“विकसित भारत संकल्प यात्रा ही केवळ सरकारचीच नाही तर देशाची यात्रा बनली आहे”
“गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण सक्षम झाल्यावरच देश सामर्थ्यवान होणार”
“सरकारी योजनांच्या लाभापासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित न ठेवण्याचे विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट”
“शेतकऱ्यांची प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी आमच्या सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींसह देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी झाले होते.

मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी नमूद केले की विकसित भारत संकल्प यात्रेने नुकतेच 50 दिवस पूर्ण केले असून सुमारे 11 कोटी लोकांशी संपर्क साधला आहे. "विकसित भारत संकल्प यात्रा हा केवळ सरकारचा प्रवास नसून देशाचा प्रवास बनला आहे," असे मत त्यांनी नोंदवले. पंतप्रधान म्हणाले, “मोदींच्या हमीची गाडी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत आयुष्य वेचणाऱ्या गरीब लोकांमध्ये आज अर्थपूर्ण बदल होताना दिसत आहे. सरकार लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचत आहे आणि सक्रियपणे लाभ देत आहे. “मोदींच्या हमीच्या गाडी सोबतच सरकारी कार्यालये आणि लोकप्रतिनिधी लोकांपर्यंत पोहोचत आहेत”, असेही त्यांनी उद्धृत केले.

'मोदींच्या हमी' बद्दलच्या जागतिक चर्चेचा संदर्भ देत पंतप्रधानांनी हमीची रूपरेषा आणि मिशन मोडमध्ये लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या तर्कावर लक्ष केंद्रित केले आणि विकसित भारतचा संकल्प आणि योजनेची परिपूर्णता यांच्यातील दुवा देखील अधोरेखित केला. पीएम मोदींनी गरीब, तरुण, महिला आणि शेतकऱ्यांच्या पिढ्यानुपिढ्यांच्या संघर्षावर प्रकाश टाकला. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, “आधीच्या पिढीने जे जीवन जगले ते आताच्या आणि भावी पिढ्यांना जगावे लागू नये अशी आमच्या सरकारची इच्छा आहे. देशाच्या मोठ्या लोकसंख्येला छोट्या छोट्या दैनंदिन गरजांच्या संघर्षातून बाहेर काढायचे आहे. त्यामुळे आम्ही गरीब, शेतकरी, महिला आणि तरुणांच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आमच्यासाठी या देशातील चार मोठ्या जाती आहेत. जेव्हा गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण सक्षम होतील, तेव्हा देश सामर्थ्यवान होईल.

 

कोणत्याही पात्र लाभार्थ्याला सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित न ठेवण्याचे विकसित भारत संकल्प यात्रेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. त्यांनी माहिती दिली की यात्रेचा प्रारंभ झाल्यापासून, सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती योजना, पीएम स्वनिधीसाठी लाखो अर्जांसह उज्ज्वला कनेक्शनसाठी 12 लाख नवीन अर्ज प्राप्त झाले आहेत.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रभावावर प्रकाश टाकताना, पंतप्रधानांनी सांगितले की आतापर्यंत 2 कोटी पेक्षा जास्त लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यात 1 कोटी लोकांची क्षयरोग तपासणी आणि 22 लाख लोकांची सिकलसेल तपासणीचा समावेश आहे. पंतप्रधानांनी नमूद केले की आज गरीब, दलित, वंचित आणि आदिवासींच्या दारापर्यंत डॉक्टर पोहोचत आहेत जे पूर्वीच्या सरकारांनी आव्हान मानले होते. त्यांनी आयुष्मान योजनेवरही प्रकाश टाकला जी 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा, गरीबांसाठी मोफत डायलिसिस आणि जनऔषधी केंद्रांवर कमी किमतीची औषधे उपलब्ध करून देते. "देशभरात बांधलेली आयुष्मान आरोग्य मंदिरे ही गावे आणि गरिबांसाठी मोठी आरोग्य केंद्रे बनली आहेत", असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना, देशातील महिला सक्षमीकरणावरील सरकारच्या प्रभावावर देखील अधिक भर दिला. तसेच त्यांनी मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्जाची उपलब्धता, बँक मित्रांची भूमिका निभावणाऱ्या महिला, पशु सखी आणि आशा कार्यकर्त्या यांचा उल्लेख केला. गेल्या 10 वर्षांत 10 कोटी महिलांनी महिला स्वयं-सहाय्यता बचत गटाशी जोडल्या गेल्या असून त्यांना 7.5 लाख कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. आणि त्यामुळे, अनेक भगिनी गेल्या काही वर्षामध्ये लखपती दीदी झाल्या आहेत अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. या उपक्रमाला मिळालेल्या यशाचा उल्लेख करुन पंतप्रधानांनी सांगितले की लखपती दीदींची संख्या 2 लाखांपर्यंत वाढवण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या नमो ड्रोन दीदी योजनेविषयी सांगितले. या योजनेअंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये 1 लाख ड्रोनच्या कार्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. ते पुढे म्हणाले की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सामान्य जनतेला नव्या तंत्रज्ञानांशी मोहीम तत्वावर जोडण्यात येत आहे. “सध्या, केवळ ड्रोनच्या कृषी क्षेत्रातील वापरासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. मात्र, येत्या काही दिवसांत, याची व्याप्ती इतर क्षेत्रांपर्यंत देखील वाढवण्यात येईल,” पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

यापूर्वीच्या सरकारांच्या कार्यकाळात, शेतकऱ्यांसमोर दररोज उभ्या राहणाऱ्या आव्हानांकडे दुर्लक्ष करून, कृषीविषयक धोरणांशी संबंधित चर्चांची व्याप्ती केवळ उत्पादन आणि विक्री एवढ्यापर्यंतच सीमित ठेवण्यात आली होती. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला किमान 30,000 रुपयांची मदत, पीएसीज,एफपीओ यांसारख्या संघटनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात सहकाराला प्रोत्साहन, साठवण क्षमतेमध्ये वाढ तसेच अन्न प्रकिया उद्योगाला चालना यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख करुन पंतप्रधान म्हणाले, “आमच्या सरकारने, शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.” तूर किंवा अरहर डाळ उत्पादक शेतकरी आता त्यांचे उत्पादन ऑनलाईन पद्धतीने थेट सरकारला विकू शकतात आणि त्यातून किमान आधारभूत मूल्याने खरेदी आणि बाजारपेठेत अधिक चांगले मूल्य यांची सुनिश्चिती होते अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. “डाळी खरेदीसाठी आपण जो पैसा परदेशात पाठवतो आहोत तो आपण आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,” ते म्हणाले.

भाषण संपवताना पंतप्रधान मोदी यांनी व्हीबीएसवायमध्ये संपूर्णतः समर्पितपणे सहभागी झालेल्या स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांसह हा उपक्रम चालवणाऱ्या पथकाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

 

पार्श्वभूमी

विकसित भारत संकल्प यात्रा 15 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु झाली. तेव्हापासून पंतप्रधानांनी संपूर्ण देशभरातील विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी वेळोवेळी संवाद साधला आहे. 30 नोव्हेंबर, 9 डिसेंबर, 16 डिसेंबर आणि 27 डिसेंबर अशा चार दिवशी पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हा संवाद साधला. तसेच, गेल्या महिन्यातील वाराणसी भेटीच्या दरम्यान पंतप्रधानांनी 17 आणि 18 डिसेंबर या दिवशी पंतप्रधानांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून चर्चा केली.

केंद्र सरकारने सुरु केलेल्या महत्त्वाच्या योजनांच्या लाभांची माहिती कालबद्ध पद्धतीने सर्व लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून विकसित भारत संकल्प यात्रेची संपृक्तता साधण्यासाठी ही यात्रा सुरु करण्यात आलेली आहे.

सुमारे 10 कोटी सहभागींचा टप्पा पार करून 5 जानेवारी 2024 रोजी विकसित भारत संकल्प यात्रेने महत्त्वाचा टप्पा पार केला. ही यात्रा सुरु झाल्यापासून 50 दिवसांत गाठलेली ही आश्चर्यकारक संख्या विकसित भारताचे सामायिक स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने लोकांना एकत्र आणण्याच्या यात्रेच्या मोठ्या प्रभावाचे आणि अतुलनीय क्षमतेचे निदर्शक आहे.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
ET@Davos 2026: ‘India has already arrived, no longer an emerging market,’ says Blackstone CEO Schwarzman

Media Coverage

ET@Davos 2026: ‘India has already arrived, no longer an emerging market,’ says Blackstone CEO Schwarzman
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 23 जानेवारी 2026
January 23, 2026

Viksit Bharat Rising: Global Deals, Infra Boom, and Reforms Propel India to Upper Middle Income Club by 2030 Under PM Modi