विकसित भारतच्या प्रवासाला गती देण्यात तरुण महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत: पंतप्रधान
रोजगार मेळावा हा तरुणांना नव्या संधी देऊन सक्षम करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची साक्ष आहे: पंतप्रधान
भारताची तरुण लोकसंख्या आणि तांत्रिक प्रगतीमुळे जगभरात प्रचंड उत्सुकता; आज जागतिक समुदाय भारताच्या विकास प्रवासात भागीदार होण्यासाठी उत्सुक: पंतप्रधान
स्वच्छ ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि शाश्वत उत्पादन या क्षेत्रांमध्ये वेगाने प्रगती; या क्षेत्रांमधील भागीदारीमुळे नव्या अर्थव्यवस्थेची आणि रोजगाराची दारे उघडत आहेत: पंतप्रधान
वर्ष 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी प्रत्येक भारतीयाचा ठाम संकल्प; देशातील विविध क्षेत्रांमधील गुंतवणुकीमुळे तरुणांसाठी कोट्यवधी नव्या रोजगाराची निर्मिती: पंतप्रधान
आज, ग्रामीण भागातील जलद परिवर्तन स्पष्टपणे दिसत आहे; वाढत्या संपर्क व्यवस्थेमुळे शेतकरी, लहान व्यापारी आणि विद्यार्थ्यांसाठी नवे मार्ग खुले: पंतप्रधान
भारताचे तरुण आज जागतिक पातळीवर प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहेत; हीच ऊर्जा आणि भावना सार्वजनिक सेवेतही दिसली पाहिजे: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे 19 व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हा दिवस देशभरातील हजारो तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सरकारी सेवेत नव्याने रुजू झालेल्या सर्व तरुणांचे स्वागत करताना पंतप्रधानांनी रेल्वे, बँकिंग, संरक्षण, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांतील भारताच्या विकासात हे तरुण लवकरच महत्त्वपूर्ण योगदान देतील, यावर त्यांनी भर दिला. येत्या काळात तुम्ही सर्वजण विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहात, असा ठाम विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी नवनियुक्त उमेदवारांनी घेतलेले परिश्रम आणि केलेल्या कठोर तयारीचा गौरव करत, पंतप्रधानांनी सर्वांचे मनापासून अभिनंदन केले. कोणतेही यश हे एकट्याचे नसते हे लक्षात घेऊन, त्यांनी उमेदवारांच्या कुटुंबियांना आणि पालकांनाही शुभेच्छा दिल्या, त्यांचा पाठिंबा या प्रवासात अत्यंत मोलाचा ठरला. नुकत्याच पूर्ण झालेल्या पाच देशांच्या राजनैतिक दौऱ्यातील आपले अनुभव सांगताना पंतप्रधान म्हणाले की, डझनाहून अधिक देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जागतिक कंपन्यांच्या प्रमुखांनी भारताचे तरुण आणि भारताच्या तांत्रिक प्रगतीबद्दल प्रचंड उत्सुकता दाखवली. भारताच्या या विकासात सहभागी होण्यासाठी जग अत्यंत उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक समुदायाला भारताच्या विकास प्रवासाचा एक भाग व्हायचे आहे, असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी यावेळी काढले.

या दौऱ्याच्या राजनैतिक आणि आर्थिक परिणामांवर सविस्तर बोलताना, पंतप्रधानांनी भेट दिलेल्या प्रत्येक देशासोबत झालेले क्षेत्रनिहाय करार आणि संवादाची रूपरेषा मांडली. यामध्ये नेदरलँड्ससोबत सेमीकंडक्टर्स, पाणी, शेती आणि प्रगत उत्पादन यावर चर्चा; स्वीडनसोबत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल इनोव्हेशनच्या क्षेत्रातील सहकार्याबद्दल चर्चा; नॉर्वेसोबत हरित तंत्रज्ञान आणि सागरी सहकार्यावरील चर्चा; युएईसोबत धोरणात्मक ऊर्जा आणि तंत्रज्ञान भागीदारीबाबतचे सामंजस्य करार; आणि इटलीसोबत संरक्षण, महत्त्वाची खनिजे तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांवरील करारांचा समावेश होता. भारताची ही आंतरराष्ट्रीय भागीदारी विशेषतः इथल्या तरुणांच्या कल्याणासाठीच तयार करण्यात आली आहे, हे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. भारताच्या तरुणांना रोजगार आणि जागतिक पातळीवर संधी मिळावी, हाच यामागचा उद्देश आहे, असा ठाम विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

प्रत्येक कराराचा रोजगार निर्मितीशी असलेला थेट संबंध स्पष्ट करताना पंतप्रधानांनी भर दिला की, प्रत्येक नवीन गुंतवणूक, प्रत्येक तंत्रज्ञान भागीदारी आणि प्रत्येक औद्योगिक सहकार्य अंतिमतः भारताच्या तरुण पिढीसाठी नव्या संधी निर्माण करते. या सहकार्याचे दीर्घकालीन महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, हे असे क्षेत्र आहेत जे पुढील 25 वर्षांतील जागतिक विकासाला दिशा देणाऱ्या उद्योगांना आकार देतील. एक विश्वासू जागतिक पुरवठा साखळी भागीदार म्हणून भारताचे वाढते महत्व दर्शवणारे ठोस उदाहरण म्हणून एएसएमएल-टाटा इलेक्ट्रॉनिक्स कराराचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितले की, नेदरलँड्सच्या या आघाडीच्या सेमीकंडक्टर कंपनीने ज्या काही मोजक्या देशांसोबत करार केला आहे, त्यात भारताचा समावेश आहे.

ते म्हणाले की, एआय (AI) संदर्भात स्वीडनसोबतची भागीदारी आणि सुपरकंप्युटिंग संदर्भात संयुक्त अरब अमिरातीसोबत सहकार्य यामुळे भारताची तंत्रज्ञान क्षमता अधिक बळकट होणार  आहे. “ एएसएमएल-टाटा इलेक्ट्रॉनिक्स दरम्यानचा हा एक करार भारतात हजारो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करेल,” असे मोदी म्हणाले.

स्वच्छ ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे, हरित हायड्रोजन आणि शाश्वत उत्पादन ही प्रचंड संधींची क्षेत्रे म्हणून वेगाने  वाढत असल्याचे अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी नमूद केले की, हरित संक्रमण आणि शाश्वत तंत्रज्ञानामध्ये स्वीडन, नॉर्वे आणि इटलीसोबत वाढणारे सहकार्य  भविष्यातील स्वच्छ उत्पादन उद्योगांमध्ये भारताचे स्थान मजबूत करतील.  “या भागीदारी एका नवीन अर्थव्यवस्थेची आणि नवीन संधींची दारे उघडत आहेत,” असे  मोदी यांनी सांगितले.

बंदरे, जहाजबांधणी आणि सागरी पायाभूत सुविधा करारांवरील कामाला गती मिळाल्याचे नमूद करत, पंतप्रधानांनी सांगितले की, संयुक्त अरब अमिरात आणि नॉर्वेसोबतची भागीदारी भारताच्या जहाजबांधणी परिसंस्थेला अधिक मजबूत करेल, ज्यामुळे देशातील अभियंते, तंत्रज्ञ आणि कुशल कामगारांसाठी संधींची क्षितिजे आणखी  विस्तारतील. “भारताचे अभियंते, तंत्रज्ञ आणि कुशल कामगारांसाठी नवीन संधी निर्माण होतील,” असे मोदींनी ठामपणे सांगितले.

प्रत्येक नवीन भागीदारी भारतीय स्टार्टअप्स, संशोधक आणि तरुण व्यावसायिकांसाठी जगाशी जोडले जाण्याचे मार्ग आणखी विस्तारतात  असे नमूद करत पंतप्रधानांनी अशा जगाचा उल्लेख केला जे आज मोठ्या प्रमाणावर नवोन्मेष , निर्मिती आणि वितरण करणाऱ्या देशांचा  आदर करते. भारत या तिन्ही आघाड्यांवर प्रगती करत असल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. “या परिवर्तनामागील सर्वात मोठी शक्ती भारताची युवा  पिढी आहे , तुम्ही सर्वजण आहात,” असे  मोदी म्हणाले.

या क्षणाला व्यापक राष्ट्रीय अभियानाशी जोडून, पंतप्रधानांनी 2047पर्यंत 'विकसित भारत' घडवण्याच्या सामूहिक संकल्पाची आठवण करून दिली.  तसेच, या महत्त्वाकांक्षेचा थेट परिणाम म्हणून सरकारच्या विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीमुळे नवीन रोजगाराच्या लाखो  संधी निर्माण होत असल्याचे  प्रतिपादन त्यांनी केले. “या गुंतवणुकीमुळे देशातील तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या लाखो  संधी निर्माण होत आहेत,” असे मोदी म्हणाले.

भारताच्या उदयोन्मुख सेमीकंडक्टर परिसंस्थेच्या व्याप्तीची माहिती देताना पंतप्रधानांनी घोषणा केली की, सेमीकंडक्टर उत्पादनासाठी एक संपूर्ण देशांतर्गत पुरवठा साखळी स्थापित केली जात आहे आणि दहा प्रमुख सेमीकंडक्टर युनिट्स लवकरच जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करतील, ज्यामध्ये मोठ्या संख्येने तरुण भारतीयांना आधीच रोजगार मिळाला आहे. “भारताची सेमीकंडक्टर युनिट्स जगात आपली ओळख निर्माण करतील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

सुमारे 75,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे  भारताच्या विस्तारत असलेल्या जहाजबांधणी, जहाज-दुरुस्ती आणि ओव्हरहॉलिंग परिसंस्थेकडे लक्ष वेधताना, पंतप्रधानांनी देखभाल, नूतनीकरण आणि दुरुस्ती सुविधांचा समावेश असलेल्या संपूर्ण एमआरओ (MRO) परिसंस्थेच्या विकासाचाही उल्लेख केला , ज्यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात परिवर्तन घडून येण्याची शक्यता आहे. “भारतातील  तरुणांसाठी रोजगाराचे एक नवीन क्षेत्र खुले होणार आहे,” असे  मोदी म्हणाले.

भारत एक प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक म्हणून कसा उदयास येत आहे याबद्दल सांगताना , पंतप्रधानांनी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेकडे लक्ष वेधले. ही  योजना विक्रमी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला चालना देत आहे आणि लाखो तरुणांसाठी रोजगार निर्माण करत आहे, कारण संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स मूल्य साखळी भारतातच  तयार केली जात आहे. “पीएलआय योजनेमुळे देशात विक्रमी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन होत आहे,” असे मोदी म्हणाले.

अशा विविध उपक्रमांमध्ये सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रे एकत्रितपणे  मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत यावर भर  देत, पंतप्रधानांनी नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांना व्यवसाय आणि उद्योगाला चालना देण्यामधील त्यांच्या भूमिकेकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याचे आवाहनही केले. “व्यवसाय सुलभता हे देशासाठी खूप मोठे प्राधान्य आहे,” असे  मोदी म्हणाले.

रोजगार निर्मिती आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यात पायाभूत सुविधांची  मूलभूत भूमिका अधोरेखित करताना  पंतप्रधानांनी नमूद केले  की, जेव्हा गावे, छोटी  शहरे आणि दुर्गम प्रदेश विकासाच्या धाग्याने  जोडले जातील  , तेव्हाच देशाच्या प्रगतीचा खरा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू  शकेल. “जेव्हा गावे आणि दुर्गम भाग विकासाशी जोडले जातात, तेव्हा देशाच्या प्रगतीचा लाभ अधिक लोकांपर्यंत पोहोचतो,” असे मोदींनी नमूद केले .

गेल्या बारा वर्षांमध्ये उभारलेल्या रेल्वे, महामार्ग, विमानतळ, लॉजिस्टिक्स, बंदरे आणि डिजिटल नेटवर्क्स यांसारख्या पायाभूत सुविधांच्या व्याप्तीचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, कनेक्टिव्हिटीमुळे शेतकरी, छोटे व्यापारी आणि विद्यार्थी या सर्वांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत आणि आता हे परिवर्तन भारताच्या गावांमध्येही स्पष्टपणे दिसून येत आहे. “गावांमध्येही बदल वेगाने होत असल्याचे स्पष्टपणे  दिसून येत आहे,” असे मोदी म्हणाले.

जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी भारतीय घरांना पक्की घरे, घरगुती शौचालये, वीज आणि नळाद्वारे  पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा आता उपलब्ध झाल्या आहेत, आणि त्यांच्या दूरगामी सामाजिक परिणामांवर भाष्य करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, हे पायाभूत बदल केवळ सोयीपुरते मर्यादित नाहीत. “या बदलांचा प्रभाव केवळ सोयी-सुविधांपुरता मर्यादित नाही,” असे  मोदी म्हणाले.

ग्रामीण रस्ते, सुधारित वीजपुरवठा आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी या प्रत्येकामुळे आर्थिक घडामोडींना कशा प्रकारे चालना दिली आहे, बाजारपेठांमध्ये प्रवेश सुलभ केला आहे, लघुउद्योगांना भरभराटीस येण्यास सक्षम केले आहे आणि गावांचा नवीन डिजिटल प्रणालींशी संपर्क प्रस्थापित झाला, याचा मागोवा घेत पंतप्रधानांनी नमूद केले की, या परस्परसंबंधित सुधारणांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली असून रोजगाराच्या लाखो नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. “या सर्व गोष्टींचा रोजगार निर्मितीवर सकारात्मक परिणाम झाला आहे,” असेही पंतप्रधान म्हणाले.

उत्पादन, तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, डिजिटल सेवा, रेल्वे, संरक्षण आणि अंतराळ या क्षेत्रांमध्ये आज भारतीय तरुणांसाठी उपलब्ध असलेल्या संधी देशाच्या इतिहासात अभूतपूर्व असल्याचे सांगून पंतप्रधानांनी सरकारची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली. जास्तीत जास्त तरुण या संधींचा लाभ घेता यावा आणि आपली प्रतिभा पूर्णपणे प्रदर्शित करता यावी, यांची खात्री करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. “भारताच्या तरुणांना आज त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ज्या संधी उपलब्ध आहेत, त्या पूर्वी कधीही नव्हत्या,” असे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले.

कौशल्य विकास, उद्योग-संलग्न शिक्षण आणि भविष्यकालीन तंत्रज्ञान यांमध्ये सरकारच्या सुरू असलेल्या गुंतवणुकीची रूपरेषा मांडताना, आयटीआयचे आधुनिकीकरण, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण आणि पीएम सेतू उपक्रमाची अंमलबजावणी यांचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला. वेगाने बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या गतीशी जुळवून घेण्यासाठी सतत तयारी करण्याच्या महत्त्वावरही पंतप्रधानांनी भर दिला. “कौशल्य विकास, उद्योग-संलग्न शिक्षण आणि भविष्यकालीन तंत्रज्ञान यावर सातत्याने भर दिला जात आहे,” असे त्यांनी सांगितले.

देशभरात स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संस्कृतीच्या उदयाचा गौरव करताना, पंतप्रधानांनी नमूद केले की, 2.3 लाखांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्ससह भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था बनला आहे असून हे परिवर्तन आता केवळ महानगरांपुरते मर्यादित राहिलेले नाही. “हा बदल केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित नाही,” असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

श्रेणी-2 आणि श्रेणी-3 शहरांमधील तरुण मोठ्या संख्येने स्टार्टअप्स आणि नवोन्मेषाच्या जगात प्रवेश करत आहेत. ही चळवळ राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक बनली आहे, याचा अभिमान असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या उद्योजकतेच्या लाटेत भारतातील महिलांच्या वाढत्या आणि निर्णायक भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला. मुद्रा योजनेद्वारे कोट्यवधी महिलांचे झालेले आर्थिक सक्षमीकरण आणि पीएम स्वनिधीसारख्या योजनांमुळे शक्य झालेले स्वावलंबित्व यांची दखल घेत पंतप्रधान म्हणाले की, “आज, गावांमध्ये आणि छोट्या शहरांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक महिला पूर्णपणे स्वतःच्या हिमतीवर नवीन उद्योग सुरू करत आहेत.”

कोणत्याही संस्थेची खरी ताकद तिच्या कर्मचारीवृदांमध्ये असते. नवनियुक्त कर्मचारी ज्या व्यवस्थेत सामील होत आहेत, ती कोट्यवधी नागरिकांच्या जीवनाशी जवळून आणि थेट जोडलेली आहे, यांची आठवण पंतप्रधानांनी नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांना संबोधित करताना करून दिली. सरकारी नोकरी ही सर्वप्रथम लोकांचे जीवन सुकर करण्याचे एक साधन आहे. “तुम्ही कोणत्याही विभागात सेवा करा, तुमचे वर्तन, सहानुभूती आणि कार्य करण्याची पद्धत अत्यंत महत्त्वाची असेल,” असे पंतप्रधानांनी सांगितले.

नवनियुक्त अधिकाऱ्यांवरील राष्ट्राच्या विश्वासाची पुष्टी करत, पंतप्रधानांनी प्रत्येक तरुण कर्मयोग्याला आपले पद ही एक जिवंत जबाबदारी आहे असे मानण्याचे तसेच भारतातील लोकांच्या वाढत्या आकांक्षा समजून घेण्याचे आणि त्यानुसार आपले कार्य जुळवून करण्याचे आवाहन केले. “आता तुमच्या कामातून तो विश्वास अधिक दृढ करणे ही तुमची जबाबदारी आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

नवीन शासकीय कर्मचाऱ्यांना निरंतर शिक्षण तसेच नवीन तंत्रज्ञान, प्रणाली आणि बदलत्या गरजांशी सतत जुळवून घेण्याचे आवाहन करत, पंतप्रधानांनी ‘आयगॉट कर्मयोगी प्लॅटफॉर्म’ आणि ‘कर्मयोगी प्रारंभ’ मॉड्यूलची प्रशंसा केली. ही साधने कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने समजून घेण्यास आणि त्या योग्य रीतीने पार पाडण्यास मदत करणारी शक्तिशाली साधने असल्याचे ते म्हणाले. “ याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे मी तुम्हाला आवाहन करतो,” असे ते म्हणाले.

नवनियुक्तांना कार्यासाठी प्रेरणादायी आवाहन करून, पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की, आज नियुक्तीपत्रे स्वीकारणाऱ्या तरुणांमध्ये तोच उत्साह आणि ऊर्जा आहे, ज्या उत्साहाने आणि ऊर्जेने भारतातील तरुण जगभरातील प्रत्येक क्षेत्रात आपली छाप पाडत आहेत, आणि हाच उत्साह त्यांच्या लोकसेवेसाठी प्रेरणास्रोत असला पाहिजे. “आपल्या कामाला राष्ट्रसेवेचे साधन मानणाऱ्या तरुणांच्या प्रयत्नांतून ‘विकसित भारत’ उभारला जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवनियुक्त अधिकारी भारताच्या विकास प्रवासाला नवी गती देतील आणि त्यांच्या कार्यामुळे आणि निर्णयामुळे ‘विकसित भारता’चा संकल्प पूर्ण होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना पुन्हा एकदा व्यक्त केला. नियुक्तीपत्रे स्वीकारणाऱ्या सर्व तरुणांना त्यांनी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s power sector set for strong FY27 growth on rising demand, capacity additions: Report

Media Coverage

India’s power sector set for strong FY27 growth on rising demand, capacity additions: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 जुलै 2026
July 20, 2026

Yuva to Global Stage: How PM Modi’s Policies Are Turning India’s Youth, Farms & Factories into Growth Engines