पीएम-किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी करण्याचे भाग्य आज मला लाभले, ही योजना देशभरातील आपल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे याचे मला खूप समाधान आहे : पंतप्रधान
मखाना विकास मंडळ स्थापन करण्याचा आमचा निर्णय बिहारमधील मखाना लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे, यामुळे मखानाचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणनात मोठी मदत होणार आहे: पंतप्रधान
जर रालोआचे सरकार नसते तर बिहारसह देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी मिळाला नसता, गेल्या 6 वर्षात यातील पै न पै थेट आपल्या अन्नदातांच्या खात्यात पोहोचली आहे : पंतप्रधान
पौष्टिक मखाना असो किंवा भागलपूरचे रेशीम असो, बिहारची अशी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने जगभरातील बाजारपेठांमध्ये पोहोचवण्यावर आमचा भर आहे: पंतप्रधान
पीएम धन-धान्य योजना कृषीदृष्ट्या मागास भागात पीक उत्पादनाला चालना देण्याबरोबरच आपल्या शेतकऱ्यांना देखील सक्षम बनवेल: पंतप्रधान
आज, बिहारच्या भूमीने 10,000 व्या एफपीओची स्थापना पाहिली, या प्रसंगी, देशभरातील शेतकरी उत्पादक संघटनेच्या सर्व सदस्यांचे खूप खूप अभिनंदन!: पंतप्रधान

भारत माता की जय,

अंगराज दानवीर कर्ण के धरती महर्षि मेंहीं के तपस्थली, भगवान वासुपूज्य के पंच कल्याणक भूमी, विश्व प्रसिद्ध विक्रमशिला महाविहार बाबा बूढ़ानाथ के पवित्र भूमी पे सब भाय बहिन सिनि के प्रणाम करै छियै।।

मंचावर विराजमान राज्यपाल आरिफ मोहम्मद खान जी, बिहार चे लोकप्रिय आणि बिहारच्या विकासासाठी समर्पित आमचे लाडके मुख्यमंत्री नीतीश कुमार जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी शिवराजसिंह चौहान जी, जीतन राम मांझी जी, ललन सिंह जी, गिरीराज सिंह जी, चिराग पासवान जी, राज्यमंत्री  रामनाथ ठाकूर जी, बिहार सरकारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी जी, विजय सिन्हा जी, राज्याचे इतर मंत्री आणि लोकप्रतिनिधीगण, उपस्थित मान्यवर आणि बिहारच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.

आज आपल्यासोबत देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक मुख्यमंत्री, अनेक मंत्री आणि कोट्यवधी शेतकरी देखील  या कार्यक्रमात आपल्या सोबत जोडलेले आहेत. मी त्या सर्वांना देखील अतिशय आदराने नमन करतो.

मित्रांनो,

महाकुंभच्या काळात मंद्रांचलच्या भूमीवर येणे ही खरोखरच एक मोठी भाग्याची गोष्ट आहे. या भूमीमध्ये श्रद्धा आहे, वारसा आहे आणि विकसित भारताचे सामर्थ्य देखील आहे. ही शहीद तिलका मांझी यांची भूमी आहे, ही सिल्क सिटी देखील आहे. बाबा अजगैबीनाथ यांच्या पवित्र धरेवर यावेळी महाशिवरात्रीच्या तयारीची मोठी लगबग आहे. अशा पवित्र काळात मला पीएम किसान सन्मान निधीचा आणखी एक हप्ता देशाच्या कोट्यवधी शेतकऱ्यांना पाठवण्याचे भाग्य लाभले आहे. सुमारे 22 हजार कोटी रुपये एका क्लिकवर देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत. आणि ज्यावेळी मी आता क्लिक दाबले, मी पाहात होतो या ठिकाणी देखील ज्या राज्यांची दृश्ये दिसत होती, येथे देखील काही लोकांकडे माझी नजर गेली, ते लोक अगदी पटापट आपले मोबाईल पाहात होते, की पैसे आले की नाहीत आणि लगेच त्यांच्या डोळ्यात चमक दिसत होती.

 

मित्रांनो,

आज जो किसान सन्मान निधी देण्यात आला आहे, यामध्ये बिहारमधील 75 लाखांपेक्षा जास्त शेतकऱी कुटुंबे आहेत. बिहारच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज थेट सुमारे 1600 कोटी रुपये पोहोचले आहेत. मी बिहार आणि देशाच्या सर्व शेतकरी कुटुंबांना खूप खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो.

मित्रांनो,

मी लाल किल्ल्यावरून सांगितले आहे की विकसित भारताचे चार मजबूत स्तंभ आहेत. हे स्तंभ आहेत- गरीब, आपले अन्नदाते शेतकरी, आपले युवा आणि आपल्या देशाची महिलाशक्ती. रालोआ सरकार मग ते केंद्रात असो, किंवा मग येथे नीतीशजींच्या नेतृत्वात काम करणारे सरकार असो, शेतकऱी कल्याणाला  आमचे सर्वप्रथम प्राधान्य आहे. गेल्या दशकात आम्ही शेतकऱ्यांची प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी संपूर्ण ताकदीने काम केले आहे. शेतकऱ्याला शेतीसाठी चांगले बियाणे पाहिजे, पुरेसे आणि स्वस्त खत पाहिजे, शेतकऱ्यांना सिंचन सुविधा मिळाल्या पाहिजेत, पशुंचे आजारांपासून रक्षण करता आले पाहिजे आणि आपत्तीच्या काळात होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण पाहिजे. पूर्वी या सर्व पैलूंसदर्भात शेतकरी संकटांनी वेढलेले असायचे, जे लोक पशुंचा चारा गिळंकृत करू शकतात, ते या सर्व परिस्थितींमध्ये कधीही बदल करू शकत नव्हते.  रालोआ सरकारने या परिस्थितीत बदल केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही आधुनिक प्रकारची शेकडो बियाणे शेतकऱ्यांना दिली. पूर्वी युरियासाठी शेतकऱ्यांना लाठ्या खाव्या लागत होत्या आणि युरियाचा काळाबाजार होत होता. आज बघा, शेतकऱ्यांना पुरेसे खत मिळत आहे. आम्ही तर कोरोनाच्या महासंकटात देखील शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू दिली नाही. तुम्ही कल्पना करू शकता की जर रालोआचे सरकार नसले असते तर काय झाले असते.   

मित्रांनो,

जर रालोआचे सरकार नसते तर आज देखील आमच्या शेतकरी बंधू भगिनींना खतासाठी लाठ्या खाव्या लागल्या असत्या. आज देखील बरौनीचा खत कारखाना बंद पडून राहिला असता. जगातील अनेक देशात खताची जी गोणी 3 हजार रुपयांना मिळत आहे ती आज आम्ही शेतकऱ्यांना 300 रुपयांपेक्षाही कमी भावात देत आहोत. जर रालोआ सरकार नसते तर  युरियाची एक गोणी देखील तुम्हाला 3 हजार रुपयांना मिळाली असती. आमचे सरकार शेतकऱ्यांचा विचार करते, त्यांच्या कल्याणासाठी काम करते, म्हणूच युरिया आणि डीएपीचा जो पैसा शेतकऱ्यांना खर्च करावा लागायचा , तो केंद्र सरकार स्वतः खर्च करत आहे. गेल्या 10 वर्षात सुमारे 12 लाख कोटी रुपये, जे खतांच्या खरेदीसाठी तुमच्या खिशातून जाणार होते, त्यांची बचत झाली. ते केंद्र सरकारने बजेट मधून दिले आहेत. म्हणजे इतक्या जास्त पैशाची, 12 लाख कोटी रुपयांची देशाच्या कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खिशात बचत झाली आहे. 

 

मित्रांनो,

रालोआ  सरकार नसते तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी देखील मिळाला नसता. ही योजना सुरू होऊन आता जवळपास 6 वर्षे झाली आहेत. आतापर्यंत सुमारे  3 लाख 70 हज़ार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत. मध्ये कोणी मध्यस्थ नाहीत, कोणती कपात कंपनी नाही, एक रुपया दिल्लीतून निघाल्यावर 100 पैसे थेट पोहोचतात. तुमच्या सारख्या लहान शेतकऱ्यांना पूर्वी सरकारच्या योजनांचा संपूर्ण लाभ मिळत नव्हता. लहान शेतकऱ्यांचे अधिकार देखील मध्यस्थ म्हणून काम करणारे दलाल हिरावून घेत होते. पण हे मोदी आहेत, नीतीश जी आहेत, जे, शेतकऱ्यांच्या हक्काचे कोणालाही खाऊ देणार नाहीत. ज्यावेळी हे काँग्रेसवाले, जंगलराज वाले सरकारमध्ये होते त्यावेळी या लोकांनी शेतीसाठी जितकी अर्थसंकल्पीय तरतूद केली होती, त्यापेक्षा कितीतरी जास्त पट पैसे तर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पाठवून दिले आहेत. हे काम कोणताही भ्रष्टाचारी करू शकला नसता, हे काम तेच सरकार करू शकते जे शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रति समर्पित आहे.

मित्रांनो,

काँग्रेस असो, जंगलराज वाले असो, यांच्यासाठी तुम्हा शेतकऱ्यांच्या अडचणी महत्त्वाच्या नव्हत्या, पूर्वी जेव्हा पूर यायचे, दुष्काळ पडायचे, गारपीट व्हायची, तेव्हा हे लोक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचे.

2014 मध्ये जेव्हा तुम्ही रालोआला आशीर्वाद दिलात तेव्हा मी म्हटले, असे नाही चालणार. रालोआ सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना संकटाच्या वेळी पावणेदोन लाख कोटी रुपयांचा दावा मिळाला आहे.

मित्रांनो,

जे भूमिहीन आहेत, जे छोटे शेतकरी आहेत त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी रालोआ सरकार पशुपालनाला प्रोत्साहन देत आहे. गावातील आमच्या भगिनींना लखपती दीदी बनवण्यात देखील पशुपालन अत्यंत उपयुक्त ठरत आहे. देशभरात आतापर्यंत जवळजवळ सव्वा कोटी लखपती दीदी तयार झाल्या आहेत. यामध्ये बिहार राज्यातील हजारो जीविका दीदी देखील समाविष्ट आहेत. गेल्या दशकात भारतात 14 कोटी टनांवरून वाढून, लक्षात घ्या, 10 वर्षांत 14 करोड टन दूध उत्पादन वाढून आता 24 कोटी टन दूध उत्पादन होऊ लागले आहे. म्हणजेच भारताने जगातील पहिल्या क्रमांकाच्या दूध उत्पादकाच्या रुपात स्वतःच्या भूमिकेला आणखी मजबूत केले आहे. यामध्ये बिहारचे सुद्धा मोठे योगदान आहे. आज बिहारमध्ये सहकारी दूध संघ दररोज 30 लाख लीटर दूध खरेदी करतो. त्यामुळे बिहारमधील पशुपालकांच्या, आमच्या माता भगिनींच्या बँक खात्यांमध्ये दर वर्षी तीन हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा होत आहे.

 

मित्रांनो,

दुग्धविकास क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या आमच्या प्रयत्नांना राजीव रंजन जी, आमचे ललन सिंह जी अत्यंत कुशलतेने पुढे नेत आहेत हे पाहून मला अत्यंत आनंद होतो. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे येथे, बिहारमध्ये दोन प्रकल्प वेगाने पूर्णत्वाला पोहोचत आहेत. मोतिहारीमधील उत्कृष्टता केंद्र उत्तम देशी वाणाच्या गायींच्या उत्पादनात मदत करेल. दुसरा प्रकल्प आहे बरौनीचा दूध प्रकल्प. या प्रकल्पातून या भागातील 3 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल, तरुणांना रोजगार मिळेल.

मित्रांनो,

आमचे जे नाविक मित्र आहेत, जे मच्छिमार दोस्त आहेत त्यांना आधीच्या सरकारांनी काहीही फायदा मिळवून दिला नाही. आम्ही मत्स्यापालकांना पहिल्यांदाच किसान क्रेडीट कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली.अशाच प्रयत्नांमुळे आज बिहारमध्ये मत्स्यउत्पादन क्षेत्र अप्रतिम कार्य करत आहे. आणि आत्ताच मुख्यमंत्र्यांनी जसे सांगितले, की पूर्वी राज्यात बाहेरून मासे आणावे लागत असत आणि आज माशांच्या बाबतीत बिहार आत्मनिर्भर झाला आहे. आणि मला आठवतेय 2014 पूर्वी, 2013 मध्ये मी जेव्हा निवडणूक प्रचारासाठी येथे आलो होतो तेव्हा मी म्हटले होते की बिहारमध्ये इतके जलाशय असूनदेखील मासे आपण बाहेरून का आणतो आहोत याचे मला आश्चर्य वाटत आहे. आज बिहारच्या लोकांची माशांची गरज बिहारमध्येच पूर्ण होऊ लागली आहे याचे मला समाधान आहे. 10 वर्षांपूर्वी मस्त्यउत्पादनाच्या बाबतीत बिहार देशातील पहिल्या 10 राज्यांपैकी एक होता. आज देशाच्या पहिल्या पाच मासे उत्पादक राज्यांमध्ये बिहारने स्थान पटकावले आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्रावर आम्ही लक्ष केंद्रित केल्याचा फार मोठा फायदा आपल्या छोट्या शेतकऱ्यांना झाला आहे, मच्छिमार मित्रांना झाला आहे. भागलपूर तर गंगामाईत राहणाऱ्या डॉल्फिनमुळे देखील सुप्रसिद्ध आहे. हे नमामि गंगे अभियानाचे देखील फार मोठे यश म्हणता येईल.

मित्रांनो,

गेल्या काही वर्षांमध्ये सरकारच्या प्रयत्नांमुळे भारताची कृषी निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची अधिक किंमत  मिळू लागली आहे. अनेक कृषी उत्पादने तर अशी आहेत ज्यांची निर्यात पहिल्यांदाच सुरु झाली आहे. आता बिहारच्या मखाणा कडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. देशांतील शहरांमध्ये आज मखाणा हा न्याहारीतील लोकप्रिय प्रकार झाला आहे. मी देखील 365 दिवसांपैकी किमान 300 दिवस तरी मखाणा नक्की खातो. हे एक सुपरफूड आहे आणि आता त्याला जागतिक बाजारांमध्ये पोहोचवले पाहिजे. म्हणूनच या वर्षीच्या अर्थसंकल्पात मखाणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मखाणा मंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे मंडळ मखाणा उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणन यांसह अनेक पैलूंबाबत बिहारमधील माझ्या शेतकऱ्यांना सहाय्य करेल.

मित्रांनो,   

बिहारमधील शेतकरी तसेच युवकांसाठी अर्थसंकल्पात आणखी एक महत्त्वाची घोषणा देखील करण्यात आली आहे. पूर्व भारतातील अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी बिहार आता प्रमुख केंद्र म्हणून उदयाला येणार आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान आणि उद्योजकता संस्थेची देखील स्थापना होणार आहे. राज्यात कृषीक्षेत्राशी संबंधित तीन नवी उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक केंद्र आपल्या भागलपूर मध्येच स्थापन करण्यात येणार असून हे केंद्र आंब्याच्या ‘जर्दाळू’ जातीवर अधिक लक्ष केंद्रित करेल. आणखी दोन केंद्रे मुंगेर आणि बक्सर येथे स्थापन होणार असून ही केंद्रे टोमॅटो, कांदा आणि बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना पाठबळ पुरवतील. म्हणजेच शेतकऱ्यांना लाभदायक ठरणारे निर्णय घेण्यात आम्ही कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाही आहोत.

 

मित्रांनो,

आज भारत कपड्यांचा देखील खूप मोठा निर्यातदार होऊ लागला आहे. देशातील वस्त्रोद्योग क्षेत्राला बळकट करण्यासाठी असंख्य पावले उचलण्यात येत आहेत. भागलपूरमध्ये नेहमी असे म्हटले जाते की येथील वृक्षदेखील सोने तयार करतात. भागलपुरी रेशीम आणि टसर सिल्क संपूर्ण भारतात सुप्रसिध्द आहेत. आता इतर देशांतून देखील येथील टसर सिल्कची मागणी वाढत आहे. कापड आणि धागे रंगवणारी युनिट्स, कापडावर छपाई करणारी युनिट्स आणि कापड प्रक्रिया युनिट्स यांच्यासह संपूर्ण रेशीम उद्योगाच्या पायाभूत सुविधा विकासावर केंद्र सरकार अधिक भर देत आहे. यातून भागलपूरमधील विणकर मित्रांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील आणि त्यांची उत्पादने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकतील.

मित्रांनो,

बिहारमधील आणखी एक महत्त्वाची समस्या सोडवण्याचे काम रालोआ सरकार करत आहे. नद्यांवर पुरेशा प्रमाणात पूल उपलब्ध नसल्यामुळे बिहारमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तुम्हाला ये-जा करण्यात अडचण येऊ नये म्हणून आम्ही जलदगतीने काम करत आहोत, अनेक पूल उभारत आहोत. येथे गंगा नदीवर चौपदरी पूल उभारणीचे काम देखील वेगाने सुरू आहे. या प्रकल्पावर 1,100 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात येत आहे.

मित्रांनो,

बिहारमध्ये पुरांमुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. यासाठी देखील आमच्या सरकारने हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.

यावर्षीच्या अर्थसंकल्पात, पश्चिम कोसी कालवा ईआरएम प्रकल्पासाठी मदतीची घोषणाही करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मिथिलांचल प्रदेशातल्या 50 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ज्याचा लाभ लाखो शेतकरी कुटुंबांना होणार आहे.

मित्रांनो,

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी करण्यासाठी विविध स्तरावर काम करते आहे, भारतात उत्पादन वाढीसाठी डाळी आणि तेलबियांमध्ये स्वयंपूर्णता आणण्यासाठी, येथे अधिकाधिक अन्न प्रक्रिया उद्योग उभारावे आणि आपल्या शेतकऱ्यांचे उत्पादन जगभरात पोहोचावे यासाठी सरकार एका पाठोपाठ नवी पाऊले उचलत आहे. माझे स्वप्न आहे की जगभरातल्या स्वयंपाकघरांमध्ये भारतीय शेतकऱ्यांनी पिकवलेले कोणते ना कोणते उत्पादन असावे. या वर्षाच्या अर्थसंकल्पानेही याच दृष्टीकोनाला प्रोत्साहन दिले आहे. अर्थसंकल्पात एक खूप मोठी पीएम धन धान्य योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत देशातल्या अशा 100 जिल्हे, जिथे सर्वात कमी धान्य उत्पादन होते ते ओळखून त्या जिल्ह्यांमध्ये शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष अभियान चालवले जाईल. डाळींमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी अग्रक्रमाने काम केले जाईल. शेतकऱ्यांनी अधिकाधिक डाळींचे उत्पादन घ्यावे, यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. किमान आधारभूत किंमतीवर डाळींच्या खरेदीत वाढ केली जाईल.

 

मित्रांनो,

आजचा दिवस आणखी एका कारणाने विशेष दिवस आहे. आमच्या सरकारने देशातल्या 10 हजार शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) निर्माण करण्याचे मोठे लक्ष्य ठेवले होते. आज मला हे सांगताना आनंद होतो आहे की देशाने ही लक्ष्यपूर्ती केली आहे. आज बिहारची भूमी 10 हजाराव्या शेतकरी उत्पादक संघाच्या निर्मितीची साक्षीदार ठरते आहे. मका, केळी आणि भात यांच्यासाठी काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक संघाची नोंदणी आज खगडिया जिल्ह्यात झाली आहे. एफपीओ म्हणजे केवळ एक संघटना नसून, ती शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणारी अभूतपूर्व ताकद आहे. एफपीओची ही ताकद लहान लहान शेतकऱ्यांना बाजारपेठेचे मोठे फायदे थेट उपलब्ध करून देते. एफपीओच्या मदतीने आज शेतकरी बंधू-भगिनींना अनेक थेट संधी मिळत आहेत, ज्या पूर्वी उपलब्ध नव्हत्या. आज देशातले सुमारे 30 लाख शेतकरी एफपीओशी निगडीत आहेत. आणि सर्वात मोठी बाब म्हणजे यापैकी जवळपास 40 टक्के आमच्या बहिणी आहेत. हे एफपीओ आज कृषी क्षेत्रात हजारो कोटी रुपयांचा व्यवहार करू लागले आहेत. मी सर्व 10 हजार एफपीओच्या सदस्यांचे खूप खूप अभिनंदन करतो.

मित्रांनो,

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार, बिहारच्या औद्योगिक विकासावरही तितकाच भर देत आहे. बिहार सरकार भागलपूरमध्ये खूप मोठ्या वीज कारखान्याची सुरूवात करते आहे, त्यासाठी कोळश्याचा पुरवठा करण्यात येईएल. त्यासाठी केंद्र सरकारने कोल लिंकेज म्हणजेच कोळसा जोडणीला मान्यता दिली आहे. मला विश्वास वाटतो की, इथे निर्माण होणारी वीज, बिहारच्या विकासाला नवीन उर्जा प्रदान कले. त्यामुळे बिहारच्या तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील.

मित्रांनो,

विकसित भारताचा उदय पुर्वेकडून होणार आहे. आणि आपला बिहार पूर्व भारताचा सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. बिहार, भारताच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. काँग्रेस-राजदच्या दीर्घ कुशासनामुळे बिहार उद्ध्वस्त झाले आणि बिहारची बदनामीही झाली. मात्र आता विकसित भारतातमध्ये बिहारचे तेच स्थान असेल जे प्राचीन समृद्ध भारतामध्ये पाटलीपुत्र शहराचे होते. त्यासाठी आपण सर्व मिळून सातत्याने प्रयत्नशील आहोत. बिहारमध्ये आधुनिक संपर्कासाठी, रस्त्यांच्या जाळ्यासाठी, सार्वजनिक कल्याणकारी योजनांसाठी, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार कटिबद्ध राहून काम करत आहे. मिर्झा चौक मार्गे मुंगेर ते भागलपूरपर्यंत सुमारे 5 हजार करोड रुपये खर्चून नवा महामार्ग बांधण्याचे काम सुरू आहे. भागलपूर ते अंशदीहापर्यंत चार पदरी रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामदेखील सुरू होणार आहे. भारत सरकारने विक्रमशीलापासून कटारियापर्यंत नवीन रेल्वे मार्ग आणि रेल पूलला देखील मंजुरी देण्यात आली आहे.

मित्रांनो,

आपले हे भागलपूर, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. विक्रमशीला विद्यापीठाच्या कालखंडात ते जागतिक ज्ञानाचे केंद्र होते. आपण नालंदा विद्यापीठाच्या प्राचीन वैभवाची सांगड आधुनिक भारताशी घालण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. नालंदा विद्यापीठानंतर आता विक्रमशीलामध्येही केंद्रीय विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. लवकरच केंद्र सरकार याविषयी कामाला सुरूवात करणार आहे. मी नीतीशजी, विजयजी, सम्राटजी यांच्यासह बिहार सरकारच्या सर्व चमूचे अभिनंदन करतो. तुम्ही या प्रकल्पाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जलदगतीने काम करता आहात.

 

मित्रांनो,

रालोआ सरकार भारताच्या गौरवशाली वारश्याचे संरक्षण आणि वैभवशाली भविष्य घडवण्यासाठी एकत्रित कार्यरत आहे. मात्र, या जंगलराजवाले लोक आपल्या वारशाचा, आपल्या श्रद्धेचा द्वेष करतात. सध्या, प्रयागराजमध्ये एकतेचा कुंभमेळा होतो आहे. जो भारताच्या आस्थेचा, भारताच्या एकतेचा आणि सौहार्दाचा सर्वात मोठा महोत्सव आहे. संपूर्ण युरोपची जेवढी लोकसंख्या आहे, त्या पेक्षा कितीतरी अधिक लोकांनी आत्तापर्यंत एकतेच्या या कुंभमेळ्यात स्नान केले आहे. बिहारच्या गावागावांतून श्रद्धाळूंनी एकतेच्या कुंभमेळ्याला भेट दिली आहे. पण जंगलराजवाले या कुंभमेळ्याविषयी वाईट बोलतात, शिव्या देतात. राम मंदिराविषयी नाराज असलेले हे लोक कुंभमेळ्याला नावे ठेवण्याची एकही संधी सोडत नाही. मला माहीत आहे की, कुंभमेळ्याला वाईट म्हणणाऱ्या या लोकांना बिहार कधीही माफ करणार नाही.

मित्रांनो,

बिहारला समृद्धीच्या नव्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आपण दिवसरात्र कष्ट करू. पुन्हा एकदा, देशातल्या शेतकरी आणि बिहारवासियांना खूप खूप शुभेच्छा!

माझ्याबरोबर म्हणा-

भारत माता की जय!

भारत माता की जय!

खूप खूप आभार!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India launches ORV Sagar Manthan, boosting ocean research fleet

Media Coverage

India launches ORV Sagar Manthan, boosting ocean research fleet
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister expresses grief over loss of lives in mishap in Nanded
September 11, 2026
Prime Minister announces ex-gratia from PMNRF

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed grief over the loss of lives due to a mishap in Nanded, Maharashtra.

The Prime Minister conveyed his thoughts to the bereaved families in this hour of grief and prayed for the speedy recovery of the injured.

Shri Modi announced that an ex-gratia of Rs. 2 lakh from the Prime Minister’s National Relief Fund (PMNRF) would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000.

In a post on X, the Prime Minister’s Office said;

“Saddened by the loss of lives due to a mishap in Nanded, Maharashtra. My thoughts are with the bereaved families in this hour of grief. Praying for the speedy recovery of the injured.

An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi”