्तीनं प्रेरणा दिली आहे आणि मन की बात कार्यक्रम त्यांच्या प्रयत्नांना समोर आणण्याचा मंच बनला आहे.

मित्रांनो, आता आमच्याबरोबर फोन लाईनवर आणखी एक सद्गृस्थ आले आहेत. त्यांचं नाव आहे मंजूर अहमद. मन की बात कार्यक्रमात जम्मू काश्मीरच्या पेन्सील पाट्या(पेन्सील स्लेट्स) बाबत माहिती देताना तेव्हा मंजूर अहमद जी यांचा उल्लेख झाला होता.

प्रधानमंत्री जी-मंजूर जी, कसे आहात आपण?

मंजूर जी- धन्यवाद सर, मजेत आहोत सर.

प्रधानमंत्री जी- मन की बातच्या १०० व्या भागात आपल्याशी चर्चा करताना खूप छान वाटत आहे.

मंजूर जी – धन्यवाद, सर |

प्रधानमंत्री जी- बरं, ते पेन्सील स्लेट्सचं काम कसं चालू आहे?

मंजूर जी – ते काम खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. जेव्हापासून सर आपण आमची ही गोष्ट मन की  बात मध्ये सांगितली, तेव्हापासून खूप कामही वाढलं आहे. इतरांना रोजगारही खूप वाढला  आहे या कामातून.

प्रधानमंत्री जी- किती जणांना रोजगार मिळत असेल?

मंजूर जी –आता माझ्याकडे २०० हून अधिक लोक आहेत.

प्रधानमंत्री जी- अरे वा, मला आनंद झाला हे ऐकून.

मंजूर जी – जी सर. आता एक दोन महिन्यातच याचा विस्तार करणार असून आणखी २०० लोकांना रोजगार मिळू लागेल सर.

प्रधानमंत्री जी- वाहवा. हे पहा मंजूर जी...

मंजूर जी- जी सर...

प्रधानमंत्री जी- मला बरोबर आठवतं  की त्या दिवशी तुम्ही मला असं सांगितलं होतं की हे असं काम आहे की याची काही प्रसिद्घी नाही की स्वतःची काही ओळख नाही. आणि आपल्याला याचं दुःखंही होतं आणि याचमुळे आपण आपल्याला खूप अवघड परिस्थिती आहे, असं आपण म्हणत होता. आता तर ही ओळख बनली आहे आणि २००  हून अधिक लोकांना रोजगार पुरवत आहात.

मंजूर जी- जी सर... जी सर.

प्रधानमंत्री जी- आपण याचा विस्तार करत आहात आणि  २०० लोकांना रोजगार देत आहात, ही तर खूप आनंदाची बातमी सांगितली आपण.

मंजूर जी- आणि सर, येथे जे शेतकरी आहेत, त्यांना याचा खूप मोठा लाभ मिळत आहे तेव्हापासून. २००० रूपयांना झाड विकत होते कघीकधी आता त्या झाडाची किमत ५००० रूपयांपर्यंत वर पोहचली आहे. मागणी इतकी वाढली आहे की तेव्हापासून आणि माझी ओळख बनली आहे. खूप मागण्या आपल्याकडे आल्या आहेत सर तेव्हापासून. मी आता एकदोन महिन्यात आणखी विस्तार करून दोन अडीचशे गावांमध्ये जितकी मुलं मुली आहेत, त्यांना यात सामावून घेता येईल सर आणि त्यांची उपजीविका यातून चालू शकते सर.

प्रधानमंत्री जी- पहा मंजूरजी, व्होकल फॉर लोकलची किती जबरदस्त शक्ती आहे हे  आपण प्रत्यक्षात दाखवून दिलं आहे.

मंजूर जी- जी सर|

प्रधानमंत्री जी- माझ्याकडून आपल्याला आणि गावातील सर्व शेतकरी आणि आपल्यासमवेत काम करत असलेल्या सर्व साधीदारांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद भैया.

मंजूर जी- धन्यवाद सर |   

मित्रांनो, आमच्या देशात कितीतरी असे प्रतिभाशाली लोक आहेत, की  जे आपल्या मेहनतीच्या जोरावर शिखऱस्थानावर पोहचले आहेत. मला आठवतं, विशाखापट्टणमचे वेंकट मुरली प्रसाद जी यांनी आत्मनिर्भर भारत विषयी एक तक्ता तयार केला होता. त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त भारतीय उत्पादनांचा उपयोग ते करतील. जेव्हा बेतिया चे प्रमोद जी यांनी एलईडी बल्ब बनवण्याचं छोटासा कारखाना सुरू केला, तेव्हा गढमुक्तेश्वर च्या संतोष जी यांनी चटया बनवण्याचं काम केलं आणि मन की बात कार्यक्रमच त्या सर्व उत्पादनांना सर्वाच्या  समोर आणण्याचं एक साधन बनलां होता. आम्ही मेक इन इडियाच्या अनेक उदाहरणांपासून ते अंतराळ स्टार्ट अप्स पर्यंतची चर्चा मन की बात कार्यक्रमात केली आहे.

मित्रांनो, आपल्याला आठवत असेल, मी काही भागांपूर्वी मणिपूरच्या भगिनी विजयशांती देवी यांचाही उल्लेख केला होता. विजयशांती देवी कमळाच्या तंतूंपासून कपडे बनवतात. मन की बात कार्यक्रमात या आगळ्यावेगळ्या पर्यावरणस्नेही कल्पनेची चर्चा झाली तेव्हा त्यांचं काम आणखीच लोकप्रिय झालं. आज विजयशांतीजी आमच्याबरोबर फोनवर आहेत.

प्रधानमंत्री जी- नमस्ते विजयशांतीजी, कशा आहात आपण?

विजयशांती जीः सर, मी मजेत आहे.

प्रधानमंत्री जी- आणि आपलं काम कसं चाललं आहे?

विजयशांती जीः माझ्या समवेत ३० महिलांसोबत अजूनही काम करत आहोत.

प्रधानमंत्री जी-  इतक्या थोड्या कालावधी आपण ३० महिलांपर्यंत पोहचल्या आहात.

विजयशांती जीः होय सर. यावर्षी आणखी माझ्या भागातील शंभर महिलांना घेऊन विस्तार करणार आहे.

प्रधानमंत्री जी-  तर आपलं लक्ष्य. १०० महिलांचं आहे.

विजयशांती जेः होय सर. १०० महिला.

प्रधानमंत्री जी-  आणि आता लोकांना कमळाच्या खोडापासून बनवल्या जाणाऱ्ये तंतूचा चांगल्यापैकी परिचय झाला आहे.

विजयशांती जी- होय सर. प्रत्येकाला मन की बात कार्यक्रमापासूनच संपूर्ण भारतात याची माहिती झाली आहे.

प्रधानमंत्री जी-   आता ते खूप लोकप्रियही झालं आहे.

विजयशांती जी- होय सर. पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमापासून प्रत्येकाला कमलतंतूची (लोटस फायबर) माहिती झाली आहे.

प्रधानमंत्री जी-    आता तुम्हाला बाजारपेठही मिळाली आहे?

विजयशांती जी- होय. मला अमेरिकेतूनही बाजारपेठ मिळाली आहे  आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात खरेदी करायची आहे. मी यावर्षापासून अमेरिकेलाही पाठवण्याचा विचार करते आहे.

प्रधानमंत्री जी-    म्हणजे आता तुम्ही निर्यातदार झाला आहात.

विजयशांती जी- होय सर, मी यावर्षीपासून आमच्या कमलतंतूचे उत्पादन निर्यात करणार आहे.

प्रधानमंत्री जी-    म्हणजे, जेव्हा मी म्हणतो की व्होकल फॉर लोकल आणि आता लोकल फॉर ग्लोबल.

विजयशांती जी- होय सर. मला माझं  उत्पादन सर्व जगभरात पोहचलेलं हवं आहे.

प्रधानमंत्री जी-     अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा.

विजयशांती जी- धन्यवाद सर.

प्रधानमंत्री जी-  धन्यवाद, विजयशांती

विजयशांती जी- धन्यवाद सर.

मित्रांनो, मन की बातची अजून एक विशेषतः आहे. ‘मन की बात’ च्या माध्यमातून अनेक लोकचळवळी जन्माला आल्या तसेच त्यांना गती देखील प्राप्त झाली. उदाहरणार्थ आपली खेळणी, आपल्या खेळण्यांच्या उद्योगाला पुनरुस्थापित करण्याचे मिशन ‘मन की बात’ पासूनच तर सुरु झाले होते. भारतीय प्रजातीचे श्वान, आपल्या देशी श्वानांबद्द्ल जागरुकता निर्माण करण्याच्या कामाची सुरुवात देखील ‘मन की बात’ पासूनच झाली होती. आपण आणखी एक मोहीम सुरु केली होती, गरीब लहान दुकानदारांसोबत घासाघीस करणार नाही, भांडण करणार नाही. जेव्हा ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरु झाली, तेव्हा देखील देशवासियांना या मोहिमेशी जोडण्यात ‘मन की बात’ ने महत्वाची भूमिका पार पाडली.  असे प्रत्येक उदाहरण समाजात परिवर्तनाचे कारण बनले आहे. प्रदीप सांगवान जी यांनीही समाजाला प्रेरणा देण्याचा विडा उचलाल आहे. 'मन की बात' मध्ये, आम्ही प्रदीप सांगवान जी यांच्या 'हिलिंग हिमालय' मोहिमेची चर्चा केली होती. ते आपल्यासोबत फोन लाइनवर उपलब्ध आहेत.

मोदी जी – प्रदीप जी नमस्कार !

प्रदीप जी – सर जय हिंद |

मोदी जी – जय हिंद, जय हिंद ! तुम्ही कसे आहात?

प्रदीप जी- सर खूपच छान. आणि तुमचा आवाज ऐकून तर अजूनच छान.

मोदी जी- तुम्ही हिमालयाला स्वच्छ करण्याचा विचार केला.

प्रदीप जी – हो सर.

मोदी जी- मोहीम देखील राबवली. सध्या तुमची मोहीम कशी सुरु आहे?

प्रदीप जी- सर खूपच छान सुरु आहे. असे समजा की, 2020 पासून आम्हाला जे काम करायला पाच वर्ष लागायची तेच काम आता एका वर्षात पूर्ण होत आहे.

मोदी जी – अरे वाह !

प्रदीप जी- हो हो सर. सुरुवातीला मी खूप चिंतीत होतो, मी खूप घाबरलो होतो की मी आयुष्यभर हे काम करू शकेन की नाही. परंतु थोडा पाठिंबा मिळाला आणि 2020 पर्यंत आम्ही प्रामाणिकपणे खूपच संघर्ष करत होतो. खूपच कमी लोकं सहभागी होत होते, असे बरेच लोकं होते जे पाठिंबा देत नव्हते. आमच्या मोहिमेकडे तेवढे लक्षही देत नव्हते. पण 2020 नंतर जेव्हा 'मन की बात' मध्ये याचा उल्लेख झाला तेव्हा अनेक गोष्टी बदलल्या.म्हणजे, पूर्वी आम्ही एका वर्षात 6-7 स्वच्छता मोहीम राबवायचो, आता आम्ही 10 स्वच्छता मोहीम राबवतो. आजच्या तारखेत वेगवेगळ्या ठिकाणांहून आम्ही दररोज पाच टन कचरा गोळा करतो. 
मोदी जी- अरे वाह !

प्रदीप जी - सर, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर की एक वेळ अशी आली होती की मी जवळजवळ हर मानली होती, पण 'मन की बात' मध्‍ये उल्लेख झाल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप बदल झाले आणि गोष्टींना वेग आला. ज्याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता.मी तुमचा खरोखर आभारी आहे. मला माहित नाही की तुम्ही आमच्यासारखे लोक कसे शोधता. एवढ्या दुर्गम भागात कोण काम करत आहे, आम्ही हिमालयात जाऊन आम्ही काम करत आहोत. आम्ही या उंचीवर काम करत आहोत.त्या तिथे तुम्ही आम्हांला शोधलं. आमचे कार्य जगासमोर आणले. मी माझ्या देशाच्या पंतप्रधानांसोबत बोलत आहे हा क्षण मझ्यासाठी तेव्हाही आणि आज देखील खूपच भावनिक क्षण आहे.  माझ्यासाठी यापेक्षा भाग्याचे दुसरे काहीही असू शकत नाही.
 
मोदी जी – प्रदीप जी ! तुम्ही खर्‍या अर्थाने हिमालयाच्या शिखरांवर साधना करत आहात आणि मला खात्री आहे की लोकांना आता  तुमचे नाव ऐकूनच तुम्ही पर्वतांच्या स्वच्छता मोहिमेत कसे सहभागी होता हे आठवेल. 

प्रदीप जी – हो सर.

मोदी जी – आणि तुम्ही सांगितलेच आहे की आता तुमची खूप मोठी टीम तयार होत आहे आणि तुम्ही दररोज एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करत आहात.

प्रदीप जी – हो सर.

मोदी जी - आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुमच्या प्रयत्नांमुळे आणि त्याबद्दलच्या चर्चेमुळे अनेक गिर्यारोहकांनी आता स्वच्छतेशी संबंधित फोटो पोस्ट करायला सुरुवात केली आहे.

प्रदीप जी – हो सर! खूपच !

मोदी जी- ही चांगली गोष्ट आहे, तुमच्या सारख्या मित्रांच्या प्रयत्नामुळे कचरा ही सुद्धा एक संपत्ती आहे, ही बाब आता लोकांच्या मनात रुजत आहे आणि आता पर्यावरणाचे देखील संरक्षण होत आहे आणि आपला अभिमान असणाऱ्या हिमालयाचे संवर्धन करण्यात सामान्य लोकं देखील सहभागी होत आहेत. प्रदीप जी मला खूप चांगले वाटले. खूप खूप धन्यवाद.

प्रदीप जी – धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद जय हिंद.

मित्रांनो, देशात पर्यटनाचा विकास वेगाने होत आहे. नद्या, पर्वत, तलाव हे आपले नैसर्गिक स्रोत असोत किंवा मग आपली तीर्थस्थाने असोत त्यांना स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. पर्यटन उद्योगाला याची खूप मदत होईल. पर्यटनात आम्ही स्वच्छतेसोबतच अतुल्य भारत चळवळीविषयी देखील अनेकदा चर्चा केली आहे. या चळवळीमुळे लोकांना पहिल्यांदाच त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या  अशा अनेक ठिकाणांची माहिती झाली. मी नेहमी म्हणतो की परदेशात पर्यटनाला जाण्यापूर्वी आपण आपल्या देशातील किमान 15 पर्यटन स्थळांना भेट दिली पाहिजे आणि ही स्थळे तुम्ही राहता त्या  राज्यातील नसावीत, दुसऱ्या राज्यातील असली पाहिजे. त्याचप्रमाणे आम्ही स्वच्छ सियाचीन, सिंगल यूज प्लास्टिक आणि ई-कचरा यासारख्या गंभीर विषयांवर आम्ही सतत चर्चा केली आहे. आज ज्या पर्यावरणाच्या प्रश्नावर संपूर्ण जग चिंतेत असताना तो सोडवण्यासाठी 'मन की बात'चा हा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे.
 
मित्रांनो, यावेळी मला युनेस्को चे महासंचालक औद्रे ऑजुले यांनी 'मन की बात'  विषयी एक विशेष संदेश पाठवला आहे. 100 भागांच्या या अद्भुत प्रवासासाठी त्यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी काही प्रश्नही विचारले आहेत. प्रथम आपण युनेस्कोच्या महासंचालकांची मन की बात ऐकूया.

#Audio (UNESCO DG)#

युनेस्को महासंचालक - नमस्ते महामहिम, प्रिय पंतप्रधानजी, रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 100 व्या भागात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी युनेस्को च्या वतीने तुमचे आभार मानतो. युनेस्को आणि भारताचा इतिहास समान आहे. शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि माहिती या सर्व क्षेत्रात आमची एकत्रित मजबूत भागीदारी आहे आणि मला मिळालेल्या या संधीच्या माध्यमातून आज शिक्षणाचे महत्त्व सांगायचे आहे.2030 पर्यंत जगातील प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी UNESCO त्याच्या सदस्य राष्ट्रांसोबत काम करत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेले आपण कोणते प्रयत्न करत आहात याबाबत माहिती द्याल का? युनेस्को संस्कृतीला पाठिंबा देण्याचे आणि वारशाचे संरक्षण करण्याचे देखील कार्य करते आणि भारत यावर्षी G-20 चे अध्यक्षस्थान भूषवत  आहे.या कार्यक्रमासाठी जागतिक नेते दिल्लीत येणार आहेत. महामहिम,  भारत आंतरराष्ट्रीय विषयसूचीमध्ये संस्कृती आणि शिक्षणाला कसे मांडणार आहे? या संधीसाठी मी पुन्हा एकदा तुमचा आभारी आहे आणि तुमच्या माध्यमातून भारतातील लोकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो.... लवकरच भेटू. खूप खूप धन्यवाद.
 
पंतप्रधान मोदी - धन्यवाद, महामहिम. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 100 व्या भागात तुमच्याशी संवाद साधताना मला आनंद होत आहे. शिक्षण आणि संस्कृती यासारखे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत याचाही मला आनंद आहे.
 
मित्रांनो, युनेस्कोच्या महासंचालकांना शिक्षण आणि सांस्कृतिक संरक्षणा संदर्भातील  भारताच्या प्रयत्नांबद्दल जाणून घ्यायचे आहे. हे दोन्ही विषय 'मन की बात'चे आवडते विषय आहेत.
 
शिक्षण असो वा संस्कृती, तिचे जतन असो वा संवर्धन असो, ही भारताची प्राचीन परंपरा आहे. आज देश या दिशेने जे कार्य करत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असो किंवा प्रादेशिक भाषेत शिक्षणाचा पर्याय असो, शिक्षणात तंत्रज्ञानाचा समावेश असो, असे अनेक प्रयत्न तुम्हाला दिसतील.काही वर्षांपूर्वीगुजरातमध्ये, उत्तम शिक्षण देण्यासाठी आणि विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी 'गुणोत्सव आणि शाला प्रवेशोत्सव' यासारखे कार्यक्रम हे लोकसहभागाचे एक अद्भुत उदाहरण म्हणून स्थापित झाले होते. शिक्षणासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या अनेक लोकांच्या प्रयत्नांवर आम्ही 'मन की बात' मध्येप्रकाशझोत टाकला आहे. तुम्हाला आठवत असेल, एकदा आम्ही ओदिशातील चहा विक्रेते स्वर्गीय डी. प्रकाश राव यांच्याबद्दल चर्चा केली होती, ज्यांनी  गरीब मुलांना शिकवण्याची मोहीम सुरु केली होती.झारखंडच्या गावांमध्ये डिजिटल लायब्ररी चालवणारे संजय कश्यप असोत किंवा मग कोविडच्या काळात ई-लर्निंगद्वारे अनेक मुलांना मदत करणाऱ्या हेमलता एन.के. असोत अशा अनेक शिक्षकांची उदाहरणे आम्ही 'मन की बात'मध्ये घेतली आहेत. सांस्कृतिक संवर्धनाच्या प्रयत्नांनबद्दल देखील आम्ही 'मन की बात' मध्ये सतत चर्चा केली आहे.
 
लक्षद्वीपचा कुमेल ब्रदर्स चॅलेंजर्स क्लब असो, किंवा कर्नाटकचे ‘क्वेमश्री’ जी'कला चेतना' सारखे व्यासपीठ असोत, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी मला पत्र लिहून अशी उदाहरणे पाठवली आहेत. देशभक्तीवरील 'गीत', 'अंगाई’ आणि 'रांगोळी' या तीन स्पर्धांबद्दलही आम्ही बोललो होतो.तुम्हाला आठवत असेल, एकदा आम्ही देशभरातील कथाकारांसोबत कथाकथनाच्या माध्यमातून भारतीय शिक्षण पद्धतींवर चर्चा केली होती. सामूहिक प्रयत्नांमुळे मोठ्यातील मोठा बदल घडवून आणता येतो यावर माझा अढळ विश्वास आहे. या वर्षी, आपण स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करत असतानाच  G-20 चे अध्यक्षपदही भूषवत आहोत. शिक्षणासोबत वैविध्यपूर्ण जागतिक संस्कृती समृद्ध करण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ होण्याचे हे देखील एक कारण आहे.
 
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या उपनिषदातील एक मंत्र शतकानुशतके आपल्या मनाला प्रेरणा देत आहे.
चरैवेति चरैवेति चरैवेति |

चालत राहा चालत राहा चालत राहा

चरैवेती चरैवेती याच भावनेने आज आम्ही 'मन की बात'चा 100 वा भाग पूर्ण करत आहोत. भारताची सामाजिक जडणघडण मजबूत करण्यामध्ये, 'मन की बात' हा माळेतील उभ्या आडव्या 
धाग्यासारखा आहे जो प्रत्येक मणी एकत्र गुंफून ठेवण्यात मदत करतो. प्रत्येक भागात देशवासीयांची सेवा आणि शक्ती इतरांना प्रेरणा देत आहे. या कार्यक्रमात प्रत्येक देशवासी इतर देशवासीयांसाठी प्रेरणा बनत आहे.एक प्रकारे, मन की बातचा प्रत्येक भाग पुढच्या भागासाठी पार्श्वभूमी तयार करतो. 'मन की बात' नेहमीच सद्भावना, सेवाभावनेने आणि कर्तव्यभावनेने पुढे गेली आहे.हीच सकारात्मकता स्वातंत्र्याच्या काळात देशाला पुढे नेईल, एका नव्या उंचीवर नेईल आणि मला आनंद आहे की 'मन की बात' ची जी सुरुवात झाली होती ती आज देशात एक नवीन परंपरा बनत आहे. एक अशी परंपरा ज्यामध्ये आपल्याला प्रत्येकाचे प्रयत्न दिसून येतात.
 
मित्रांनो, हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय संयमाने ध्वनिमुद्रित करणाऱ्या आकाशवाणीच्या सहकाऱ्यांचेही मी आज आभार मानू इच्छितो. अत्यंत कमी वेळात आणि अतिशय वेगाने 'मन की बात'चे विविध प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करणाऱ्या भाषांतरकारांचाही मी आभारी आहे. मी दूरदर्शन आणि MyGovच्या सहकाऱ्यांचेही आभार मानतो.कोणत्याही व्यावसायिक जाहिरातीशिवाय ‘मन की बात’ दाखवणाऱ्या  देशभरातील सर्व वाहिन्या तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या  लोकांचे मी आभार मानतो. आणि सर्वात शेवटी, भारतातील लोक, भारतावर विश्वास ठेवणारे लोक ज्यांनी ‘मन की बात’ चे हे धनुष्य लीलया पेलले आहे, हे सर्व केवळ तुमची प्रेरणा आणि शक्तीमुळेच शक्य झाले आहे.
 
मित्रांनो, आज मला इतकं काही सांगायचं आहे की वेळ आणि शब्द दोन्ही कमी पडत आहेत. पण मला खात्री आहे की तुम्ही सर्व माझ्या भावना समजून घ्याल. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी तुमच्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच तुमच्यामध्ये राहिलो आहे, राहणार आहे. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. पुन्हा नवीन विषय आणि नवीन माहिती घेऊन देशवासीयांच्या यशाचा आनंद साजरा करूया, तोपर्यंत मला निरोप द्या आणि तुमची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद नमस्कार |

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India records highest-ever startup surge with 55,200 recognised in FY26

Media Coverage

India records highest-ever startup surge with 55,200 recognised in FY26
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Cabinet approves Continuation of Pradhan Mantri Gram Sadak Yojana-III till March 2028
April 18, 2026

The Union Cabinet, chaired by the Prime Minister Shri Narendra Modi, today has given its approval for the continuation of Pradhan Mantri Gram Sadak Yojana-III (PMGSY-III) beyond March 2025 upto March 2028. It involves consolidation of Through Routes and Major Rural Links connecting habitations to Gramin Agricultural Markets (GrAMs), Higher Secondary Schools and Hospitals. The revised outlay of the scheme will be Rs.83,977 crore.

The Cabinet further, amongst other things, approved the following:

  • Extension of timeline till March 2028 for completion of roads and bridges in plain areas and roads in hilly areas.
  • Extension of timeline till March 2029 for completion of bridges in hilly areas.
  • Works sanctioned before 31.03.2025 but un-awarded till now may be taken up for tender/award.
  • Long Span Bridges (LSBs) (161 Nos. with estimated cost of Rs.961 crore) pending for sanction but lying on the alignment of already sanctioned roads may be sanctioned and tendered/awarded.
  • Revision of outlay to Rs. 83,977 crore from original outlay of Rs.80,250 crore.

Benefits:

The extension of the timeline of PMGSY-III will enable the full realization of its intended socio-economic benefits by ensuring completion of targeted upgradation of rural roads. It will significantly boost the rural economy and trade by enhancing market access for agricultural and non-farm products, reducing transportation time and costs, and thereby improving rural incomes. Improved connectivity will facilitate better access to education and healthcare institutions, ensuring timely delivery of essential services, particularly in remote and underserved areas.

The continued implementation will also generate substantial employment opportunities, both directly through construction activities and indirectly by promoting rural enterprises and services. Overall, the extension will contribute to inclusive and sustainable development by bridging the rural-urban divide and advancing the vision of Viksit Bharat 2047.