Atal Ji was a stalwart loved and respected across all sections of society: PM Modi
As a speaker, Atal Ji was unparalleled. He is among the best orators our nation has produced: PM: PM Modi
A long part of Atal Ji's career was spent in the opposition benches but he spoke about national interest and never compromised on the ideology of the party: PM
Atal Ji wanted democracy to be supreme: PM Modi

अटलजीआता आपल्यामध्ये नाहीत, ही गोष्ट माझे मन मानायला तयारच होत नाही. राजकारणातली एखादी व्यक्ती आठ-नऊ वर्षे कोणत्याही व्यासपीठावर, कोणत्याही कार्यक्रमामध्ये दिसत नाही, आजारपण, प्रकृती अस्वस्थ्यामुळे सर्व प्रकारच्या सार्वजनिक जीवनातून जणू निवृत्त होवून जाते. तरीही इतक्या वर्षांनंतरही, इतक्या मोठ्या काळानंतर आणि सार्वजनिक जीवनामध्ये एक पिढी पूर्णपणे बदलल्यानंतरही, त्यांना अखेरचा निरोप ज्याप्रकारे संपूर्ण देशाने दिला, त्यांचा ज्याप्रकारे सन्मान केला, देशवासियांनी त्यांना अखेरच्या- निरोपाच्या क्षणी ज्या दुःखद भावना अनुभवल्या ते पाहिल्यानंतर त्यांनी जीवनामध्ये केलेल्या सर्वात  महान तपस्येच्या प्रकाशपूंज रुपाचा अनुभव आपण करू शकतो. अशी घटना फार क्वचित घडते.

संपूर्ण जगामध्ये जेंव्हा राजकीय विश्लेषण केले जाईल, ते कधी ना कधी या गोष्टीचा नक्कीच विस्ताराने विवेचन करतील. सिद्धांताच्या बळावर उभे राहिलेल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही एक सामान्य संघटना आहे आणि त्यामधल्या लहान- लहान लोकांच्या भरवशावर, एका बाजूला संघर्ष करीत राहणे, दुस–या बाजूला संघटनेची बांधणी करत राहणे, तिस-या बाजूला जनसामान्यांना आपल्या विचारांनी आकर्षित करणे, प्रभावित करणे, जनतेची आंदोलने उभी करणे, या सगळ्या गोष्टी करता करताच विटांवर विटा रचून इतकी मोठी, प्रचंड संघटना निर्माण करणे ही गोष्टसामान्य नाही तर आश्चर्यकारक आहे;  आणि कदाचित संपूर्ण जगामध्ये इतका मोठा देश, इतकी मोठी लोकशाही व्यवस्था, एका बाजूला शंभर सव्वाशे वर्षांचे  प्रस्थापित राजकीय व्यासपीठ आणि दुस-या बाजूला एक नवा राजकीय पक्ष आणि इतक्या कमी कालावधीमध्ये देशामध्ये त्‍याचे इतके जबरदस्त प्रभुत्व निर्माण करणे, त्या पक्षाचा इतका प्रचंड विस्तार होणे, संघटनेच्या दृष्टीने संपूर्ण जगातला सर्वात मोठा पक्ष बनवणे, याच्या पायाशी जनसंघाच्या कालखंडामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या कालखंडामध्ये केलेले कार्य आहे. पक्षाच्या सुरवातीच्या वर्षांमध्ये अटलजींसारख्या नेत्यातर्फे संपूर्ण समूहाचे नेतृत्व केले गेले.

खांद्याला खांदा लावून, लहानात लहान कार्यकर्त्‍यांना बरोबर घेवून दुर्गम-अतिदुर्गम भागांमध्ये जावून काम केले गेले. जनतेशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. अटलजींची वाणी काही त्यांची वाणी राहिली नाही. ती एकप्रकारे भारतीय जनता पार्टीचा आवाज बनली, एवढंच नाही, तर या देशामध्ये तीन-चार दशकांच्या काळात असे झाले आहे की, अटलजींची वाणी म्‍हणजे भारताच्या सामान्य माणसाची आशा आणि आकांक्षांची वाणी बनली होती. अटलजी बोलू लागले आहेत, म्हणजेच देश बोलतोय. अटजलजी बोलताहेत म्हणजेच संपूर्ण देश ऐकतोय. अटलजी बोलताहेत म्हणजेच ते काही आपली स्‍वत:ची भावना व्यक्त करताहेत, असे नाही तर देशाच्या जनता जनार्दनाची भावना त्यातून व्यक्त होत आहे. त्यांनी, त्यांच्या वाणीने, भाषेने लोकांना केवळ आकर्षित केलं, प्रभावित केलं.इतकंच नाही, तर लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला. हा विश्वास फक्त शब्द समूह बनून आलेला नव्हता तर त्याच्या मागे पाच-सहा दशकांची प्रदीर्घ जीवन साधना होती. आज राजकीय पक्षांचे नकाशे पाहिले तर चित्र वेगळेच दिसून येते. दोन-पाच वर्षांसाठी जर एखादी व्यक्ती सत्तेच्या बाहेर राहिली तर ती व्यक्ती अगदी बेचैन होऊन जाते. आपल्याविषयी आता विस्मरण झालेलं असणार, आपल्याला कोण ओळखणार, आपली ओळख कशी ठेवली जाणार , यासाठी हात-पाय मारण्याची वेळ येते. काय करावे आणि काय नाही, हे अशा नेत्यांना समजत नाही. इतके त्रासून जातात. मग तो तहसील क्षेत्रातला नेता असो, जिल्हा स्तरावरचा नेता असो , राज्यपातळीवरचा नेतो असो की राष्ट्रीय स्तरावरचा नेता असो.

इतकी वर्षे अगदी एखाद्या तपस्वीप्रमाणे, एखाद्या साधकाप्रमाणे विरोधी पक्षामध्ये बसून, प्रत्येक क्षणी जनसामान्यांचा आवाज बनून कार्यरत राहणे,किती अवघड आहे,याची कल्पना कोणी करू शकते का? अशा प्रकारे जीवन जगणे खरोखरीच सामान्य गोष्ट नाही. राजकीय अस्थिरतेच्या काळात त्यांना कुणी आपल्याबरोबर चला, असं म्हटल असणारच, असे क्षण काय त्यांच्या कठीण काळामध्ये आले नसतील काय? आपल्याशिवाय दुसरे आहेच कोण, या आमच्याकडे, तुम्हाला आम्ही नेता बनवतो, तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला आम्ही हे देतो, ते देतो. असं खूप काही घडले असणार.

याविषयी मला काही माहिती नाही, मी अंदाज करतोय. परंतु मी जे राजकीय चित्र पाहतो आहे, त्यामध्ये हे असं सगळं काही झालं असणार. परंतु ते आतूनच एका वेगळ्याचधातूने बनले होते. त्यांचे विशिष्ट विचारांशी नाते जोडले गेले होते. आणि म्हणूनच त्यांना कोणत्याही प्रकारचा लोभ, हव्यास, प्रलोभन नव्हते. अशा अवस्थांना शरण येण्याचा प्रश्नच उपस्थित झाला नाही. ज्यावेळी देशहित पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली, त्यावेळी त्यांनी त्या गरजेची पूर्तता केली. लोकशाही मोठी की आपली संघटना मोठी, लोकशाही मोठी की आपला पक्ष मोठा, लोकशाही मोठी की आपले नेतृत्व मोठे, अशी  कसोटीची वेळ आली त्यावेळी या महान दृष्ट्या, दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचे सामर्थ्‍य  लक्षात आले. त्यांनी लोकशाहीला प्राधान्य दिले आणि पक्षाची आहुती दिली. ज्या जनसंघाला आपला घाम गाळून, प्रसंगी रक्त सांडून मोठे केले होते, अशा जनसंघाला कोणतीही अपेक्षा न ठेवता जनता पार्टीमध्ये विलीन करण्यात आले. या महत्वाच्या निर्णयामागे फक्त आणि फक्त एकच उद्देश होता, तो म्हणजे लोकशाही अमर राहिली पाहिजे.

आपण असू अथवा नसूही परंतु त्यांनी त्यावेळी हे करून दाखवले आहे. आणि जनता पार्टीमध्ये सिद्धांताच्या नावाखाली ज्यावेळी उणीदुणी काढण्यास प्रारंभ झाला, लोकशाहीसाठी, देशासाठी असलेल्या उपयोगितेचा विचार करणे संपुष्टात आले, कट कारस्थाने रचली जावू लागली. त्यावेळी त्यांनी अगदी हात जोडून, नमस्कार करून स्पष्टपणे सांगितले की, आपण निवडलेला मार्ग आपल्याला योग्य ठरो. आम्ही मूल्यांशी, तत्वांशी तडजोड करून समाधान मानणारे लोक नाही. आम्ही देशासाठी मृत्यू पत्करू शकतो. परंतु स्वतःला हवी तशी, मनाला वाट्टेल ते करणे आमच्या तत्वामध्ये बसत नाही. असे बेगडी, खोटे समाधान करून घेणारे आम्ही लोक नाही. असं स्पष्ट सांगून ते तिथून बाहेर पडले. पुन्हा एकदा कमळाचे बीज लावण्यात आलं. आणि आज संपूर्ण हिंदुस्तानाच्या कानाकोप-यामध्ये कमळ फुलल्याचा अनुभव आपण घेत आहोत. त्यांच्या दूरदृष्टीने हे पाहिले होते. अंधकार बाजूला सरून सूर्योदय नक्की होणार आणि कमळ छान फुलणार. आता तर एका पक्षाने जन्म घेतला आहे. जन्म होवून काही तास सुद्धा झालेले नाहीत.

त्यावेळी त्यांना किती प्रचंड आत्मविश्वास असेल. भारताच्या जनसंघावर किती मोठा विश्वास असेल. आपले विचार, आपली साधना, आपली तपस्या, आपले कार्यकर्ते, त्यांचा पुरुषार्थ, पराक्रम यांच्यावर जणू त्यांची खूप मोठी श्रद्धा होती. एका व्यक्तीच्या तोंडून एक वाक्य निघते की,‘ ‘अंधकार जावून, सूर्योदय होणार, कमळ फुलणार’’ आणि  त्यांची ही भविष्यवाणी म्हणा किंवा त्यांचा आतला आवाज, मनातून निघालेला एक संदेश म्हणा, जे काही होते, त्याचा आपण आज अनुभव घेत आहोत.

राष्ट्र जीवनामध्ये असलेल्या विविधतेकडे पाहिल्यानंतर मला वाटते की हा आपला गौरव वाढवण्यासाठी एक मोठे योगदान देणारा विषय आहे. परंतु ही विविधता अशीच कायम टिकवण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. राजकीय विचार आणि राजकीय नेतृत्व यांच्यातली विविधता सुद्धा भारतासाठी आणि भारताची एक शक्ती आहे. ही विविधता भारताचे मूल्यवर्धनाचे कार्य करते आहे.

एकाच प्रकारचे नेता, एकाच प्रकारची विचारसरणी, एकाच प्रकारचे चालणे-बोलणे, हे काही भारताच्या विविधतेमध्ये बसणारे चित्र नाही. आपण सर्वजण असेच वेगवेगळ्या विचारधारांमध्ये लहानाचे मोठे झालो आहोत. ज्यांनी ज्यांनी देशासाठी काही दिलं, ज्या-ज्या भागांतून नेतृत्व पुढे आले, कट्टरवादाचे वाद झाले, अनेकजण एकमेकांसमोर उभे राहिले असतील. एक-दुस-यांवर मात करण्यासाठी त्‍यांनी संपूर्ण आयुष्य खपवले असेल. तरीही सगळेजण या देशासाठी जगले आहेत. ही संपूर्ण भारताची विविधता आहे. आणि नेतृत्वाची शक्तीही मूल्यवर्धन करणारी आहे. अटलजी या सगळ्यांमधलेच एक आहेत. त्या विविधतेला मोठे करणारे एक विविधतापूर्ण व्यक्तित्व त्यांचे होते. भारताच्या राष्ट्र जीवनात, भारताच्या सामाजिक जीवनामध्ये, भारताच्या राजकीय जीवनामध्ये त्यांनाही योग्य स्थान उपलब्ध झाले पाहिजे. असेच स्थान अनेक नेत्यांना उपलब्ध झाले पाहिजे. याच गोष्टी देशाला समृद्ध करतात. आपल्या भावी पिढीला प्रेरणा देणा-या  याच गोष्टी आहेत. नवीन पिढीला आपण कोणत्या रस्त्याने गेले पाहिजे, या मार्गाने जावे की त्या दिशेने वाटचाल करावी, याचा लेखाजोखा मांडण्याची संधी यामुळेच मिळणार आहे.

आणि मला विश्वास आहे की, अटलजींचे जीवन पाहिले की जाणवते, भावी पिढींसाठी सार्वजनिक जीवन कसे असावे, व्यक्तिगत जीवन कसे असावे, राष्ट्र कार्य करताना जीवनामध्ये समर्पणाचे भाव कसे असावेत, हे सांगणारे ‘वन लाईफ वन मिशन’ याच्याशी प्रामाणिक राहून कसे काम केले जावू शकते, याचे आदर्श दर्शन देणारे अटलजींचे आयुष्य होते. त्यांचे जीवन नेहमीच, सदोदित प्रेरणा देत राहणार आहे.अटलजींना अंतिम निरोप दिल्यानंतर उद्या त्यांचा पहिलाच जयंती दिन येत आहे. आणि त्याआधी एक दिवस, आज भारत सरकारच्या वतीने त्यांच्या स्मृत्यर्थ 100 रूपयांचे नाणे काढण्यात आले आहे. आज आपल्या सर्वांमध्ये, देशवासियांमध्ये अटलजींची स्मृती म्हणून हे नाणे काढण्याची संधी मला मिळाली आहे. मला हे 100 रूपयांचे नाणे काही फक्त एक नाणे वाटत नाही, कारण अटलजींच्‍या नावाचे नाणे आमच्या हृदयावर गेल्या पन्नास वर्षांपासून राज्य करत आहे. आणि त्यांच्या नावाचे हे हृदयावर कोरलेले नाणे असेच जीवनाखेरपर्यंत आमच्या आयुष्यभर चालत राहणार आहे. आणि म्हणूनच ज्यांचे जीवनही एक नाणे बनून आम्हाला आयुष्यभर चालणार आहे, आम्हा लोकांना प्रेरणा देत राहणार आहे, त्याला आज एका धातूच्या नाण्याच्या रूपाने चिरंजीव करण्याचा एक अल्पसा प्रयत्न करीत आहोत. हा सुद्धा अटलजींविषयी आदर व्यक्त करण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न आहे. आणि हे करताना आम्हा सर्वांना एक आत्मिक आनंदाचा अनुभव येत आहे.

उद्या, 25 डिसेंबर, अटलजींचा जयंतीदिन आहे. सदैव अटल, राहिलेल्या या नेत्याच्या स्मृती स्थळी उद्या जावून, राजघाट जवळच आपल्या सर्वांना अटलजी नसताना एक एक क्षण घालवायचा आहे. त्यावेळी हे स्मृती स्थळ आपल्यालाही सदैव ‘अटल’ बनवेल. आणि व्यक्तिच्या जीवनामध्ये ‘अटल’बनून राहणे किती शक्तिमान बनणे असते हे समजणार आहे. तितकेच राष्ट्र जीवन आणि समाज जीवनामध्येही सदैव ‘अटल’ राहणे, हाच आमच्यासाठी संकल्प असणार आहे.

याच संकल्पाचा आपण उद्या पुन्हा एकदा तिथं पुनरूच्चार करणार आहोत. आपण स्वतःलाच समर्पित करणार आहोत. आणि त्याच ‘अटल’ भावनेला उराशी बाळगून, त्याच ‘अटल’ विश्वासाने, तीच ‘अटल’ स्वप्ने घेवून, तोच ‘अटल’ चरैवेती, चरैवेतीचा मंत्र घेवून, जन सामान्यांसाठी काही ना काही करण्याचा संकल्प घेवून वाटचाल करणार आहोत. या भावनेबरोबरच आज सर्वांचे अगदी हृदयापासून आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण वेळ काढून इथे  आले आहात. आपण सर्वांनी अटलजींना वेगळे स्थान दिले आहे. ज्यांनी अटलजींना आपल्या मनामध्ये स्थान दिले आहे, त्‍यांनी अटलजींना जे अभिप्रेत होते, ते पूर्ण करण्यासाठी आता कोणतीही कमतरता ठेवायची नाही. या भावनेबरोबरच मी अटलजींना आदरपूर्वक वंदन करतो. खूप- खूप धन्यवाद!!

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India leads globally in renewable energy; records highest-ever 31.25 GW non-fossil addition in FY 25-26: Pralhad Joshi.

Media Coverage

India leads globally in renewable energy; records highest-ever 31.25 GW non-fossil addition in FY 25-26: Pralhad Joshi.
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister expresses joy on the commencement of 20th Session of UNESCO’s Committee on Intangible Cultural Heritage in India
December 08, 2025

The Prime Minister has expressed immense joy on the commencement of the 20th Session of the Committee on Intangible Cultural Heritage of UNESCO in India. He said that the forum has brought together delegates from over 150 nations with a shared vision to protect and popularise living traditions across the world.

The Prime Minister stated that India is glad to host this important gathering, especially at the historic Red Fort. He added that the occasion reflects India’s commitment to harnessing the power of culture to connect societies and generations.

The Prime Minister wrote on X;

“It is a matter of immense joy that the 20th Session of UNESCO’s Committee on Intangible Cultural Heritage has commenced in India. This forum has brought together delegates from over 150 nations with a vision to protect and popularise our shared living traditions. India is glad to host this gathering, and that too at the Red Fort. It also reflects our commitment to harnessing the power of culture to connect societies and generations.

@UNESCO”