प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

April 27th, 11:30 am

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज मी तुमच्याशी 'मन की बात' मधून संवाद साधत आहे, मात्र माझे मन अतिशय व्यथित आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक दुःखी झाला आहे. शोकाकुल कुटुंबांप्रति प्रत्येक भारतीयाच्या मनात सहानुभूती आहे. भले ते कुठल्याही राज्यातील असो, कोणतीही भाषा बोलणारे असो, मात्र या हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांचे दुःख त्यांना जाणवत आहे. मला जाणीव आहे, दहशतवादी हल्ल्याची छायाचित्रं पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त खवळलं आहे. पहलगाममधील या हल्ल्यातून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांची उद्विग्नता दिसून येते, त्यांचा भेकडपणा दिसून येतो. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शांतता नांदत होती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते, पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती मिळाली होती, लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते, युवकांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. मात्र देशाच्या शत्रूंना हे पसंत नव्हतं. दहशतवादी आणि त्यांचे आश्रयदाते यांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त व्हावं असं वाटत होतं आणि म्हणूनच एवढा मोठा कट रचण्यात आला. दहशतवादाविरोधातल्या या युद्धात देशाची एकता, 140 कोटी भारतीयांची एकजूट ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. हीच एकता दहशतवादाविरुद्ध आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. देशासमोर उद्भवलेल्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्याला आपले संकल्प अधिक बळकट करायचे आहेत. एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती दाखवून द्यावी लागेल. आज जग पाहत आहे या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात बोलत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

April 25th, 02:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, भारताच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक वाटचालीतील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत अत्यंत परिश्रमपूर्वक काम केले, भारताच्या अवकाश कार्यक्रमाला नव्या उंचीवर नेले असे पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करताना आणि भारतातील शिक्षण अधिक समग्र तसेच भविष्याला अनुसरून असावे याची सुनिश्चिती करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांकरता भारत नेहमीच डॉ. कस्तुरीरंगन यांचा ऋणी राहील. ते अनेक तरुण शास्त्रज्ञ आणि संशोधकांसाठी उत्कृष्ट मार्गदर्शक देखील होते, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.