कारखीयांव येथील यूपीएसआयडीए ॲग्रो पार्कमधील बनास काशी संकुल दूध प्रक्रिया केंद्राचे केले उद्‌घाटन
एचपीसीएलने उभारलेला एलपीजी बॉटलिंग प्लांट, यूपीएसआयडीए ॲग्रो पार्कमधील विविध पायाभूत सुविधा आणि रेशमी कापडावरील छपाईसाठीची सामायिक सुविधा यांचे केले उद्‌घाटन
विविध रस्ते प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि भूमीपूजन केले
वाराणसीमधील शहरी विकासविषयक, पर्यटन आणि आध्यात्मिक पर्यटन विषयक विविध प्रकल्पांचे केले उद्‌घाटन आणि भूमीपूजन
वाराणसीच्या राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेचे (एनआयएफटी) केले भूमीपूजन
बीएचयू येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि नॅशनल सेंटर ऑफ एजिंगची पायाभरणी केली
सिग्रा क्रीडा स्टेडीयमचा पहिला टप्पा आणि जिल्हा रायफल शूटींग रेंजचे केले उद्‌घाटन
“दहा वर्षांच्या काळात बनारस शहराने मला बनारसी केले आहे”
“शेतकरी आणि पशुपालक यांना सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे”
“बनास काशी संकुल” 3 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणेल”
“पशुपालन हे महिलांच्या स्वावलंबनासाठी महत्त्वाचे साधन आहे”
“आपले सरकार अन्न पुरवठादार आणि उर्जा पुरवठादार होण्यासोबतच खतांचे पुरवठादार होण्यासाठी देखील प्रयत्नशील आहे”
“आत्मनिर्भर भारत हा विकसित भारतासाठीचा पाया बनेल”

हर हर महादेव!

व्यासपीठावर उपस्थित असलेले उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी महेंद्र नाथ पांडेय जी,उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक जी, बनास दुग्ध संस्थेचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी,भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी जी, राज्यातील इतर मंत्री, लोकप्रतिनिधी आणि काशीच्या माझ्या कुटुंबातून आलेल्या बंधू-भगिनींनो! 

काशीच्या भूमीवर आज पुन्हा एकदा तुम्हा लोकांमध्ये येण्याची संधी मिळालेली आहे. जोपर्यंत बनारसला येत नाही तोपर्यंत माझे मन मानत नाही. दहा वर्षांपूर्वी आपण लोकांनीच मला बनारस मतदारसंघातून खासदार बनवले आता या दहा वर्षांमध्ये बनारसने आम्हाला बनारसी बनवून टाकले आहे. 

बंधू आणि भगिनींनो, 

आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आला आहात, आम्हाला आशीर्वाद देत आहात. हे दृश्य आम्हाला गहिवरून टाकत आहे. आपल्या लोकांच्या परिश्रमामुळेच आज काशीला सतत नूतन नवीन बनवण्याचे अभियान सतत सुरू आहे. आज पण इथे 13,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले आहे. हे प्रकल्प काशीच्या बरोबरीनेच पूर्वेकडील भारताच्या (पूर्वांचल) विकासाला गती देतील. 

या प्रकल्पांमध्ये रेल्वे, रस्ते, विमानतळ यांच्याशी संबंधित प्रकल्प आहे, यामध्ये पशुपालन, उद्योग, क्रीडा, कौशल्यविकास यांच्याशी संबंधित काही प्रकल्प आहेत. यामध्ये आरोग्य, स्वच्छता, अध्यात्म, पर्यटन, एलपीजी गॅस, अशा अनेक क्षेत्राशी निगडित विविध कामे आहेत. यामधून बनारस बरोबरच पूर्ण पूर्वांचल साठी रोजगाराच्या खूप सार्‍या संधी उपलब्ध होणार आहेत. आज संत रविदास जी यांच्या जन्मस्थानी त्यांच्याशी निगडित अनेक प्रकल्पांचे सुद्धा येथे लोकार्पण झालेले आहे. मी या सर्व प्रकल्पांसाठी आपल्या सर्वांचे सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. 

मित्रांनो, 

काशी आणि पूर्वांचल भागामध्ये काही चांगले झाले की मला खूप आनंद होतो आणि हे स्वाभाविक आहे. आज मोठ्या संख्येने माझे तरुण मित्र सुद्धा इथे आलेले आहेत. काल रात्री मी रस्ते मार्गाने बाबतपुर वरून बीएलडब्ल्यू अतिथीगृहात आलो आहे. काही महिन्यांपूर्वी जेव्हा मी बनारसला आलो होतो. तेव्हा फुलवरिया  या उड्डाणपुलाचे लोकार्पण करून गेलो होतो. बनारस मध्ये हा उड्डाणपूल किती मोठे वरदान ठरलेला आहे हे आता दिसून येत आहे. यापूर्वी जर कोणाला बीएलडब्ल्यू पासून बाबतपुर जावे लागत होते तेव्हा लोकांना जवळजवळ दोन ते तीन तास आधी घरातून निघावे लागत होते. सर्वात आधी मंडुवाडीह इथे ठप्प, नदेसर इथे ठप्प. याचा अर्थ जेवढा वेळ विमानाने दिल्लीला जाण्यासाठी लागत नाही त्यापेक्षा अधिक वेळ विमान पकडण्यासाठी लागतो  असे आहे. परंतु या  उड्डाणपूलाने हा कालावधी आता अर्धा केलेला आहे. 

 

आणि काल रात्री तर मी आवर्जून तिथे जाऊन प्रत्येक काम करतात प्रत्यक्ष पाहून आलेलो आहे. तेथील परिस्थितीला समजून घेऊन आलेलो आहे. पायी चालत दूर रात्रीपर्यंत गेलो होतो. अशाच प्रकारे मागच्या दहा वर्षांमध्ये बनारसच्या विकासाचा वेग पण कित्येक पटीने वाढलेला आहे. आता थोड्या वेळापूर्वी इथे सिगरा क्रीडांगणाच्या पहिल्या टप्प्यातल्या विकास कामांचे लोकार्पण सुद्धा झालेले आहे. बनारसच्या  तरुण खेळाडूंसाठी आधुनिक पद्धतीच्या शूटिंग रेंज अर्थात नेमबाजीच्या खेळपट्टीचे सुद्धा लोकार्पण झालेली आहे. यामुळे बनारस आणि इतर क्षेत्रातल्या तरुण खेळाडूंना खूप फायदा मिळणार आहे. 

मित्रांनो, 

इथे येण्यापूर्वी पहिल्यांदा मी बनास दुग्ध प्रकल्पाच्या प्रकल्पामध्ये गेलो होतो. तिथे मला अनेक पशुपालक भगिनींबरोबर चर्चा करण्याची संधी मिळाली. शेतकरी कुटुंबातील या भगिनींना दोन-तीन वर्षांपूर्वी आम्ही स्वदेशी  जातीची गीर गाय दिलेली होती. याचे उद्दिष्ट हे होते की, पूर्वांचलमध्ये सुद्धा स्वदेशी गाई संदर्भात अधिक जागरूकता वाढावी. शेतकऱ्यांना, पशुपालकांना याचा फायदा व्हावा. मला सांगण्यात आले आहे की, आज इथे गीर गाईंची संख्या जवळ जवळ साडेतीनशे च्या घरात पोचलेली आहे. 

या चर्चेच्या मध्ये आमच्या भगिनींनी मला हे सांगितले की,  जिथे अगोदर सामान्य गाईपासून पाच लिटर दूध मिळत होते आता गीर गाय 15 लिटर दूध देते आहे. मला हे पण सांगण्यात आले की एका कुटुंबामध्ये तर अशी घटना समोर आलेली आहे की, एक गाय तिथे वीस लिटर पर्यंत दूध देऊ लागली आहे. यामुळे या भगिनींना प्रत्येक महिन्याला हजारो रुपयांची अतिरिक्त कमाई मिळत होत आहे. यामुळे आमच्या या भगिनीसुद्धा लखपती दीदी बनत आहेत आणि हे स्वयंसहायता बचत गटाशी संलग्न असलेल्या दहा कोटी भगिनींसाठी ही मोठी प्रेरणादायी बाब आहे. 

 मित्रांनो, 

बनास दुग्ध प्रकल्पाची पायाभरणी मी दोन वर्षांपूर्वी केली होती. तेव्हा मी वाराणसी बरोबरच पूर्वांचलच्या सर्व पशुपालकांना सुद्धा, गोपालकांना सुद्धा हा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याची हमी दिलेली होती. आज मोदींची हमी आपल्यापुढे आहे आणि यासाठीच तर लोक म्हणत असतात मोदीची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची हमी. योग्य तऱ्हेने गुंतवणूक झाल्यास रोजगाराच्या संधी कशाप्रकारे निर्माण होतात याचे बनास दुग्ध प्रकल्प उत्तम उदाहरण आहे. सध्या बनास दुग्ध प्रकल्प वाराणसी, मिर्ज़ापुर, गाज़ीपुर, रायबरेली या जिल्ह्यांमध्ये पशुपालकांकडून जवळजवळ दोन लाख लिटर दूध संकलन करत आहे. 

हा प्रकल्प चालू झाल्याने आता बलिया, चंदौली, प्रयागराज, जौनपुर आणि आणखीन दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये लाखो पशुपालकांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे वाराणसी, जौनपुर, चंदौली, गाजीपुर, आजमगढ़ जिल्ह्यामधल्या एक हजार पेक्षा जास्त गावांमध्ये दुग्ध गट बनतील. पशुपालकांचे जास्तीत जास्त दूध अधिक किमतीने विकले जाईल आणि यामुळे प्रत्येक शेतकरी पशुपालकांच्या कुटुंबाला अधिकची कमाई होणे निश्चित आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांना, पशुपालकांना आणखीन चांगल्या  पशूंच्या जातींची ओळख आणि अधिक चांगल्या चाऱ्यासाठी जागृत  करेल आणि त्यांना प्रशिक्षित करेल. 

 

मित्रांनो, 

एवढेच नाही तर बनास काशी संकुल रोजगाराच्या सुद्धा हजारो नवीन संधी उपलब्ध करणार आहे. वेगवेगळ्या कामांमधील रोजगाराच्या संधी निर्माण होतील. एक अनुमान आहे की, या संकुलामुळे संपूर्ण परिसरातील तीन लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांची कमाई वाढणार आहे. इथे दुधाबरोबरच ताक, दही, लस्सी, आईस्क्रीम, पनीर आणि अनेक प्रकारच्या स्थानिक मिठाई पदार्थ बनवले जातील. एवढे सर्व काही इथे तयार झाल्यावर त्यांची विक्री करणाऱ्याला सुद्धा रोजगार मिळणार आहे. हा प्रकल्प बनारसच्या प्रसिद्ध  मिठायांना देशातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी खूप मोठी भूमिका पार पाडणार आहे. दुधाच्या दळणवळणाशी संबंधित कारभारात सुद्धा अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे. यामुळे पशुखाद्य संबंधी दुकानदार, स्थानिक वितरक यांचा सुद्धा आवाका वाढणार आहे. यामध्ये सुद्धा अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

मित्रांनो, 

या सर्व प्रयत्नांच्या मध्ये, माझा बनास दुग्ध प्रकल्पाच्या कामकाजाशी निगडित वरिष्ठ  मित्रांना सुद्धा एक विनंती आहे. मला असे वाटते की, आपण दुधाचा पैसा थेट भगिनींच्या खात्यामध्ये डिजिटल पद्धतीने पाठवावा. कोणत्याही पुरुषांच्या हातामध्ये हा पैसा पडू देऊ नये. माझा असा अनुभव आहे की यामुळे खूपच चांगले परिणाम मिळू शकतात. पशुपालन तर हे एक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये सर्वात अधिक आमच्या भगिनी जोडल्या जातात. या भगिनींना आत्मनिर्भर बनवण्याचे हे खूप मोठे माध्यम ठरू शकते. पशुपालन हे लहान शेतकरी आणि जमीन नसलेल्या भूमिहीन कुटुंबीयांसाठी सुद्धा मोठा आधार आहे. यासाठीच डबल इंजिन सरकार पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्राला एवढे प्राधान्य देत आहे. 

मित्रांनो, 

आमचे सरकार, अन्नदात्याला ऊर्जादाता बनवण्याबरोबरच आता अन्नदात्याला खत दाता बनवण्यासाठी सुद्धा काम करत आहे. खत दाता निर्माण व्हावेत, आम्ही पशुपालकांना दुध व्यवसायाशिवाय गोबर अर्थात शेणाशी संबंधित कामातून  मिळकतीची संधी प्राप्त करून देत आहोत. आमचे हे जे दुग्ध व्यवसाय प्रकल्प आहेत, यामधून मिळणाऱ्या शेणापासून  बायो सीएनजी प्रकल्प उभारावेत आणि या प्रक्रियेमधून जो जैविक खत मिळणार आहे, ते खत देखील कमी किमतीमध्ये  शेतकऱ्यांना मिळावे यासाठी काम सुरू आहे. यामुळे नैसर्गिक शेतीला आणखी पाठबळ मिळेल. गंगाजी च्या किनाऱ्यावर नैसर्गिक शेती करण्याची प्रथा तशीही आता वाढत चाललेली आहे. आज गोबरधन योजनेच्या माध्यमातून शेणाबरोबरच दुसरा इतर उपलब्ध होणाऱ्या कचऱ्यापासून बायोगॅस, बायो सीएनजी तयार केला जाणार आहे. यामुळे स्वच्छता सुद्धा राहील आणि कचऱ्यापासून पैसा सुद्धा मिळत राहील. 

मित्रांनो, 

आपल्या इथे काशी तर कचऱ्यापासून सोन निर्माण बनवण्याच्या कार्यात सुद्धा एक आदर्शाच्या रूपाने देशाच्या पुढे येत आहे. आज अशाच आणखी एक प्रकल्पाचे लोकार्पण इथे झाले आहे. हा प्रकल्प दर दिवशी शहरातून निघणाऱ्या सहाशे टन कचऱ्याला दोनशे टन कोळशात रूपांतरित करेल. विचार करा हाच कचरा जर कुठे कोणत्या मैदानावर आपण फेकत राहिलो असतो तर या कचऱ्याचा केवढा मोठा डोंगर तयार झाला असता. काशीमध्ये, नाले, सांडपाणी आणि मलनिस्सारण व्यवस्था आणखीन चांगली होण्यासाठी अनेक काम झालेली आहेत. 

 

मित्रांनो, 

शेतकरी आणि पशुपालक नेहमीच भाजपा सरकारसाठी सर्वात मोठे प्राधान्य  क्षेत्रे राहिलेली आहेत. दोन दिवसात अगोदरच सरकारने उसाच्या कमीत कमी भावात वाढ करून 340 रुपये प्रतिक्विंटल केलेला आहे. पशुपालकांच्या हिताला लक्षात घेऊन पशुधन विमा कार्यक्रमाला सुद्धा सुलभ केले  गेले आहे. आपण पूर्वांचल मधील लोकांनी ती वेळ आठवावी ज्यावेळी उसाच्या पैशांसाठी याआधीच्या सरकारकडे किती याचना कराव्या लागायच्या परंतु आता हे भाजपाचे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे फळ तर त्याला मिळतच आहे त्याचबरोबर कृषी मालाचे भाव सुद्धा वाढवले जात आहेत. 

बंधू आणि भगिनींनो,

आत्मनिर्भर भारताच्या जोरावरच विकसित भारताचे निर्माण होईल.

आपल्या गरजेचे प्रत्येक सामान बाहेरून आयात करण्याने विकसित भारत होऊ शकत नाही.

आधीची सरकारे आणि आमचे सरकार यांच्या विचारसरणीत हाच मोठा फरक आहे. आत्मनिर्भर भारत तेव्हाच होईल, जेव्हा देशातील प्रत्येक छोट्यात छोटी शक्ती जागृत केली जाईल. जेव्हा छोटे शेतकरी, पशुपालक, कारागीर, शिल्पकार, लघु उद्योजक यांना मदत दिली जाईल. यासाठी, मी लोकलसाठी वोकल राहतोच राहतो. आणि मी जेव्हा वोकल फॉर लोकल म्हणतो, तेव्हा हा त्या विणकर, त्या छोट्या उद्योजकांचा प्रचार आहे, जे वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर लाखो रुपयांच्या जाहीराती देऊ शकत नाहीत. स्थानिक उत्पादन बनवणाऱ्या त्या प्रत्येक सहकाऱ्याचा प्रचार मोदी स्वतः करतात. देशातील प्रत्येक छोट्या शेतकऱ्याचे, प्रत्येक छोट्या उद्योजकाचे राजदूत आहेत सदिच्छादूत हे आज मोदी आहेत. जेव्हा मी खादी विकत घेण्याचा, खादी घालण्याचा आग्रह करतो, तेव्हा मी गावातील खादीशी संबंधित बहिणींना, दलितांना, मागासांना, त्यांच्या श्रमांना बाजारपेठेशी जोडतो. जेव्हा मी देशात बनवलेली खेळणी खरेदी करण्याबद्दल बोलतो, तेव्हा पिढ्यानपिढ्या खेळणी बनवत असलेल्या कुटुंबांचे जीवनमान सुधारते. जेव्हा मी मेक इन इंडिया म्हणतो , तेव्हा मी या लघु आणि कुटीर उद्योगांच्या, आपल्या एमएसएमईच्या क्षमतेला नवीन उंची देण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा मी आपला देश बघा असे म्हणतो तेव्हा देशातील पर्यटनाला प्रोत्साहन देतो. 

यामुळे स्थानिक लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगारात कशी वाढ होते हे आपण काशीमध्ये हे अनुभवत आहोत. विश्वनाथ धामचे पुनर्निर्माण झाले आहे तेव्हापासून आतापर्यंत 12 कोटींहून अधिक लोकांनी काशीला भेट दिली आहे. यामुळे येथील दुकानदार, ढाबे, रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, फुल विक्रेते, नाविक आणि प्रत्येकाच्या रोजगारात वाढ झाली आहे. आज तर आणखी एक नवी सुरुवात झाली आहे. आज काशी आणि अयोध्येसाठी  विजेवर चालणाऱ्या छोट्या छोट्या बोटींची योजना सुरू झाली आहे. यामुळे काशी आणि अयोध्येत येणाऱ्या भाविकांचा अनुभव आणखी चांगला होणार आहे.

बंधू आणि भगिनींनो,

अनेक दशकांच्या घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाने उत्तर प्रदेशला विकासात मागे ठेवले. आधीच्या सरकारांनी उत्तर प्रदेशला आजारी राज्य बनवले, तरुणांचे भविष्य हिरावून घेतले. पण आज जेव्हा उत्तर प्रदेश बदलत आहे, जेव्हा उत्तर प्रदेशचे तरुण त्यांचे नवीन भविष्य लिहित आहेत, तेव्हा हे घराणेशाहीचे वाहक काय करत आहेत? ते काय म्हणाले ते ऐकून तर मला धक्काच बसला. काँग्रेस राजघराण्यातील युवराज म्हणतात आणि तुम्हाला धक्का बसेल, काँग्रेस कुटुंबातील युवराज काय म्हणाले - ते म्हणत आहेत आणि काशीच्या भूमीवर येऊन म्हणत आहेत - काशीचे तरुण, उत्तर प्रदेशचे तरुण नशाबाज आहेत. ही कसली भाषा म्हणायची? मोदींना नावे ठेवत ठेवत त्यांनी दोन दशके घालवली. पण आता हे लोक उत्तर प्रदेशातील तरुणांवर, ईश्वर रूपी  जनता जनार्दनवर आपला उद्वेग व्यक्त करत आहेत. जे स्वतः भानावर नाहीत, ते उत्तर प्रदेशातील मुलांना, माझ्या काशीला, नशाबाज म्हणत आहेत. अरे, घराणेशाहीच्या वाहकांनो, काशी आणि उत्तर प्रदेशचे तरुण विकसित उत्तर प्रदेश घडवण्यासाठी झटतो आहे. स्वतःचे समृद्ध भविष्य घडवण्यासाठी परिश्रमांची पराकाष्ठा करत आहे. इंडी आघाडीने उत्तर प्रदेशातील तरुणांचा केलेला अपमान कोणीही विसरणार नाही.

 

मित्रांनो,

घराणेशाहीवाद्यांचे हेच खरे वास्तव असते. परिवारवादी नेहमी युवा-शक्तीला घाबरतात. प्रतिभावंत तरुणांना घाबरतात. संधी मिळाली तर सामान्य युवक सर्वत्र आव्हान देईल, असे त्यांना वाटते. रात्रंदिवस त्यांचा जयजयकार करणारे लोकच त्यांना आवडतात. आजकाल, त्यांच्या रागाचे आणि उद्विग्नतेचे आणखी एक कारण आहे. त्यांना काशी आणि अयोध्येचे नवे स्वरूप अजिबात आवडत नाही. ते त्यांच्या भाषणांमध्ये राम मंदिराबद्दल कसे कसे बोलतात ते तुम्ही पहा. ते कशा कशा प्रकारच्या बोलांनी हल्ला करतात. काँग्रेस प्रभू श्रीरामाचा इतका द्वेष करते हे मला माहीत नव्हते.

बंधू आणि भगिनींनो,

हे आपले घर आणि आपल्या मतपेढीच्या पलिकडे बघू शकत नाहीत. विचारच करु शकत नाहीत.  

म्हणून तर प्रत्येक निवडणूकीच्या काळात एकत्र येतात आणि निकालात सामसूम झाली की एकमेकांना शिव्या देत वेगळे होतात.

पण या लोकांना माहीत नाही - इ बनारस हौ, इहां सब गुरू हौ. इहां इंडी गठबंधन के पैंतरा ना चली. बनारस नाहीं.....पूरे यूपी के पता हौ. माल तोच आहे, वेष्टन नवीन आहे. यावेळी त्यांना केवळ अनामत वाचवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल.

मित्रांनो,

आज संपूर्ण देशाचा एकच मनोदय आहे - अबकी बार, NDA 400 पार. मोदींची गॅरंटी आहे- प्रत्येक लाभार्थ्याला शंभर टक्के लाभ. सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याची हमी मोदी देत आहेत, तर उत्तर प्रदेशनेही सगळ्या जागा मोदींना द्यायचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच उत्तर प्रदेश यावेळी शंभर टक्के जागा  रालोआला देणार आहे. 

बंधू आणि भगिनींनो,

मोदींचा तिसरा कार्यकाळ हा संपूर्ण जगात भारताच्या सामर्थ्याचा सर्वात प्रखर कालखंड असणार आहे.  यामध्ये भारताचे आर्थिक, सामाजिक, सामरिक, सांस्कृतिक असे प्रत्येक क्षेत्र नव्या उंचीवर असेल. गेल्या 10 वर्षात भारत 11 व्या स्थानावरून 5वी आर्थिक शक्ती बनला आहे.  येत्या 5 वर्षात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनेल.

गेल्या 10 वर्षात देशात सर्व काही डिजिटल झाल्याचे तुम्ही पाहिले आहे. आज तुम्हाला चौपदरी, सहा पदरी, आठ पदरी असे रुंद रस्ते दिसत आहेत, रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होत आहे. वंदे भारत, अमृत भारत, नमो भारत अशा जलद आणि आधुनिक गाड्या धावताना दिसत आहेत आणि हा नवा भारत आहे.  येत्या 5 वर्षात अशा विकासकामांना आणखी गती मिळणार आहे आणि देशाचा कायापालट होणार आहे.

विकासापासून वंचित राहिलेल्या पूर्व भारताला ते विकसित भारताचे विकास इंजिन बनवू, अशी हमी मोदींनी दिली आहे.  वाराणसी ते औरंगाबाद या सहा पदरी महामार्गाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.  येत्या 5 वर्षात हे पूर्ण होईल तेव्हा  उत्तर प्रदेश आणि बिहारला खूप फायदा होईल.  वाराणसी-रांची-कोलकाता द्रुतगती मार्ग बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील अंतर आणखी कमी करणार आहे.  भविष्यात बनारस ते कोलकाता प्रवासाचा वेळ जवळपास निम्मा होणार आहे.

 

मित्रांनो,

येत्या 5 वर्षात उत्तर प्रदेश आणि काशीच्या विकासात नवीन आयाम जोडले जातील. त्यानंतर काशीचा प्रवास रोपवेसारख्या आधुनिक वाहतुकीने होईल. विमानतळाची क्षमता कितीतरी पटीने अधिक असेल. काशी ही केवळ उत्तर प्रदेशचीच नव्हे तर देशातील महत्त्वाची क्रीडानगरी बनणार आहे.  येत्या 5 वर्षांत माझी काशी, मेड इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या मोहिमेला आणखी गती देईल.  येत्या 5 वर्षात गुंतवणूक, नोकऱ्या, कौशल्य आणि रोजगाराचे केंद्र म्हणून काशीची भूमिका अधिक सशक्त होईल.

काशीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी प्रांगण येत्या 5 वर्षांत तयार होईल. यामुळे उत्तर प्रदेशच्या तरुणांना अनेक कौशल्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.  यामुळे, आमच्या विणकरांना आणि आमच्या कारागिरांना नवीन तंत्रज्ञान आणि नवीन कौशल्ये प्रदान करणे सोपे होईल.

मित्रांनो,

गेल्या दशकात आम्ही आरोग्य आणि शिक्षणाचे केंद्र म्हणून काशीला एक नवीन ओळख दिली आहे. आता त्यात एक नवीन वैद्यकीय महाविद्यालयही जोडले जाणार आहे. बीएचयू मधील नॅशनल सेंटर ऑफ एजिंगसह, 35 कोटी रुपये किमतीची

 

अनेक निदान यंत्रे आणि उपकरणे देखील आज समर्पित केली जात आहेत. यामुळे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी परिसरातच निदान करणे सोपे होईल. काशीमध्ये रुग्णालयांमधील जैव - कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठीची नवीन सुविधा देखील लवकरच उभारली जाणार आहे.

मित्रांनो,

काशीचा, उत्तर प्रदेशचा आणि देशाचा वेगवान विकास आता थांबू द्यायचा नाही आहे. काशीच्या प्रत्येक रहिवाशाला आता संघटित व्हावे लागेल. जर देश आणि जगाचा मोदींच्या हमीवर इतका विश्वास असेल, तर त्यामागे तुमची आपुलकी  आणि बाबांचा आशीर्वाद आहे.

पुन्हा एकदा, नवीन प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन. माझ्यासोबत बोला.

भारत माता की जय !

भारत माता की जय !

भारत माता की जय !

हर-हर महादेव!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Centre allows 100% FDI in insurance via auto route

Media Coverage

Centre allows 100% FDI in insurance via auto route
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister congratulates Dr. R. Balasubramaniam Ji and Dr. Joram Aniya Ji on being appointed as Full-time Members of NITI Aayog
May 02, 2026

Prime Minister Shri Narendra Modi has congratulated Dr. R. Balasubramaniam Ji and Dr. Joram Aniya Ji on being appointed as Full-time Members of NITI Aayog.

The Prime Minister noted that their rich experience and deep understanding of various issues will greatly strengthen policymaking. Shri Modi expressed confidence that their contributions will help drive innovation and growth across sectors. He also wished them a very productive and impactful tenure ahead.

The Prime Minister posted on X:

"Congratulations to Dr. R. Balasubramaniam Ji and Dr. Joram Aniya Ji on being appointed as Full-time Members of NITI Aayog. Their rich experience and deep understanding of various issues will greatly strengthen policy making. I am confident their contributions will help drive innovation and growth across sectors. Wishing them a very productive and impactful tenure ahead."