स्वामी विवेकानंद खऱ्या अर्थाने भारताच्या आत्म्याचे प्रतीक होते: पंतप्रधान
भारताची युवा पिढी जागतिक विकासाला देत आहे चालना : पंतप्रधान
स्वामी विवेकानंदांचे भारताविषयीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील मैसुरू येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र - विवेक स्मारकाचे उद्घाटन केले. उपस्थित मान्यवर आणि नागरिकांच्या विशाल जनसमुदायाला अभिवादन करून पंतप्रधानांनी शहराची अधिष्ठात्री देवता असलेल्या देवी चामुंडेश्वरीला आदराने वंदन केले.

आपल्या स्वतःच्या गहन आध्यात्मिक मुळांचा संबंध रामकृष्ण मिशनच्या शिकवणीशी जोडून पंतप्रधानांनी या संस्थेच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून ते आजच्या जबाबदाऱ्यांपर्यंतच्या त्यांच्या वैयक्तिक प्रवासावरील प्रभाव अधोरेखित केला . “तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे आज मैसुरूच्या या पवित्र भूमीवर मला एका खूप वेगळ्या आणि शक्तिशाली ऊर्जेचा अनुभव येत आहे,” असे मोदी म्हणाले.

राष्ट्राच्या सांस्कृतिक जाणिवेचे शाश्वत केंद्र म्हणून या शहराची प्रशंसा करताना पंतप्रधानांनी भव्य राजवाडे, उत्साही सण आणि ऐतिहासिक परंपरा यांचा समावेश असलेल्या समृद्ध वारशाच्या निर्दोष जतनाची प्रशंसा केली. “भारताचा वारसा या शहराच्या प्रत्येक कणात खोलवर रुजलेला आहे आणि तो किती कुशलतेने जतन व सुशोभित केला गेला आहे, हे पाहून प्रचंड समाधान वाटते,” असे मोदी म्हणाले.

‘विवेक स्मारक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, नव्याने उद्घाटन झालेल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्राच्या वारशाबद्दल समाधान व्यक्त करत पंतप्रधानांनी महान संन्यासी, कुवेंपूंसारखे स्थानिक विद्वान आणि शहराचा बौद्धिक इतिहास यांच्यातील सखोल ऐतिहासिक संबंधांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. “या ऐतिहासिक केंद्राच्या उद्घाटनाद्वारे आपण या महान अभियानाचा सक्रियपणे नवीन विस्तार करत आहोत,” असे मोदी म्हणाले.

सामान्य व्यक्तीचे असामान्य व्यक्तिमत्त्वात रूपांतर होण्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर आध्यात्मिक साधनेचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, साधकाच्या तपश्चर्येच्या प्रारंभीच्या काळात त्याला ओळखून साथ देणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. “जी व्यक्ती एखाद्या साधकाला त्याच्या तपश्चर्येच्या काळात ओळखते तीच पुढे त्याच्या आध्यात्मिक सिद्धीचा महत्त्वाचा सहकारी ठरते ,” असे मोदी म्हणाले.

इतिहासातील एका महत्त्वपूर्ण प्रसंगाचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी सांगितले की, 130 वर्षांहून अधिक काळापूर्वी तत्कालीन मैसूरच्या महाराजांनी एक तरुण, तुलनेने अपरिचित परिव्राजक संन्याशाची असामान्य क्षमता ओळखून त्यांना पाठबळ दिले होते. या निर्णायक सहकार्याबद्दल स्वामी विवेकानंदांनी नंतर अमेरिकेतून अत्यंत कृतज्ञतेने उल्लेख केला होता. “त्या काळात, जेव्हा त्यांची कीर्ती अद्याप सर्वदूर पोहोचली नव्हती, तेव्हा ज्यांनी त्यांची प्रतिभा ओळखली त्यामध्ये तत्कालीन महाराजांचे नाव विशेषत्वाने घेतले जाते,” असे त्यांनी सांगितले.

रामकृष्ण आश्रमाच्या मूलभूत तत्त्वज्ञानाची सांगड स्वामी विवेकानंदांच्या निःस्वार्थ सेवाभावाच्या विचारांशी घालत पंतप्रधानांनी शिक्षण, आरोग्यसेवा आणि आपत्ती निवारण क्षेत्रातील आश्रमाच्या शतकभरातील कार्याचे कौतुक केले. “जो इतरांसाठी पूर्णपणे जगतो, तोच खऱ्या अर्थाने जगतो. याच मंत्राचे पालन करत आश्रमाने आपल्या गौरवशाली 100 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे,” असे त्यांनी नमुद केले.

नव्याने उद्घाटन झालेल्या स्मारकाच्या भावी कार्याची दिशा स्पष्ट करताना पंतप्रधानांनी संस्थेला असे युवक घडविण्याचे आवाहन केले, जे स्वतःच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा राष्ट्रसेवा आणि वंचितांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देतील. “आपल्याला येथे असे युवक घडवायचे आहेत, ज्यांच्यासाठी भारतमातेची सेवा आणि गरीबांचे दुःख दूर करणे हेच जीवनाचे सर्वोच्च ध्येय असेल,” असे ते म्हणाले.

स्वामी विवेकानंदांच्या काळातील पराधीन भारतीय युवकांची परिस्थिती आणि आज जगभरात ठसा उमटवणाऱ्या भारतीय युवकांची तुलना करताना पंतप्रधानांनी सांगितले की, स्वामी विवेकानंदांनी युवकांचे शिक्षण हे राष्ट्रनिर्मितीचा सर्वात भक्कम पाया मानले होते. “जे भारतीय युवक कधीकाळी गुलामगिरीच्या बेड्यांत जखडले गेले होते, तेच आज संपूर्ण जगाच्या विकासाला विलक्षण गती देत आहेत,” असे मोदी यांनी अधोरेखित केले.

युवकांच्या नेतृत्वाखाली देशाने साध्य केलेल्या तांत्रिक आणि आर्थिक प्रगतीचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी सांगितले की, जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था आणि दुसरी सर्वात मोठी मोबाईल उत्पादन क्षमता निर्माण करण्यात युवकांचेच योगदान निर्णायक ठरले आहे. “आज भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, डीप टेक, अवकाश तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रांमध्ये आपल्या युवकांच्या सामर्थ्याच्या बळावर गौरवशाली नवे अध्याय लिहित आहे,” असे ते म्हणाले.

अलीकडेच अवकाश क्षेत्रात नोंदविण्यात आलेल्या ऐतिहासिक टप्प्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी खासगी क्षेत्राने विकसित केलेल्या रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाचे कौतुक केले. हे राष्ट्राच्या डिजिटल आणि उत्पादन क्षेत्रातील क्रांतीला मिळालेल्या वेगाचे प्रभावी उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. “आत्मनिर्भर भारत असो किंवा `मेक इन इंडिया` अभियान, त्यांच्या यशामागील खरी प्रेरक शक्ती म्हणजे भारताच्या युवकांचे सामर्थ्य आहे,” असे गौरवोद्गार मोदी यांनी काढले.

देशाच्या लोकसंख्येतील तरुणांचे प्रमाण ही मोठी ताकद असल्याचे नमूद करत, या लोकसंख्यात्मक लाभाचे प्रभावी रूपांतर करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. योग्य संधी, स्पष्ट दिशा आणि सक्षम शैक्षणिक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यासच तरुणांची क्षमता राष्ट्रीय शक्तीत रूपांतरित होते, असे ते म्हणाले. तरुणांना आपल्या मातीत राहून मोठी स्वप्ने पाहण्याचा संपूर्ण आत्मविश्वास मिळाल्यानंतरच त्यांची क्षमता ही त्या राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती होते, असे प्रतिपादन मोदी यांनी केले.

उच्च शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये गेल्या दशकात झालेल्या अभूतपूर्व विस्तारावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी आकडेवारी सादर केली. या काळात देशात 650 हून अधिक नवीन विद्यापीठे, 14 हजार महाविद्यालये, भारतीय व्यवस्थापन संस्था आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांसारख्या अनेक अग्रगण्य शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, एमबीबीएसच्या जागांची संख्या जवळपास दुपटीने वाढून ती 1 लाख 40 हजारांच्यावर पोहोचल्याचेही त्यांनी नमूद केले. आज देशभरात शैक्षणिक संस्थांची एकूण संख्या सातत्याने आणि वेगाने वाढत असल्याचा मला आनंद आहे, असे ते म्हणाले.

शैक्षणिक व्यवस्थेच्या सर्वांगीण आधुनिकीकरणाचा आढावा घेत पंतप्रधानांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे कौतुक केले. या धोरणाद्वारे 21 व्या शतकाच्या गरजांनुसार शिक्षण व्यवस्थेत आवश्यक बदल केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे आपण शैक्षणिक पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण करत आहोत, तर त्याचवेळी संपूर्ण शिक्षण व्यवस्था आधुनिक गरजांनुसार घडवत आहोत, असे ते ठामपणे ते म्हणाले.

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणातील परिवर्तनाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी देशभरात 14 हजारहून अधिक पीएम श्री शाळा विकसित करण्यात आल्याचे तसेच विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून वैज्ञानिक नवोन्मेषाची वृत्ती विकसित करण्यासाठी 10 हजार अटल टिंकरिंग लॅब्स स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. शिक्षण केवळ पुस्तकांपुरते मर्यादित राहता कामा नये, मुलांमध्ये नवोन्मेषाची वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सक्रियपणे विकसित होईल, याची आपण खात्री केली पाहिजे, असे मोदी यांनी सांगितले.

स्वामी विवेकानंद यांच्या समतेच्या विचारांचा आधुनिक शैक्षणिक सुधारणांशी संबंध जोडत पंतप्रधानांनी शिक्षणातील भेदभावाच्या अडथळ्यांचे पद्धतशीरपणे निर्मूलन करण्यात आल्याचे सांगितले. मुलींना सैनिक शाळा आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय तसेच मातृभाषांमध्ये व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याच्या क्रांतिकारी उपक्रमाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

शिक्षण आणि संधी यांच्या बाबतीत कोणताही भेदभाव असू नये, ही आज देशाची एकसंघ आणि ठाम भूमिका झाली आहे, असे मोदी यांनी नमूद केले. व्यक्तिमत्त्व घडविण्यात शारीरिक तंदुरुस्ती आणि शिस्त यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करत पंतप्रधानांनी खेलो इंडिया स्पर्धांसारख्या व्यापक उपक्रमांद्वारे देशात क्रीडा संस्कृतीला सक्रियपणे प्रोत्साहन दिले जात असल्याचे सांगितले.

आज राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून क्रीडेला अधिकृत मान्यता देऊन त्याला सक्रियपणे प्रोत्साहन दिले जात असल्याचे मोदी यांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या मोठ्या विस्ताराचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशाचा संबंध स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाच्या जागतिक क्रीडा कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली असून त्यामागे विशेषतः लहान शहरांमधून पुढे आलेल्या खेळाडूंचे मोठे योगदान आहे. “आपले उत्कृष्ट खेळाडू नवे विक्रम प्रस्थापित करत आहेत आणि आपल्या कन्या देशाचा गौरव सातत्याने वाढवत आहेत,” असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

नुकत्याच उद्घाटन झालेल्या विवेक स्मारकाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी युवकांना समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. “स्वामी विवेकानंदांप्रमाणेच हे विवेक स्मारकही आपल्याला व्यापक उद्दिष्टासाठी अखंड कार्य करण्याची प्रेरणा देते,” असे नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

देशातील स्वच्छ शहरांमध्ये सातत्याने स्थान मिळवल्याबद्दल शहराचे कौतुक करताना पंतप्रधानांनी पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारणासाठी नागरिकांनी ध्येयवादी पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले. “पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी आपण मिशन मोडमध्ये काम केले पाहिजे,” असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

वाल्मिकी रामायणाच्या कन्नड भाषांतराच्या प्रकाशनाचे स्वागत करत पंतप्रधानांनी युवकांना स्मार्टफोनच्या आहारी न जाता राज्याच्या समृद्ध साहित्यिक परंपरेशी पुन्हा जोडण्याचे आवाहन केले. “आपण नव्या पिढीला मोबाईलच्या पडद्यापासून दूर नेऊन आपल्या समृद्ध कन्नड साहित्याशी जोडण्यासाठी प्रेरित करू शकतो का?” असा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.

‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेला प्रोत्साहन देत पंतप्रधानांनी नागरिकांना भेटवस्तू देताना स्थानिक हस्तकला, रेशीम आणि चंदनाच्या उत्पादनांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. “भारतीय कारागिरांच्या कष्टातून तयार झालेल्या वस्तू भेट म्हणून दिल्यास आपल्या संस्कृतीला चालना मिळेल आणि स्थानिक कुटुंबांनाही आर्थिक बळ मिळेल,” असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

भाषणाच्या शेवटी पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंदांच्या राष्ट्रदृष्टीची पूर्तता करण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर असल्याचे सांगितले. विवेक स्मारक युवकांना सातत्याने प्रेरणा देणारे ऊर्जास्थान ठरेल, असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले, “मला ठाम विश्वास आहे की, विवेक स्मारक आजच्या पिढीला ही महान जबाबदारी पार पाडण्यासाठी सातत्याने प्रेरणा आणि ऊर्जा देत राहील.”

संपूर्ण भाषणाचा मजकूर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'BRICS 2026 becomes major Bharat achievement for PM Narendra Modi'

Media Coverage

'BRICS 2026 becomes major Bharat achievement for PM Narendra Modi'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 सप्टेंबर 2026
September 15, 2026

A Mandate of Performance: Civic Wins, IPO Surge and Neighbourly Power Reflect Faith in PM Modi’s Leadership