इंडोनेशियाच्या अध्यक्षतेखाली बाली येथे 14 ते 16 नोव्हेंबर 2022 दरम्यान आयोजित G20 नेत्यांच्या 17 व्या परिषदेत सहभागी होण्यासाठी मी बाली येथे जातो आहे.
बाली येथे होणाऱ्या शिखर परिषदेत, जागतिक विकासाला नवसंजीवनी देणे, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, पर्यावरण, आरोग्य आणि डिजिटल परिवर्तन अशा जागतिक स्तरावरील महत्वाच्या मुद्द्यांवर G-20 देशांच्या नेत्यांशी मी विस्तृत चर्चा करणार आहे. याशिवाय G -20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर या परिषदेत सहभागी होणाऱ्या इतर राष्ट्रांच्या प्रमुखाना देखील भेटणार असून संबंधित राष्ट्रांसोबतच्या भारताच्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार आहे. 15 नोव्हेंबर 2022 रोजी बाली येथे, तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधायलाही मी उत्सुक आहे.
बाली येथील परिषदेच्या समारोप प्रसंगी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो भारताला G-20 परिषदेचे अध्यक्षपद सोपवतील, हा आपल्या देशासाठी आणि नागरिकांसाठी एक महत्त्वाचा क्षण असेल. 1 डिसेंबर 2022 पासून भारत अधिकृतपणे G-20 परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या G-20 परिषदेसाठी मी G-20 सदस्यांना भारतात येण्यासाठी वैयक्तिक आमंत्रण देणार आहे.
G-20 परिषदेत माझ्या संवादादरम्यान मी भारताची कामगिरी आणि जागतिक आव्हानांचा मुकाबला एकत्रितपणे करण्यासाठीची भारताची वचनबद्धता या बाबींना विशेष प्राधान्य देणार आहे. भारताचे G-20 परिषदेचे अध्यक्षपद "वसुधैव कुटुंबकम" किंवा "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य" या संकल्पनेवर आधारित असेल; ही संकल्पना सर्वांसाठी समान विकास आणि सामायिक भविष्याचा संदेश अधोरेखित करते.


