पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रिपब्लिक प्लेनरी समिट 2025 मधील भाषण
March 06th, 08:05 pm
एक प्रकारे युवकांच्या सहभागाने आपण सर्व बंधने तोडू शकतो, सीमा ओलांडून जाऊ शकतो, आणि मग असे कोणतेही लक्ष्य शिल्लक राहत नाही जे साध्य करता येणार नाही . असे कोणतेही ध्येय उरत नाही ज्यापर्यंत पोहोचता येणार नाही. रिपब्लिक टीव्हीने या शिखर परिषदेसाठी एका नवीन संकल्पनेवर काम केले आहे. या शिखर परिषदेच्या यशासाठी मी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो, तुमचे अभिनंदन करतो. बरं, यात माझाही थोडासा स्वार्थ आहे, एक तर गेल्या काही दिवसांपासून माझा प्रयत्न आहे की मला एक लाख तरुणांना राजकारणात आणायचं आहे आणि ते एक लाख असे असतील ज्यांच्या कुटुंबातील कुणीही आजवर राजकारणात आलेले नसतील, ते युवकच प्रथम येणारे असतील, त्यामुळे एक प्रकारे हा कार्यक्रम माझ्या या उद्दिष्टाला अनुरूप पार्श्वभूमी तयार करत आहे. दुसरे म्हणजे, माझा वैयक्तिक फायदा असा आहे की जे 2029 मध्ये मतदान करण्यासाठी जातील त्यांना माहित नाही की 2014 पूर्वी वर्तमानपत्रातील मथळे काय असायचे , हे त्यांना माहीत नाही . 10-10, 12-12 लाख कोटी रुपयांचे घोटाळे व्हायचे हे त्यांना माहीत नाही आणि जेव्हा ते 2029 मध्ये मतदान करायला जातील तेव्हा त्यांच्यासमोर तुलना करण्यासाठी काहीही नसेल आणि म्हणूनच मला ती कसोटी पार करायची आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे जे वातावरण तयार होत आहे , ही जी पार्श्वभूमी तयार होत आहे ती हे काम नक्की करेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक प्लेनरी समिट 2025 ला संबोधित केले
March 06th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीमधील भारत मंडपम येथे आयोजित रिपब्लिक प्लेनरी समिट 2025 मध्ये भाग घेतला. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मुलभूत पातळीवर युवकांना सहभागी करून घेण्यासाठी आणि महत्त्वाची हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यासाठी रिपब्लिक टीव्ही या वाहिनीने स्वीकारलेल्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाबद्दल वाहिनीच्या संचालकांचे अभिनंदन केले. जेव्हा देशातील तरुण राष्ट्रीय चर्चांमध्ये सहभागी होतात तेव्हा त्यातून संकल्पनांमध्ये नाविन्य निर्माण होते आणि संपूर्ण वातावरण तरुणांच्या उर्जेने भरून जाते, असे मत त्यांनी नोंदवले. ही उर्जा आत्ता या कार्यक्रमात जाणवते आहे हे सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिला. पंतप्रधान पुढे म्हणाले की, तरुणांचा सहभाग सर्व प्रकारचे अडथळे पार करण्यात आणि बंधनांच्या पलीकडचा विचार करण्यात सहाय्यक ठरतो आणि त्यामुळे प्रत्येक ध्येय साध्य करण्याजोगे आणि प्रत्येक इच्छित लक्ष्य गाठ्ण्याजोगे होऊन जाते. अशा पद्धतीच्या परिषदेची नवी संकल्पना राबवल्याबद्दल त्यांनी रिपब्लिक टीव्ही वाहिनीची प्रशंसा केली आणि या उपक्रमाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख युवकांना भारताच्या राजकारणात आणण्याच्या त्यांच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला.